‘बालकृष्ण दाभाडे‘ – विस्मयचकित करणारा अनुभव !

।। नोंद । ९।।

‘तुमचा कोणता लेख तुम्हाला सर्वांत जास्त चांगला वाटतो’ , असा प्रश्न गेल्या आठवड्यात  एका विद्यार्थ्यानं विचारला , तेव्हा त्याचं नेमकं उत्तर काही लगेच देता आलं नाही . प्रत्येकच लेखकाच्या बाबतीत नेमकं हेच एकमेव अत्युत्तम सांगणं कठीणच असणार . मी तर प्रदीर्घ काळ पत्रकारच आहे . बातमी आणि बातमीच्या अनुषंगानं जास्त लेखन झालं . रुढार्थानं मी काही साहित्यिक नाही तरी , व्यक्तिचित्र आणि भरपूर ललित लेखन केलं , करतो आहे हे खरं आहे पण , एक अत्युत्तम लेख असं सांगता येणं कठीण आहे . मग तोच विषय काही दिवस डोक्यात भिरभिरत राहिला आणि लक्षात आलं- चित्रकला , चित्रकार आणि चित्र रसिकांसाठी चळवळ म्हणून एका चित्रकारानं चालवलेल्या  ‘चिन्ह‘ या नियतकालिकासाठी लिहिलेल्या ‘बालकृष्ण -लीला‘ या लेखानं एका वेगळ्या पातळीवरचं समाधान दिलं आहे .

‘चिन्ह‘ या चळवळीचा सर्वेसर्वा सतीश नाईक हा ‘लोकसत्ता’तील माझा सहकारी .  जे जे स्कूल ऑफ आर्टच्या दुर्दशेविषयी पोटतिडकेनं लिहिणारा , कलाविषयक वेगवेगळ्या विषयावर ‘चिन्ह’चे संपन्न अंक  प्रकाशित करणारा हाच तो मनस्वी सतीश नाईक . मी काही चित्रकार नाही पण , चित्रकलेविषयी मनात बालपणापासूनच एक उत्सुकतेची पणती कायम तेवती आहे . पत्रकारितेच्या धबडग्यात शिरण्यापूर्वी भरपूर रेखाटनं करत असे ; त्यातील कांही प्रकाशितही  झाली  . विशेषत: राजकीय वृत्तसंकलनाच्या क्षेत्रात आल्यावर पुढे तो छंद मागे पडला तो मागेच पडला . आमच्या घरात  आजही गगेंद्रनाथ टागोर यांनी १९२५ साली काढलेले ‘द प्रिन्सेस’ , प्रसिद्ध चित्रकार दिगंबर  मनोहर ( शेफ विष्णु  मनोहर यांचे वडील ) यांचा ‘विठ्ठल’ यासह विवेक रानडे , दिलीप बडे यांची भरपूर चित्रे आहेत . बहुदा हा संदर्भ बोलण्यात आलेला असावा आणि तो लक्षात ठेवून एका दिवशी सतीश नाईकचा फोन आला . आम्ही दोघंही तेव्हा लोकसत्तापासून दूर झालेलो होतो . सतीशनं चिन्ह साठी स्वत:ला वाहून घेतलेलं होतं आणि चित्रकार गायतोंडे यांच्यावर एका पुस्तक प्रकाशनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प त्यानं हाती घेतला होता . मीही ‘डायरी नंतरच्या नोंदी’ ,  ‘दिवस असे की…’  आणि ‘ग्रेस नावाचं गारुड’ अशा एकाच वेळी तीन पुस्तकांवर काम करत होतो . ‘बालकृष्ण दाभाडे ( ६ ऑगस्ट १९०९ ते २२ मे १९७९ ) यांच्यावर एक लेख हवा आहे ‘चिन्ह’साठी’ , असा हुकूम सतीशनं सोडला आणि ‘हे काम तूच करु शकतो’ , असंही सतीशनं मला  झाडावर चढवलं .

दाभाडे कुटुंब मुळचं  हे सांगलीजवळ असलेल्या मिरज इथलं  . त्यांचे आजोबा इ.स. १८१८ च्या दरम्यान औंधला येऊन स्थायिक झाले . श्लोक , पदं , आर्या , दिंड्या , पोवाडे , जोगवे रचणारे मार्तंड बुवा दाभाडे हे बालकृष्ण यांचे वडील . मार्तंड बुवांचा तोच साहित्य , चित्रकला आणि संगीताचा वारसा बालकृष्ण यांच्या रक्तात जन्माजात आला . औंध संस्थांनाच्या दरबारात केलेल्या पहिल्या किर्तनानंतर बालकृष्णला ‘बाल हरदास दाभाडे’ असा सन्मान प्रदान करण्यात आला . बालकृष्ण दाभाडे यांनी शिक्षक म्हणून नोकरी केली . पुढे स्वांतत्र्याच्या चळवळीत ते ओढले गेले . त्यांनी खादीचं व्रत स्वीकारलं .  त्यांना राजकारणाची ओढ लागली . मुलानं राजकारणात जाऊ नये म्हणून मार्तंड बुवा दाभाडे यांनी बालकृष्णला औंधला बोलावून घेतलं आणि पंत प्रतिनिधीच्या शाळेत कीर्तन शिक्षक म्हणून नोकरी लावून दिली . याच काळात भारतीय कला आणि संस्कृतीचा थक्क व्हावा असा व्यासंग बालकृष्ण दाभाडे यांनी केला . संस्थानच्या नोकरीतच असतांना भारतीय चौसष्ट कलांची माहिती समग्रपणे देणारा ‘भारतीय चित्रकला’ हा ग्रंथ बालकृष्ण दाभाडे यांनी लिहिला . प्रकाशित होऊन आता ९० वर्ष उलटली तरी भारतीय चित्रकला तसंच  शिल्पकलेवर मूलभूत आणि चिकित्सकतेनं झालेलं साक्षेपी लेखन म्हणून हा ग्रंथ आजही प्रमाण मानला जातो .

औंधच्या दरबारातच बालकृष्ण दाभाडे आणि औंधची राजकन्या वासंतिका यांच्या प्रेमांकुर रुजले आणि बहरलेली . तोपर्यंत बालकृष्ण दाभाडे हे नाव मराठी साहित्य , सौंदर्य अभ्यासक , लेखक , कवी , गीतकार म्हणून दुमदुमू लागलं होतं . ‘शशांक’ या नावानं काव्य लेखन करणाऱ्या दाभाडे यांच्या कवितांचं अमाप कौतुक झालं .  तेव्हाच्या माधवराव पटवर्धन , ना. गो. चाफेकर , अ . य . देशपांडे , केशव सीताराम ठाकरे , आचार्य अत्रे , अनंत काणेकर सारख्यांची दाद मिळाली होती . वासंतिका आणि बालकृष्ण तोपर्यंत विवाहबंधनात अडकण्याच्या निर्णयापर्यंत पोहोचले होते . पुढे हा विवाह प्रख्यात महानुभाव संशोधक डॉ. वि. भि. कोलते यांनी नागपुरात  लावून दिला . त्याची हकिकत डॉ.  वि . भि . कोलते यांच्या ‘अजूनही चालतोचि वाट’ या आत्मचरित्रात  पृष्ठ २३७ वर आहे . दरम्यान या प्रेम कथेमुळे  बाळकृष्ण दाभाडेवर  यांच्या मराठी साहित्य जगतानं बहिष्कार घातला म्हणून  प्रेमविवाहानंतर बालकृष्ण दाभाडे मध्यप्रदेशात स्थायिक झाले आणि त्यांनी शिक्षकी पेशा स्वीकारला . मात्र , गतआयुष्यातील चित्रकला त्यांनी थांबवली , गाणं थांबवलं , कीर्तन बंद केलं आणि कवितेलाही संन्यास  ठोकला . उर्वरित आयुष्य संशोधन आणि संकलन या क्षेत्रांना त्यांनी वाहून घेतलं . त्यांनी अनेक हस्तलिखित जमा केली . अनेक दुर्मिळ ग्रंथ शोधून काढले . सुमारे ८०० हस्तलिखितं जमा केलीत . अखेरचा श्वास घेईपर्यंत बालकृष्ण दाभाडे संशोधनाच्या क्षेत्रात कार्यरत होते . थोडक्यात काय तर स्वकैफात जगलेला एक कलासक्त ज्ञानोपासक बालकृष्ण दाभाडे होत आणि प्रेमविवाहानंतर मराठी साहित्य क्षेत्रातील अभिजनांनी त्यांना वाळीत टाकलेलं होतं . ही वरील सर्व माहिती चिन्ह च्या रौप्य महोत्सवी वार्षिक अंकात (२०११-१२) माझ्या लेखात आलेली आहे . हा लेख माझ्या ‘क्लोजअप’ ( प्रकाशक- देशमुख आणि कंपनी , पुणे ) या व्यक्तिचित्र संग्रहात आहे .

पण , ही माहिती मिळवणं सोपं नव्हतं . त्यासाठी मी औंधला गेलो . मिरजेलाही जाऊन आलो . जबलपूरलाही गेलो . अशा सर्व ठिकाणी सलग कांहीच नाही तर तुटक तुटक काही हाती येत होतं . याच भटकंतीत बालकृष्ण दाभाडे यांचा मुलगा नागपुरात असल्याचं समजलं . जबलपूर ते नागपूर प्रवासात ते दाभाडे कोण असावेत हाच विचार मनात घोळत असतांना अचानक वीज चमकावी तसं ‘पंचम’ हे नाव आठवलं . मी नागपूरला १९८१ साली पत्रकारिता करण्यासाठी आलो . तेव्हा ८२ का ८३ साली ‘पंचम’ या नावानं पाच छायाचित्रकारांनी त्यांच्या छायाचित्रांचं एक प्रदर्शन भरवलं होतं . त्या प्रदर्शनाचा वृत्तांत भरपूर छायाचित्रांसह एक पानभर कलाविषयक जाणीव असणाऱ्या पत्रकाराच्या नजरेतून मी लिहिला होता . तो वाचल्यावर डॉ. श्रीकांत दाभाडे मला भेटण्यासाठी ‘नागपूर पत्रिका’ या दैनिकाच्या कार्यालयात आले होते पण , नंतर त्यांच्याशी माझा कोणताच संपर्क उरलेला नव्हता . ‘पंचम’च्या त्या पाच पैकी एक डॉ. श्रीकांत दाभाडे होते ; एलआयटी या उच्च शिक्षण संस्थेत ते प्राध्यापक होते हेही आठवलं .

नागपूरला परतल्यावर एलआयटी गाठलं पण , तोपर्यंत श्रीकांत दाभाडे सेवानिवृत्त झाले होते . मग एलआयटीच्या निवृत्त प्राध्यापकांचा शोध आणि टेलिफोन डिरेक्टरीत असलेल्या ‘दाभाडें’ना संपर्क साधणे अशी मोहिमचं हाती घेतली . एक फोन उचलला तो नेमका श्रीकांत दाभाडे यांनीच ! चौकशीअंती बालकृष्ण दाभाडे यांचे चिरंजीव तेच असल्याचं समजलं आणि लेख पूर्ण होण्याच्या दिशेनं एक पाऊल ठामपणे पुढे पडलं .

मग त्यांना जाऊन भेटलो . अनेकदा भेटलो . बालकृष्ण दाभाडे यांनी लेखन  , काव्य  , संशोधन , समीक्षा , चित्रकला , शिल्पकलेसोबतच अनेक क्षेत्रात सोनेरी पताका झळकवलेल्या होत्या , हे श्रीकांत दाभाडे यांच्या बोलण्यातून लक्षात येतं गेलं . १९४६ साली हडप्पाच्या संशोधनात  नंतर तत्कालीन म्हैसूर प्रांतातील ब्रह्मगिरी परिसरात झालेल्या पुरातत्त्व संशोधनात बाळकृष्ण दाभाडे कसे सहभागी झाले होते ही नवीन माहिती मिळाली . बालकृष्ण  दाभाडे यांनी लिहिलेल्या पुस्तकांची सूची मिळाली . महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या कुटुंबाची छायाचित्रेही मिळाली . श्रीकांत दाभाडे यांनी  ‘प्रा. बा. मा. दाभाडे व्यक्ती आणि वाड्मय’ हे दुर्मीळ  पुस्तकही भेट म्हणून दिलं . वृत्तपत्रीय भाषेत सांगायचं तर डेडलाइन पाळता आलेली नव्हती पण , सतीश नाईक यांची  बालकृष्ण दाभाडे यांच्यावरची निष्ठा ,  लेखाबाबतचा संयम आणि उत्साह दाद देण्यासारखा होता . अफाट कर्तृत्व बजावलेल्या पण , कृतज्ञ स्मरणाची  ‘नाही चिरा नाही पणती’ ; उपेक्षाच वाट्याला आल्याची ही अशी अवस्था असणाऱ्या बालकृष्ण दाभाडे यांच्याबद्दल ‘चिन्ह’साठी लिहिता आलं . ‘चिन्ह’च्या अंकात ‘बालकृष्ण -लिला’ हा लेख प्रकाशित झाला . कला जगतातून या लेखाला फार मोठा प्रतिसाद मिळाला . जवळजवळ साडेचार महिने झालेली धावपळ एक विस्मयचकित करणारा अनुभव देऊन थांबली .

अगदी प्रामाणिकपणे सांगतो , लेखनानंद कायमच  मिळाला , असंख्य वाचकांचं प्रेम मिळालं  मात्र , ‘बालकृष्ण-लीला’ तसंच  ‘माई’ या माझ्या आईवर लिहिलेल्या दोन लेखांनी  जितकं थकवलं आणि मोठ्ठं समाधान दिलं , तेवढं अन्य  मजकुरानं दिलेलं नाही .

  [ बालकृष्ण दाभाडे यांचं सोबतचं  पोर्ट्रेट ‘चिन्ह’च्या २०११-१२च्या वार्षिक अंकावरुन साभार . हे पोर्ट्रेट दाभाडे यांचे नातू मनिषी यांनी फोटोशॉपच्या तंत्रज्ञानानं तयार केलेलं आहे . ] 

प्रवीण बर्दापूरकर

Cellphone  ​+919822055799

संबंधित पोस्ट