पवारांच्या पंतप्रधानपदाचं ‘मिथक’

अलिकडच्या काही वर्षांत कोणत्याही दूतांनी क्षितीजावरुन जरी लोकसभा निवडणुकीच्या दुंदुभी वाजवायला सुरुवात केली तरी, आसमंतात लगेच शरद पवार पंतप्रधान होण्याच्या वावड्या उडू लागतात. या हंगामात त्याची सुरुवात शरद पवार यांच्या दरबारातील खासे प्रफुल्ल पटेल यांनी केली, त्या सुरात अभिनेते नाना पाटेकर यांनीही आता सूर मिसळला आहे. दरम्यान गुजराथ विधानसभा निवडणुकीपासून राहुल गांधी बहरात आले आणि भाजपेतर विरोधी पक्षांच्या उभारीला तरारुन कोंब फुटले; ते स्वभाविकच होतं कारण २०१४च्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजपच्या विरोधात असं अनुकूल वातावरण प्रथमच निर्माण झालेलं होतं. मग डिनर डिप्लोमसी सुरु झाल्या; त्यातच उत्तर प्रदेशात झालेल्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीत हाडवैरी समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी यांच्या युती झाली, परिणामी दोन लोकसभा मतदार संघात भाजपला दणकून मार पडला. शरद पवार यांना सोनिया आणि राहुल गांधी यांनी ‘सन्मान’पूर्वक आमंत्रित केलं. शरद पवार दिल्लीत पोहोचले आणि अनेक नेते त्यांच्या भेटीला सामोरे गेले. ममता​ बॅनर्जी दिल्लीत पोहोचल्या, त्यांनीही शरद पवार यांच्यासह अनेक नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या. मग त्यांच्या पंतप्रधानपदाच्या शक्यतेची वावडी उठली. राज्यसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात पराभवाला सामोरे जावं लागलं तरी मायावतीं यांनी भाजपविरोधाची तलवार म्यान केली नाही. कोणत्याही लोकसभा निवडणुकीपूर्वी जशा राजकीय घडामोडी घडतात तशा घडू लागल्या. फरक एकच होता, कोणत्याही निवडणुकीआधी पूर्वी कॉंग्रेसला पर्याय म्हणून काही किंवा अनेक पक्ष एकत्र येत शिवाय तिसरी आघाडी नावाचा या देशात कधीच यशस्वी न झालेला प्रयोग जाहीर होत असे; आता हे सर्व भाजपच्या विरोधात होतं आहे.

शरद पवार जर पंतप्रधान झाले तर वाईट वाटावं असं काहीच नाही. राजकारणातल्या खाचाखोचा कोळून प्यायलेला आणि इतकी प्रदीर्घ खेळी असणारा, चौफेर कर्तृत्व गाजवलेला दुसरा मराठी राजकारणी सध्या तरी दृष्टीक्षेपात नाही. ते महाराष्ट्रीयन, ही बाब कोणाही मराठी माणसाला अभिमानस्पद आहे. (माझ्या पिढीची पत्रकारिता फुलली ती शरद पवार यांच्या कर्तबगारीच्या बहरावर; त्यामुळे ते आपल्या देशाचे पंतप्रधान झाले तर मलाही आनंदच आहे. अर्थात माझ्या काहीही वाटण्या-न वाटण्याचा शरद पवार यांच्यासारख्या उत्तुंग व्यक्तीमत्व, त्यांचं कर्तृत्व आणि ते पंतप्रधान होण्या-न होण्यावर काडीमात्र परिणाम होणारा नाहीये!) मात्र, वस्तुस्थिती काय याचं भान विसरता कामा नये. पण, अलिकडच्या काही वर्षात विशेषत: समाज माध्यमांचा सुळसुळाट झाल्यापासून कोणाही राजकारण्याला वास्तवाची जरा जाणीव करुन दिली की त्याचे ट्रोल तुटून पडतात. महत्वाचं म्हणजे ट्रोल्स ही काही केवळ भाजप/नरेंद्र मोदी/राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मक्तेदारी नाही तर शरद पवार यांचेही ट्रोल्स आहेतच की. त्यामुळे त्यांच्या संभाव्य पंतप्रधानपदाबद्दल (शरद पवार यांनी नेहेमीप्रमाणे मौन बाळगलेलं असलं तरी) वस्तुस्थिती सांगितली की, नेहेमीप्रमाणे माझं ‘ब्राह्मण्य’ हे ट्रोल काढतील, यात शंकाच नाही.

पंतप्रधान होण्याची मनीषा सर्वात प्रथम शरद पवार यांनी जाहीर केली ती पी. व्ही. नरसिंहराव यांच्या विरोधात शड्डू ठोकून. (तेव्हा नागपुरात ती बातमी आम्ही घनघोर चर्चा करत सेलिब्रेट केली होती; होतो असा भाबडेपणा कधी, कधी!) तेव्हापासून शरद पवार यांचं पंतप्रधानपद महाराष्ट्रासाठी एक ‘विलोभनीय आणि भावनात्मक मिथक’ ठरलेलं आहे हे आपण कधीच विसरता कामा नये. याआधी एकदा लिहिलेला/भाषणात अनेकदा सांगितलेला एक अनुभवच पुन्हा सांगतो, म्हणजे दिल्लीत काय वातावरण आहे हे स्पष्ट होईल. मनमोहनसिंग यांच्या पहिल्या पंतप्रधानपदाच्या काळातला हा प्रसंग आहे. एकदा दिल्लीत असतांना दोन पत्रकार मित्रांसोबत कॉंग्रेसचे संकटमोचक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका बड्या नेत्यांकडे (पुढे ते देशाचे घटनात्मक प्रमुख झाल्यानं थेट नाव टाळलं आहे!) रात्रभोजनाला जाण्याची संधी मिळाली. हे सगळे एकमेकांच्या फारच निकटचे आहेत हे त्यावेळी सहज लक्षात येत होतं. गप्पात एकानं विचारलं, ‘दादा, तुमच्यात पंतप्रधान पदाचं सर्व मेटल आहे पण, एकदा प्रयत्न अयशस्वी ठरल्यावर तुम्ही शांत झाला का आहात?’ त्यावर ते चाणक्य नेते जे म्हणाले होते त्याचं सार असं- ‘एक म्हणजे, माझ्या स्वत:च्या राज्यातूनच एकहाती संख्याबळ माझ्या पाठीशी नाही आणि दुसरं म्हणजे तर मला गांधी कुटुंबाचा पाठिंबा नाही; तो असेपर्यंत मीच काय कुणीही कॉंग्रेसकडून पंतप्रधान होऊ शकत नाही!’

तिथून बाहेर पडल्यावर मी त्या पत्रकार मित्रांना म्हणालो, तुम्ही दिल्लीचे पत्रकार आमच्या पवारसाहेबांना ‘मराठा पॉवर’ म्हणता, ‘ग्रेट मराठा’ म्हणता, मुत्सद्दी आणि व्यासंगी राजकारणी म्हणता तरीही त्यांचं नाव पंतप्रधान म्हणून म्हणून तुम्ही गृहीत का धरत नाही? त्यावर पत्रकार मित्र म्हणाला, ते अजून पूर्ण दिल्लीकर झालेले नाहीत आणि त्या पदासाठी अजून त्यांची तयारी नाही. (आजही पक्कं स्मरणात आहे, त्यानं he is a spring chiken असा शब्दप्रयोग केलेला होता आणि तो मला तेव्हा मुळीच रुचला नव्हता). त्यावर देवेगौडा यांना काय एका रात्रीत सर्वज्ञान प्राप्त झालाय का असा वाद मी घातला तेव्हा महाराष्ट्राचे लोक पवारांबाबत ‘अंध आणि नाहक इमोशनल आहेत’, असा शेरा त्यानं मारला होता.

या घटनेला एक तप उलटून गेलंय; राजकारणाच्या पटावरुन आणि पटाखालून खूप पाणी पाहून गेलेलं आहे; एक पत्रकार म्हणून दोन विधानसभा आणि एका लोकसभा निवडणुकीत दिल्लीच्या दरबारी राजकारणाची चव चाखल्यावर मला शरद पवार यांच्याबाबत दिल्लीच्या पत्रकार मित्रानं केलेल्या मतप्रदर्शनात तथ्य असल्याची खात्री पटलेली आहे. आपण लक्षात घेतलं पाहिजे की, ऊर भरुन यावं असं शरद पवार याचं जे काही कौतुक आपण मराठी माणसाला आहे ते दिल्लीत नाही. जो दिल्लीत पाय रोवून, डेरा पक्का ठोकेल तोच देशाच्या राजकारणातला महत्वाचा नेता बनेल हे लक्षात घेतलं पाहिजे. (शरद पवार आणि गोपीनाथ मुंडे ही दोन्ही नेते दिल्लीत कधीच रमलेले नाहीत; या दोन्ही नेत्यांचा पाय कधीच दिल्लीत स्थिरावला नाही, हाच आजवरचा अनुभव आहे) आता पुन्हा चर्चा सुरु झाल्यावर तरी सलग एक आठवडा शरदराव दिल्लीत थांबले आहेत का? तरी महाराष्ट्राचे लोकनेते असलेल्या शरद पवार यांना पंतप्रधानपद मिळावं असं अनेकांना वाटावं हे मिथकच नाही का? माझं नेहेमीचं प्रतिपादन आहे, दिल्लीच्या राजकारणाचा बाज अस्सल कावेबाजपणाचा तर शैली डोक्यावर बर्फ, जीभेवर खडीसाखर आणि चेहेऱ्यावरची सुरकुती न हलू देता दरबारी राजकारण करण्याची आहे. राजकारणाच्या पलिकडे जाऊन संबंध, परस्पर संवाद व सौहार्द, सर्वसमावेशकता या शरद पवार यांच्या स्वभावाच्या ज्या वैशिष्ट्यांचा आपण अभिमान वगैरे बाळगतो, त्याच्याशी दिल्लीच्या राजकारणाच्या शैलीची फारकत आहे. आम्ही मतभेद राजकारणापुरतेच ठेवतो असं पवार अभिमानाने सांगतात आणि त्याला आपण कौतुकानं जी दाद देतो; पण तोच त्यांच्या देशाचा नेता होण्यामागील कमकुवत दुवा आहे!

एखाद्या राज्याचं मुख्यमंत्रीपद किंवा केंद्रात एखादं खातं समर्थपणे सांभाळणं ठीक आहे पण नेत्यांकडे जागतिक भान आवश्यक आहे. क्रिकेटचं आंतरराष्ट्रीय अध्यक्षपद सांभाळणं आणि जागतिक अर्थकारण, परराष्ट्र संबंधातील गुंतागुंत, संरक्षण आघाडीवरील क्लिष्टता काश्मीर प्रश्नाचं अश्वत्थामाच्या भळभळत्या जखमेसारखं दुखणं, देशाच्या पूर्व आघाडीवरील जटील प्रश्न आणि प्रत्येक राज्याची वेगळी संस्कृती आणि अस्मिता व भाषेपासून ते भुकेपर्यंत नानाविध वेगळ्या समस्या, अशा अनेक आघाड्यांवर शरद पवार अजून सिद्ध व्हायचे आहेत…अर्थात हे सर्व आकळून घेण्याची अफाट क्षमता पवार यांच्या आहे, याबद्दल दुमत नाहीच.

शिवाय, शरद पवार (महा)राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष असतात पण, भारतीय लोकशाहीचा संकोच केल्याचा आरोप ज्यांच्यावर होतोय त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘गुरु’ असतात; भाजपत शरद पवार इतके पॉवरफुल्ल असतात की, राज्यसभेची उमेदवारी भाजपकडून मिळवून मुंबईला विमानानं पोहोचेपर्यंत दत्ता मेघे यांची उमेदवारी रद्द करवून घेण्याइतकी त्यांची भारी वट असते; ते काँग्रेसमधे असतात (म्हणजे होते) पण, अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांचे मित्र असतात; एवढंच नाही तर वाजपेयी पंतप्रधान असतांना देशाच्या आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष असतात; सोनिया गांधी यांच्या विदेशी असण्यावरुन पवार कॉंग्रेसमधून फुटून निघतात आणि लग्गेच झालेल्या निवडणुकीनंतर जातीयवादी शक्तीला म्हणजे भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी राज्य आणि केंद्रातल्या काँग्रेसप्रणीत सरकारात सहभागी होतात; पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या सरकारला अणु करारावरून जेरीस आणणाऱ्या डाव्यांशीही ते मैत्र ठेऊन असतात; ‘पेशवाई आणणार का?’ अशी जहरी टीका भाजपच्या ज्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर शरद पवार करतात त्याच देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात सरकार यावं यासाठी त्यांचा राष्ट्रवादी ‘जातीयवादी’ पक्ष भाजपला विनाशर्त बाहेरुन पाठिंबा देतो, हे दिल्लीच्या दरबारी राजकारणाला मानवणारं मुळीच नसतं. बरं, या संदर्भात स्वत: शरद पवार कायम सोयीस्कर मौन बाळगून असतात! म्हणजे, शरद पवार सर्वांचे आहेत पण, प्रत्यक्षात कोणाचेच नाहीत, असा समजाचा त्रिशंकू दिल्लीच्या राजकारणात आहे.

महाराष्ट्रात शरद पवार यांची स्थिती त्या संकटमोचक नेत्यासारखीच आहे. शरद पवार यांच्या पाठीशी महाराष्ट्र एकमुखी उभा असल्याचा कौल मराठी माणसानं आजवर कधीच दिलेला नाही, याचा एक पत्रकार म्हणून पुलोदच्या प्रयोगापासून अनेकांसोबतचा साक्षीदार मीही आहे. ममता बॅनर्जी, (पहिल्यांदा मुख्यमंत्रीपद भाजपच्या भरवशावर मिळवूनही भाजपच्या कट्टर विरोधक झालेल्या) मायावती, जयललिता, मुलायमसिंह, नवीन पटनाईक यांच्याप्रमाणे जनमताचा कौल म्हणा की पूर्ण विश्वास, शरद पवार यांना महाराष्ट्राकडून मिळवता आलेला नाही आणि यापुढेही तो मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे कथित तिसऱ्या आघाडीला समजा सत्ता मिळाली तरी संख्याबळाअभावी शरद पवार यांना पंतप्रधानपदासाठी बोली लावता येणार नाही.

राहता राहिला प्रश्न कॉंग्रेसकडून पंतप्रधानपद मिळण्याचा. इंदिरा गांधी यांच्या युगापासून गांधी कुटुंबांशी शरद पवार यांचे सूर सौहार्दाचे कधीच नव्हते; आजही ते तसे आहेत असा दावा खुद्द पवारही करतील याची कदापिही शक्यता नाहीच. शिवाय कॉंग्रेस हा देशव्यापी आणि पक्ष आहे. या पक्षाचा चेहेरा आता निर्विवादपणे राहुल गांधी झालेले आहेत आणि तेच कॉंग्रेसच्या सत्ताप्राप्तीसाठी देशातील जनमताचा कौल मिळवू; शकतात शरद पवार नाहीत. अशा स्थितीत समजा २०१९च्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला (आज अजिब्बात शक्यता दिसत नसलेलं) पूर्ण बहुमत मिळालं तर राहुल गांधी हेच पंतप्रधान होणार हे स्पष्टच आहे (मेहेनत करे मुर्गा, अंडा खाये फकीर हाच नाही तर कोणीही कितीही मेहेनत करो अंडे म्हणजे नेतृत्व गांधी घराण्याकडेच जाणार, ही काँग्रेसी परंपराच आहे!); समजा कॉंग्रेस हा सभागृहातील सर्वात मोठा पक्ष म्हणून विजयी झाला (तीही शक्यता आजच्या घटकेला तरी धूसरच दिसते आहे!) आणि सत्तेसाठी या पक्षाने दावा केला तरी पुन्हा तेच; संख्याबळाअभावी शरद पवार पंतप्रधानपदासाठी दावा करूच शकणार नाहीत आणि त्यांनी तो केला तर कॉंग्रेस पक्ष मान्य करणार नाही. एकुणात काय तर, शरद पवारांच्या पंतप्रधानपदाचं मिथक एक न सुटणारं कोडं राहणार असं दिसतंय!

शेवटी – एक राजकारणी म्हणून शरद पवार अनेकदा आवडतात आणि अनेकदा आवडत नाहीत; तरी मी त्यांचा चाहता आहे. म्हणूनच पंतप्रधान होण्याची शरद पवार यांची (सुप्त) महत्वाकांक्षा २०१९च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालातून प्रत्यक्षात उतरो आणि कोट्यवधी मराठी माणसाला तो क्षण सेलिब्रेट करण्याची संधी मिळो, याच मनापासून शुभेच्छा!

(छायाचित्रे- ‘गुगल’च्या सौजन्याने)

Cellphone ​+919822055799
www.praveenbardapurkar.com


====​

‘डायरी’, नोंदी डायरीनंतरच्या’, ‘दिवस असे की…’, ‘आई’, ‘क्लोज-अप’, ‘ग्रेस नावाचं गारुड’, ‘समकाल’ या माझ्या पुस्तकांसाठी लिंक-

http://www.bookganga.com/ebooks/books/Bookapplet?AID=4736828222950359515 आणि ‘भाष्य’ ई-बुक्ससाठी dailyhunt शी संपर्क साधावा.

====

संबंधित पोस्ट