भालचंद्र कांगो नावाचं ‘झाड’ !

■■स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेतर्फे दिला जाणारा पदमविभूषण गोविंदभाई श्रॉफ स्मृती पुरस्कार यंदा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सचिव डॉ. भालचंद्र कांगो यांना  नुकताच प्रदान करण्यात आला . त्याप्रसंगी भालचंद्र कांगो  यांच्या परिचयपर केलेल्या भाषणाचा हा संपादित भाग – ■■

मित्राबद्दल बोलायचं म्हणजे काहीसं आत्मपर बोलावं लागतं . भालचंद्र कांगोला मी १९७२-७३ पासून ओळखतो . तो मला केव्हापासून ओळखतो ते ठाऊक नाही . मला आता कुणी तरी सांगत होतं की, भालचंद्र कांगो आता वयाची पंच्याहत्तरी गाठत आहे म्हणून . लोक अफवा पसरवतात याच्यावर माझा ठाम विश्वास आहे आणि सध्याच्या परिस्थितीत तर तो फार ठाम झाला आहे . कारण अफवा पसरवणारे सध्या राज्यात आणि केंद्र सत्तेमध्ये आहेत . एक स्पष्ट सांगतो , भालचंद्र म्हातारा होऊ शकतो याच्यावर माझा विश्वास नाही . तो मनाने कायम तरुण राहणार आहे .

भालचंद्र कांगो आणि मराठवाड्यातील तेव्हाच्या युवक नेत्यांनी जेव्हा औरंगाबादला मराठवाड्याच्या विकासासाठी आंदोलन सुरु  केलं तेव्हा मी कन्नड नावाच्या तालुक्याच्या गावी कॉलेजला प्री डिग्रीला शिकत होतो .  दैनिक ‘मराठवाडा’त ज्या काही बातम्या येत असत , त्या बातम्या वाचून आम्ही आपलं कन्नडमध्ये बंद करणं  , मोर्चे काढणं वगैरे वगैरे अशी आंदोलनं  करत असू . त्यावेळी कन्नडच्या नगराध्यक्षांचा राजीनामा घेतला म्हणून लक्ष्मण काळे आणि मी जरा प्रकाशात आलो होतो . आमची ती कन्नडची समिती पण मजेशीर होती . लक्ष्मण काळे आता मुंबईत सीए आहे . तो अध्यक्ष आणि मी सेक्रेटरी अशी स्वयंघोषित समिती होती . कांहीही कागदपत्र नव्हती  . तोपर्यंत माझा आणि भालचंद्र कांगोचा काही परिचय नव्हता . कृती समितीची काहीतरी मीटिंग एकदा औरंगाबादला होती म्हणून मी आलो होतो . त्या बैठकीच्या निमित्ताने भालचंद्र कांगोची ओळख झाली . मग भालचंद्रच्या सभा ऐकता आल्या . भालचंद्र कांगो तेव्हा ‘हिरो’ होता . बहुतेक त्याच्या त्या ‘हिरोइजम’लाच सुजाता बळी पडली असावी , असा माझा दाट संशय आहे पण , मी त्याच्याबद्दल काही बोलत नाही.

भालचंद्र मुळाचा औरंगाबादचा नाही . माझ्या माहितीप्रमाणे मुळचा मराठवाड्यातलाही नाही . लहानपणी मला कीर्तन आणि प्रवचन ऐकण्याचा छंद आईनं लावला होता . त्यामुळे तुझी भाषा सुधारेल आणि प्रतिपादनं  कशी करता येतात हे लक्षात येईल . हे असं सांगण्यामागचा तिचा हेतू होता . तेव्हा एक प्रवचनकार खूप छान दृष्टांत द्यायचे . ते लग्न ‘दोन कुटुंबात जुळले’ असं कधी म्हणायचे नाही तर ‘अमुक  गावी सोयरीक जुळली’ असं म्हणायचे . एक दिवस मी त्यांना विचारलं की असं का म्हणता तुम्ही . तर ते म्हणाले, मुलगी उठून या घरातून त्या घरात जात नाही . उठून या गावातून त्या गावात जाते . जसं माणूस नोकरी करण्यासाठी दुसऱ्या गावात जातो . दुसऱ्या गावात गेल्यावर  त्यानं झाड व्हायचं असतं . माणसानं दुसऱ्या गावात जाऊन रुजायचं असतं , तिथेच अंकुरायचं असतं , फुलायचं असतं आणि  फळायचं असतं . इतकं त्या वातावरणाशी एकरुप व्हायचं असतं . भालचंद्र कांगोकडे बघताना त्या प्रवचनकारानं म्हटलेलं झाड सातत्यानं मला आठवतं . तो जरी मूळ मराठवाड्यातला नव्हता पण , तो मराठवाड्यात आला आणि पूर्णपणाने रुळून गेला . या वातावरणामध्ये तो विरघळून गेला .

तो नुसता राजकारणी राहिला असता , चळवळ्या राहिला असता तर फारसं काही बिघडलं नसतं . तेव्हाचं ते मध्यमवर्गीय वातावरण होतं पण , तो बहुपेडी  होत गेला .तो तेव्हा वैद्यकशास्त्रात शिक्षण घेत होता. डॉ. प्रदीप मुळे आणि डॉ. मिलिंद देशपांडे यांच्यासोबत मला बघितल्यामुळे ;  विशेषत: डॉ. प्रदीप मुळेसोबत बघितल्यावर त्याचं माझ्याविषयी बरं मत झालं असावं . कारण तेव्हा मी जास्त आक्रमक होतो . तेव्हाही अंबाजोगाई वगैरे ठिकाणी मी त्याच्याशी वादही घातलेले होते . भालचंद्र कांगोची ती जी जडणघडण आहे ती मी फार लांबूनही नाही आणि फार जवळूनही नाही पण , बघितली हे नक्की. मी त्याचा कौटुंबिकही मित्र नाहीआणि दूरचाही मित्र नाही . १९७७ साली मी पत्रकारिता करण्यासाठी औरंगाबाद सोडल्यानंतर मुंबई , नागपूर , दिल्लीत , मराठवाड्यातला जो कोणी माझ्या नियमित संपर्कात होता त्याच्यापैकी भालचंद्र कांगो होता . या सत्काराच्या निमित्ताने जेव्हा बोलण्याचं मला सांगण्यात आलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की , तेव्हाच्या भालचंद्रचं एक विशाल झाड झालंय . तो वक्ता तर उत्कृष्ट आहेच . तेव्हाच त्याच्या सभेला दोन दोन, चार चार हजार लोकं आलेले मी पाहिलेले आहेत . आताची जी ‘स्टार’शिप आली आहे , ती तेव्हा तो आणि विजय गव्हाने यांच्या वाट्याला होती . भालचंद्र संपादक आहे , राजकारणी आहे , समाजकारणी आहे , तो डॉक्टर आहे , तो कामगार नेता आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इतकं सगळं कॉम्बिनेशन असलेला एक सुसंसकृत माणूस आहे . कधी भालचंद्र कांगोसाठी लिहिलं , कधी पत्रकार म्हणून भालचंद्र कांगोच्या पत्रकार परिषदेसाठी साठी गेलो . मी राजकीय वृत्त संकलनात होतो . डावी चळवळ कधी हा माझा कव्हरेजचा विषय नव्हता पण आमच्या ओझरत्या का असेना भेटी होत होत्या .

भालचंद्र कांगोविषयी मला मुळत: अॅफेक्शन होतं . जवळीक होती . त्याच्याशी आपण खूप रिलेक्ट होऊ शकतो , असं सातत्यानं वाटायचं . याचं एक कारण कदाचित तो समाजवादी असण्यामध्ये होतं . पुन्हा सांगतो तेव्हा तो समाजवादी  विचारांचा होता . ‘युक्रांद’मध्ये होता . तेव्हा कुमार सप्तर्षी , अरुण लिमये ही सगळी मंडळी महाराष्ट्राची ‘स्टार’ तरुण मंडळी होती ; त्यांच्यात भालचंद्र  होता . त्यानं  मराठवाड्यात अनेक आंदोलनं उभारली. बाय द वे , त्यानं  समाजवाद का सोडला मला माहीत नाही . सुजाताकडे बघून सोडला की , चंद्रगुप्त चौधरींच्या विचाराने प्रभावित होऊन सोडला त्याचं काही मी संशोधन केलं नाही किंवा करण्याचं कारणही नाही . कारण तो डाव्या चळवळीत गेला आणि तिथे खूप छान स्थिरावला . त्याचं राज्यस्तरीय, राष्ट्रस्तरीय होणं हे सगळं बघता आलं .

पण, भालचंद्र तू समाजवादीपण सोडलं हे फार छान केलं. समाजवाद्यांची साथ जर सोडली नसती तर तुझी आजची अवस्था फार वाईट असती . आमचे काही समाजवादी लालकृष्ण अडवाणींच्या सोबत गेले , काही समाजवादी अटलबिहारी वाजपेयींच्या सोबत गेले . या दोघांनी ज्यांना प्रभावित केलं नाही त्यापैकी कांहीजन  स्वत:हून

संस्थेचे अध्यक्ष , माजी आमदार डी . के देशमुख यांच्या हस्ते गोविंदभाई श्रॉफ सन्मान स्वीकारताना डॉ. भालचंद्र कांगो , शेजारी त्याची पत्नी सुजाता .

हिंदुत्ववाद्यांच्यासोबत  गेले . जे ( आमच्यासारखे ) आता शिल्लक आहेत ते फार क्षीण शक्तीचे आहेत . कुठंतरी वृत्तपत्रात काही तरी लिहितात नाही तर समा जमध्यमांवर पोस्टस लिहितात आणि उमाळे  टाकत बसतात , अशी  उरलेल्या बहुसंख्य समाजवाद्यांची  अवस्था झाली आहे ! त्यात ‘तीन समाजवाद्यांचे चार पक्ष’ ही जी परंपरा आमच्या नेत्यांनी निर्माण केली त्याच्यामुळे राजकीय क्षेत्रात समाजवाद्यांचं जास्त नुकसान झालं . त्यामुळे कांगो तिकडे म्हणजे , डावीकडे गेला हे चांगलंच झालं . नुसताच डावीकडे गेला नाही तर चार-साडेचार दशकं एकनिष्ठ राहिला . त्यानं त्या निष्ठांशी कुठे प्रतारणा केली नाही. व्यभिचारी वृत्ती कधी दाखवली नाही .

खरं तर , याच काळात डावी चळवळ देखील क्षीण होत चाललेली होती पण , त्याच्याशी त्याने कधी तडजोड केली नाही . तरुणपणामध्ये भालचंद्रनं ज्या काही चळवळी औरंगाबाद , मराठवाड्यामध्ये उभ्या केल्या . विकासाचं आंदोलन , विद्यापीठाचं आंदोलन उभं केलं . वैद्यकीय महाविद्यायातील जे जातीय समीकरण होतं वातावरण होतं ते मोडून काढणारा ‘मार्ड’चा सरचिटणीस म्हणून अँटी रॅगिंग समिती स्थापन करणारा बहुतेक हा भारतातला पहिला असावा . अशा या सगळ्यात तो होता . रानडे वक्तृत्व स्पर्धेत कन्नड कॉलेजचा प्रतिनिधी म्हणून त्याच्यासोबत जाण्याचं मी धाडस केलं होतं . मी नुकताच गावखेड्यातून आलेला होतो . नुकतीच सुरुवात होती . त्यात इंग्रजी . अर्थात भालचंद्र समोर माझा निभाव लागणं शक्यच नव्हतं . कारण त्याचं आधीचच वाचन भरपूर होतं . त्याची इंग्रजीची उधळण इतकी अप्रतिम असायची . मूलत: त्याचं मराठी अतिशय चांगलं होतं . सतत तो वाचत होता . शिवाय या सगळ्यामध्ये सर्वात महत्त्वाचा भाग असा होता की , त्याची वृत्ती अभ्यासू होती . त्याच्यामुळे त्याला समाजामध्ये काय चाललंय आणि काय नाही याचं मोठं भान होतं .

या सगळ्यातून भालचंद्र  घडत गेला . ‘युक्रांद’ मधून म्हणजे समाजवादी विचार सोडून तो डाव्यांच्या कळपात सामील झाला . मी कळप हा शब्द चांगल्या अर्थानं वापरतोय आणि तिथे तो रुळला . पण , तो तसा साधाच राहिला . कामगार नेता म्हणून त्याने सुरुवातीच्या काळात नाव कमावलं तेव्हा आम्ही कामगार नेता म्हणून दत्ता सामंतकडे बघायचो . ‘आग ओकणे’ ज्याला म्हणतो , अशा पद्धतीचं ते नेतृत्व होतं . नंतरच्या काळात कामगार नेत्यांमध्ये खूप घोषित/अघोषित तडजोडी आल्या . विशेषत: जागतिकीकरण आणि खुल्या  अर्थव्यवस्थेचं वारं वाहू लागल्याच्या सुरुवातीच्या आणि नंतरच्या काळामध्ये . पण , या सगळ्याचा भालचंद्र कांगोला कुठे स्पर्शही झाला नाही . त्याने कामगाराचं हित बघितलं आणि उद्योगाचही  हित बघितलं , अतिशय विवेकनिष्ठ अशा भूमिका घेऊन . भालचंद्र कांगोच्या भूमिकेमुळे एखाद्या तरी  कामगारावर कुठे कपातीची संक्रात कोसळली , असं कधी झाल्याचं मला आठवत नाही . कामगार नेत्यांमध्ये तेव्हा प्रामुख्याने भांडकुदळ, आक्रस्ताळी वृत्ती असायची . तेव्हा ‘ही काय संस्कृती’ असे आम्ही म्हणायचो . आता राजकारणाची ती संस्कृती झाली आहे पण , त्या संस्कृतीचा भालचंद्र कांगोला स्पर्श झाला नाही . मला वाटतं डाव्या चळवळीत कॉमरेड  ए. बी. बर्धन यांच्यासोबत राहिल्यामुळे कदाचित भालचंद्रमध्ये जी सुसंस्कृतता आहे , ती अभेद्य राहिली असावी . दिल्लीतील माझे मित्र सांगतात की, दिल्लीमध्ये कम्युनिस्ट पक्षामध्ये बर्धन साहेबांची जागा घेऊ शकेल अशा पद्धतीचं त्याचं अतिशय शांत असं वर्तन आहे . योगायोगाचा भाग असा आहे की , बर्धन आणि कानगो या गुरु-शिष्याच्या जोडीतील दोघांसोबतही पत्रकारिता करण्याचं , त्यांच्याशी मैत्री करण्याचं भाग्य मला मिळालं .

असा हा  भालचंद्र कांगोचा जो राजकीय प्रवास आहे . तो मला एक पत्रकार म्हणून , एक मित्र म्हणून बघता आला . त्या भालचंद्र कांगोचा आज गोविंदभाई श्रॉफ सन्मान देऊन सत्कार करण्यात आला . मी सन्मान म्हणतो पुरस्कार नाही . आपण काय  त्याला पुरस्कृत करणार ? भालचंद्रचं काम मोठं आहे पण , त्याला स्वत:चे ढोल वाजवण्याची सवय नसल्यामुळे ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही . म्हणून त्या कामाचा सन्मान म्हणतोय मी .

भालचंद्रनं  निवडणुकाही लढवल्या . आपण समाज म्हणून फार द्ररिद्री आहोत . कर्मद्ररिद्री आहोत . अलीकडच्या   ३० -४० वर्षात आपल्याला चांगल्या लोकांची कदरच निवडणुकांत राहिलेली नाहीये . त्यामुळे भालचंद्र  निवडणुकीत यशस्वी झाला नाही . बाकी सर्वार्थानी तो राजकारणी आणि कामगार नेता म्हणून यशस्वी झाला . कौटुंबिक खूप कर्ता पुरुष म्हणून यशस्वी झाला का नाही ते सुजाता आणि मयूरी सांगतील . त्याच्याबद्दल आपल्याला सांगण्याचा काही अधिकार नाहीये . पण एवढ्या वर्षात त्या दोघीपैकी कोणाची काही तक्रार नाहीये म्हणजे त्याही पातळीवर तो चांगला राहिला असावा असं आपण गृहीत धरु यात !

आजच्या गढुळलेल्या वातावरणामध्ये भालचंद्र कांगोंसारखे लोकप्रतिनिधी खालच्या आणि वरच्या सभागृहात , राज्य आणि केंद्र दोन्ही पातळीवर नाहीत, याची फार खंत मला  वाटते . मी १९८० साली विधीमंडळाच्या रिपोर्टिंगला सुरुवात केली . पुढे सलग २३ वर्षे मी विधिमंडळ रिपोर्टिंगमध्ये होतो. तेव्हाचं विधिमंडळाचं सभागृह आणि आताच सभागृह यात महद‌् अतंर आहे . संसद कव्हर करता आली . भालचंद्र ज्या विचाराचं प्रतिनिधित्व करतो , त्या विचाराचे ५५, ५७, ६० एकदा तर ६३ सदस्य लोकसभेमध्ये होते . अतिशय मोठ्ठा तो आवाज होता . तो आवाज आता क्षीण झालाय  . सर्वसामान्य माणसाचे , सर्वसामान्य जनतेचे , गोरगरिबांचे , आदिवासींचे , वंचितांचे प्रश्न पोटतिडकीने मांडणारे लोकप्रतिनिधी  आता संसदीय सभागृहामध्ये दिसत नाही , ही माझी खंत आहे . अशा परिस्थितीमध्ये भालचंद्र कांगोसारखे लोक जर आपण सभागृहामध्ये निवडून दिलं असतं आणि अशा लोकांची संख्या जर मोठी राहिली असती तर आज काही जी राजकारणाची अधोगती झाली आहे , अगदी स्पष्टच शब्दात सांगायचं झालं तर जे अध:पतन झालं आहे , ते अध:पतन आपल्याला पाहायला मिळालं नसतं याची मला खात्री आहे . अध:पतन ही मूलभूत प्रक्रिया आहे , हेही मला मान्य आहे पण , ते इतक्या मोठ्या प्रमाणात जेव्हा होतं तेव्हा मन भयकंपित होतं . अशा परिस्थितीमध्ये भालचंद्र कांगोकडे मी एक शांतपणे तेवणारी ज्योत म्हणून बघतो . आमची ही आशेची ज्योत आहे . अशा या भालचंद्र कांगो नावाच्या ज्योतीचा आज हा जो सन्मान करण्यात आला त्याचा मला खूप आनंद आणि अभिमान आहे . ( संपादन/शब्दांकन- अर्चना जोशी )

इथेच थांबतो . नमस्कार .                                                                         

प्रवीण बर्दापूरकर
९८२२०५५७९९
praveen.bardapurkar@gmail.com

संबंधित पोस्ट