राजकारण नव्हे ही तर गटारगंगा !

( गणंग म्हणजे – ( १ ) धान्यांतील न शिजणारा दाणा ; भिजण्यांत मऊ न होतां , शिजविल्यानंतरही टणक राहणारा दाणा . जोंधळा इ. धान्याच्या लाह्या केल्या असता त्यातला न फुटलेला दाणा . ( २ ) (ल.) मूर्ख, टोणपा, अक्षरशत्रू , ठोंब्या , मतिमंद माणूस . —- वझे शब्दकोश )

हाराष्ट्रातल्या ( तसं तर देशातल्याही ) राजकारण्यांना होळी आणि शिमगा येण्याची वाट बघण्याची गरज उरलेली नाही इतकी आरोपाची राळ ते सदैव कुणा ना कुणावर उडवत असतात . सध्याचं महाराष्ट्राच्या राजकारणाचं चित्र तर होळी आणि शिमगा लाजेनं मान खाली घालतील इतक्या खालच्या पातळीवरच्या गटारगंगेसारखं झालेलं आहे . एकापेक्षा एक गणंग राजकारणात  आल्यावर यापेक्षा आणखी काय घडणार म्हणा !

शिवसेना नेते संजय राऊत यांची भाजपाच्या ( कथित साडेतीन ) नेत्यांवर आरोपांची फैर झाडणारी पत्रकार परिषद बघितल्यावर आपल्या देशातले राजकारणी कुरुपतेची लेणी लेवून कशी कोडगेपणाने वावरत आहेत याचीच अनुभूती आली . हेच संजय राऊत ( आणि त्या पंथातले सर्वच ! ) एक्सप्रेस वृत्तपत्र समुहात कधी काळी आपले सहकारी होते याची , त्यांचं पत्रकार परिषदेतील बोलणं आणि आविर्भाव बघून लाजच वाटली . पत्रकार परिषदेचा आमच्या पिढीतला एक रुढ असा साचा होता . ज्याला कुणाला पत्रकार परिषद घ्यायची असेल तो त्याचं म्हणणं कथन करणारं एक टिपण ( यात आरोपही आलेच ) पत्रकारांना देत असे . काही महत्त्वाचा मुद्दा किंवा आरोप जर असतील तर त्याच्या समर्थनार्थ पुराव्याच्या छायांकित प्रती जोडलेल्या असत . पत्रकार ते टिपण वाचत असतानाच ते टिपण देणारा त्याचं आणखी  काही म्हणणं असेल ते कथन करत असे . त्यानंतर प्रश्नोत्तरे होत असत . ( राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील मोजके नेते असं लेखी टिपण देण्यास अपवाद असत . ) यामुळे एखाद्यानं दुसऱ्यावर केलेल्या आरोपाबाबतचं त्याचं म्हणणं पत्रकाराजवळ पुराव्यासह लेखी उपलब्ध राहात असे .

अलीकडच्या दीड दोन दशकात पत्रकार परिषदेची ही परंपरा पार मोडीत निघाली असून राजकीय नेता वाट्टेल ते ‘बरळतो’ .  त्याचं शूटिंग होतं . शूटिंग होण्यामुळेच निवेदन देण्याची पद्धत बंद झाली असावी . प्रदीर्घ काळ एका वृत्तपत्राचंही संपादक पद सांभाळणाऱ्या संजय राऊत यांनाही  पत्रकारांसमोर म्हणजे वृत्तवाहिन्यांच्या ‘बूम’ समोर बोलत राहण्याची सवय लागली आहे . पत्रकार परिषद म्हणजे ‘शक्तिप्रदर्शन’ आणि ‘शेलक्या शिव्या’ असंही एक नवीन समीकरण रुढ केल्याची नोंद संजय राऊत यांच्या नावावर आता झाली आहे . त्यांनी किरिट सोमय्या यांचा जो काही शिवराळ या शब्दानं लाजेनं मान घालावी असा जो  उद्धार केला ही कोणत्याही संपादक किंवा संसद सदस्याची संस्कृती असू शकत नाही .  आपल्या संसदीय लोकशाहीची ती संस्कृती नाही आणि ते संचित तर नाहीच नाही . तीनवेळा राज्यसभेचं सदस्यत्व मिळालेल्या संजय राऊत यांना ‘ते’ शब्द संसदीय आहेत असा साक्षात्कार झाला असेल , तर तो त्यांनाच लखलाभ होवो . तो त्यांनी एखादा शिरपेचासारखा मस्तकी कायम मिरवला तरी आपण हरकत घेण्याचं काहीच कारण नाही . पत्रकार परिषदेच्या शेवटी तर पत्रकारांना एकही प्रश्न विचारण्याची संधी संजय राऊत यांनी , ते स्वत: एक पत्रकार असूनही दिली नाही किंवा एवढा मोठा टीआरपी मिळवूनही ‘ते साडेतीन’ कोण हे स्पष्ट केलं नाही . संजय राऊत यांच्या त्या पत्रकार परिषदेतल्या उक्ती आणि कृतीचं समर्थन करणाऱ्या सर्व पुरोगामी आणि प्रतिगाम्यांचंही जयजयकार करणं ,  एवढंच काय ते आता आपल्या हातात आहे !

संजय राऊतचं कशाला नारायण राणे , किरिट सोमय्या , नबाब मलिक , जितेंद्र आव्हाड , नाना पटोले , राम कदम अशी ही सर्वपक्षीय लागण राज्यात आहे . आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर तर नबाब मलिक यांनी जो काही आरोपांचा भडीमार केला होता , तो कोणत्याही सुसंस्कृततेच्या निकषावर कधीच बसणारा नव्हता . समीर वानखेडे यांची जात ते त्यांच्या वैयक्तिक आणि कौटुंबिक आयुष्याची होती नव्हती आणि आहेत नाहीत ती लक्तरं , नबाब मलिक यांनी महाराष्ट्राच्या वेशीवर टांगली .  समीर वानखेडेंच्या जात प्रमाणपत्राची वैधता सिद्ध झाल्यावरही नबाब मलिक यांना भान येऊ नये इतकी त्यांची पातळी घरसलेली राहिली . मुख्यमंत्र्यांनाही ‘अरे तुरे’ करण्याचा आणि मुख्यमंत्र्याच्या कानाखाली आवाज काढण्याचा शिवराळपणा करणारे नारायण राणे आणि त्यांचे चिरंजीवही  याच पंथातले आहेत असाच आजवरचा अनुभव आहे . नाना पटोले तर , त्यांची नियुक्ती शिवराळपणा करण्यासाठीच झालेली आहे असं समजतात . या प्रत्येकचं नेत्याचं ‘कर्तृत्व’ असं अफाट आहे . अतिशय खेदजनक भाग म्हणजे या नेत्यांचे वरिष्ठ कधी या संदर्भात त्यांची कानउघडणी करत नाहीत , याचा अर्थ त्यांच्या आशीर्वादानेच हे नेते असे बरळत असतात , हे जास्तच वाईट आहे .

शिव्यांचा भडीमार तर आहेच पण , कुत्रा मांजरांसारखे प्राणीही या नेत्यांनी भरडून काढलेले आहेत . ‘चायवाला’ , ‘फेकू’ , ‘पप्पू’ , ‘मातोश्रीवरचा बॉय’ असं महाराष्ट्राच्या लोकशाहीचं कुरुप राजकीय दर्शन हे नेते घडवत आहेत . यामुळे ‘लोकांचं , लोकांसाठी , लोकांनी चालवलेलं…’  ही लोकशाहीवादी उदात्त कल्पना या नेत्यांच्या गटारगंगेत कधीचीच वाहून गेली आहे. ‘काही नेत्यांनी , काही नेत्यांसाठी , काही नेत्यांचं…’असं ओंगळवाणं स्वरुप राजकारणाला सध्या  प्राप्त झालं आहे . राजकारण आणि राजकारणातील नेत्यांच्या महिला नातलगांनाही या गटारगंगेत ओढण्याचे बोल ऐकले किंवा वाचले की , कुणाही सुसंस्कृत माणसाची मान शरमेनी खाली जाते आणि तो नि:शब्दच होतो अशी लाजिरवाणी स्थिती आहे  .

भारती आणि यशवंतराव  चव्हाण मुक्त विद्यापीठाचे सेवानिवृत्त  कुलगुरु  डॉ . उत्तम भोईटे यांनी या संदर्भात फेसबुकवर दिलेला आचार्य अत्रे यांचा दाखला चपखल आहे . तो असा-

पुन्हा एकदा अत्रे यांच्या एका विनोदाची आठवण झाली

पुण्यात गर्दीच्या बुधवार चौकातून नुसती लंगोटी घातलेला एक माणूस चालला होता समोरुन  एक पूर्ण नागवा माणूस आला .

लंगोटीवाला त्याला म्हणाला , ‘तुला काही शरम वाटत नाही नागवा फिरताना , ही घे माझी लंगोटी ‘ .

लंगोटीवाल्या  माणसाने नागव्याला आपली लंगोटी काढून दिली !

-या पेक्षा खरंच काही वेगळं घडतंय का ?

या राज्यातला सर्वसामान्य माणूस , शेतकरी , कष्टकरी , दुर्गम भागात राहणारा आदिवासी यांच्या जगण्याशी , या सर्वांच्या प्रश्नाशी राजकारणाची झालेली गटारगंगा आणि त्या गटारगंगेत डुंबणारे राजकारणी यांचा काहीही संबंध नाहीच नाही  . या वर्गालाही या गणंग राजकारण्याच्या गटारगंगी राजकारणाशी काहीच देणंघेणं नाही . कारण आपल्या दैनंदिन तळहातावरचं जीणं जगताना बसणाऱ्या चटक्यांवर हे गणंग राजकारणी फुंकरही घालू शकत नाहीत , हे या वर्गालाही एव्हाना कळून चुकलं आहे .

राजकारणाच्या झालेल्या या गटारगंगेमुळे या नेत्यांचं जे खरं रुप लोकांसमोर येतं आहे ते चिंतनीय आहे . यांचे  कोट्यवधीचे आर्थिक ( गैर ! ) व्यवहार , त्यांची आलिशान जीवनशैली , बेकायदेशीर धनव्यवहार करणारे आणि अवैध व्यापार–उद्योगात गुंतलेल्या लोकांशी या गणंगांचे असणारे संबंध…या नेत्यांचं उघडं-नागडेपण स्पष्ट करणारं आहे ; आपल्या राजकीय नेत्यांचं हे स्वरुप विद्रुपतेचा कळस आहे . भलेही त्यांनी दोन चार कामं चांगली केली असतील तरी ; आपल्या लोकशाहीचं भवितव्य अशा या गणंगांच्या हाती मुळीच सुरक्षित नाही , अशी ही चिंतनीय स्थिती आहे . राजकारणाची झालेली ही गटारगंगा सर्वपक्षीय आहे त्यामुळेच ही चिंता काळीज कुरतडवणारी आहे . आपल्या राजकारणाच्या गंगेची अशी गटारगंगा होईल असा विचारही या देशातील कुणा लोकशाहीवादी आणि सर्वसामान्यही  माणसानं कधीच केलेला नव्हता…

शेवटी- सभागृहात चुकून ‘लाईज’ हा शब्द वापरला गेला म्हणून माफी मागणारे (  २ जून १९५१ ) पंडित जवाहरलाल नेहरु  काय  किंवा राम मनोहर लोहिया , पिलू  मोदी , अटलबिहारी वाजपेयी , नाथ पै , यशवंतराव चव्हाण , मधू लिमये , मधू दंडवते , रामभाऊ म्हाळगी , सुरेश प्रभू किंवा राज्यात एन . डी . पाटील , दत्ता  देशमुख , डि .  बी . पाटील , शंकरराव गेडाम , ग .  प्र . प्रधान , केशवराव धोंडगे , भाई वैद्य , प्रमोद नवलकर , मृणालताई गोरे , उत्तमराव पाटील , ए . बी . बर्धन , हशू अडवाणी , मधू देवळेकर , प्रभाकर संझगिरी , सुधीर जोशी प्रभृती राजकारणी आता पुन्हा दिसणं शक्य नाही…नवीन  पिढीला ही नावं दंतकथाही  वाटू शकतील कारण सभागृहातही रेटून खरं न बोलणारांची चलती आहे .

प्रवीण बर्दापूरकर

Cellphone  +919822055799

praveen.bardapurkar@gmail.com
www.praveenbardapurkar.com

संबंधित पोस्ट