देशाच्या विकासाला निर्णायक दिशा देणारा नेता

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत , मनमोहन सिंग राज्यसभेतून निवृत्त झाले ही बातमी माध्यमांच्या कोपऱ्यात लपून गेली . ( जग जरी मनमोहन सिंग या नावानं त्यांना ओळखत असलं तरी ते मात्र स्वाक्षरी ‘मनमोहन सिंह’ अशी करत . ) देशाचे माजी पंतप्रधान आणि त्या आधी , रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर , केंद्रीय अर्थमंत्री , जागतिक कीर्तीचे अर्थतज्ज्ञ एवढीच कांही मनमोहन सिंग यांची ओळख नाही . आजचा जो विकसित भारत दिसतो आहे त्यांची पायाभरणी करणारे मनमोहन सिंग आहेत . पंतप्रधान पी. व्ही . नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री म्हणून काम करताना मनमोहन सिंग यांनी या देशात खुली अर्थव्यवस्था आणि जागतिकीकरणाची जी मुहूर्तमेढ  केली त्यांची फळं आज आपण चाखत     आहोत . म्हणूनच मनमोहन सिंग यांच्या या नव्या भारतातलं स्थान आणि महत्त्व अनन्यसाधारण आहे .  त्यांचं वय आता ९१ आहे म्हणजे ते एका अर्थानं राजकारणातूनही निवृत्त झाल्यासारखे आहेत पण , विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तसा निरोप मनमोहन सिंग यांना देणं टाळलं कारण ऐन निवडणुकीच्या वातावरणात मनमोहन सिंग यांना त्यांच्या कर्तृत्वाला साजेसा निरोप देणं नरेंद्र मोदी यांना अडचणीचं वाटलं असणार . शिवाय विरोधी विचारांच्या लोकांशी किमान उमदेपणानं वागल्याचे नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या दहा वर्षांच्या किरकीर्दीतले दाखलेही फारसे नाहीत . नरेंद्र मोदी यांच्या ऐवजी जर आज अटलबिहारी वाजपेयी देशाचे पंतप्रधान  असते तर मनमोहन सिंग यांना सन्मानानं निरोप दिला गेला असता यात शंकाच नाही . मनमोहन सिंग यांना देशातर्फे निरोप देणं भारतीय संसदीय लोकशाहीच्या  उच्च परंपरेला साजेसं ठरलं असतं पण , हे कुणाला सांगणार आणि ते कुणाला कळणार ? आधी म्हटल्याप्रमाणं विद्यमान सत्ताधार्‍यात तेवढा उमदेपणा ,  सुसंस्कृतपणा  नाही . मनमोहन सिंग नावाच्या आपल्या या हिमालयाच्या उंचीच्या नेत्यांच्या  सन्मानार्थ एखादा शानदार कार्यक्रम आयोजित करावा तेवढं शहाणपण पराभवाच्या गर्तेत सापडलेल्या काँग्रेस पक्षाकडे उरलेलं नाही हे तर वेगळ्या पातळीवरचं दारिद्र्य आहे .Manmohan Singh

मनमोहन सिंग यांची स्वाक्षरी – सौजन्य – विकीपीडिया 

देशाला विकासाच्या वेगळ्या वाटेवर नेणारं व्यक्तिमत्व एवढीच कांही मनमोहन सिंग यांची ओळख नाही . त्यांच्या राजकारण आणि प्रशासनाला अर्थकारणांची खोलवार जाण होती . राजकारणाचा अर्थशास्त्रीय विचार करणारे ते देशाचे पहिले पंतप्रधान होते . यांचा अर्थ ते कुशल राजकारणी नव्हते असे नव्हे ; अमेरिकेशी केलेल्या अणु कराराच्या  वेळी तीव्र विरोध करणाऱ्या डाव्यांना एकटं पाडण्याचा मुत्सद्दीपणा त्यांनी कसा दाखवला आणि परिणामी देशाच्या डाव्यांची ताकद कशी क्षीण झाली हे कांही वेगळं सांगायला नको . मंत्री मंडळातील सहकाऱ्यांवर होणाऱ्या गैरव्यवहाराच्या आरोपांबाबत जाहीरपणे बोलत नाही म्हणून ‘मौनी बाबा’ , ‘सोनियांच्या ताटाखालचं मांजर’ आणि लोकसभेच्या विरोधी पक्ष नेत्याकडून तर ‘देशाचा सर्वात कमजोर पंतप्रधान’ अशी जहरी टीका त्यांना सहन करावी लागली पण , या टीकेला त्यांनी कधीच भीक घातली नाही हेही तेवढंच खरं . पक्षांतर्गत त्यांचे कांही कमी विरोधक नव्हते पण त्या कुणाबद्दलही मनमोहन सिंग कधीच आकसाने वागले नाहीत कारण त्यांचा स्वभावच ऋजु आणि सुसंस्कृत होता .यांचा अर्थ ते मुखादुर्बल होते असे नव्हेच ; जे कांही बोलायचं ते संयत आणि ठामपणे बोलण्याची  त्यांची शैली होती . मनमोहन सिंग यांचा पक्ष किंवा सरकारात कोणताही दबाव गट नव्हता ; होता तो केवळ त्यांच्या विद्वतेचा आणि स्वच्छ प्रशासनाचा सात्विक दबदबा ! आता संसदीय आणि सक्रिय राजकारणातून डॉ . मनमोहनसिंग निवृत्त झाल्यातच जमा  असलं  तरी , या देशाला आर्थिक खाईतून वर काढणारे , देशात विविधांगी प्रगतीच्या वाटा निर्माण करणारे आधी अर्थमंत्री आणि नंतर सलग दहा वर्ष पंतप्रधान राहणारे द्रष्टे नेते म्हणून त्यांचं नाव कायम स्मरणात राहणार आहे .

प्रदीर्घ काळच्या पत्रकारितेत मनमोहन सिंग यांना केंद्रीय अर्थमंत्री आणि पंतप्रधान म्हणूनही मला अनुभवता आलं . प्रसंग १९९३च्या फेब्रुवारी महिन्यातला . स्थळ नागपूरच्या रवी भवनातील हॉल . केंद्रीय अर्थमंत्र्याची पत्रकार परिषद सुरु असतांना एका पत्रकारानं एका राष्ट्रीयीकृत बँकेचा उल्लेख करुन या बँकेच्या सेंट्रल अव्हेन्यू शाखेत नेहेमीच जुन्या व फाटक्या नोटा मिळतात अशी तक्रार केली आणि नवीन करकरीत नोटा देण्याचे आदेश त्या बँकेच्या व्यवस्थापकाला द्यावेत अशी मागणी केली . पत्रकार परिषदेत सन्नाटा पसरला कारण ज्यांची अर्थशास्त्रज्ञ व तज्ज्ञ म्हणून जागतिक पातळीवर ओळख होती ते डॉ . मनमोहन सिंग समोर होते आणि केंद्रीय अर्थमंत्र्यांना कोणता प्रश्न विचारु नये याचं तारतम्य पूर्ण मातीत मिसळलेलं होतं .  डॉ . मनमोहन सिंग यांनी एक पॉझ घेतला , नंतरच्या काळात सर्व परिचित झालेलं त्यांचं हलकंसं स्मित दिलं आणि ‘वुईच बँक’ असं विचारलं . त्या पत्रकारांनं बँक आणि शाखेचं नाव सांगितलं . ‘आय वुईल लुक इन टू द मॅटर’, असं डॉ . मनमोहन सिंग यांनी सांगितलं आणि ‘नेक्स्ट क्वश्चन प्लीज’ असं आमंत्रण पत्रकारांना पुढील प्रश्न विचारण्यासाठी दिलं . हे सगळं अचानक घडलं तरी डॉ . मनमोहन सिंग यांच्या त्या शांतपणानं आम्ही स्तिमितच झालो .

दुसरा अनुभव तर हृद्यच आहे . जगातील कांही प्रमुख देशांची शिखर संस्था असलेल्या जी-२० संघटनेची बैठक रशियातील सेंट पीटसबर्ग इथं २०१३मध्ये झाली . या आंतरराष्ट्रीय बैठकीत सहभागी होण्यासाठी गेलेल्या पंतप्रधान डॉ . मनमोहन सिंग यांच्या चमूत एक पत्रकार म्हणून माझा समावेश झाला तो विजय दर्डा यांच्यामुळे ; त्यावेळी मी लोकमत वृत्तपत्र समुहात राजकीय संपादक म्हणून दिल्लीत कार्यरत होतो . बाय द वे , परदेशी दौऱ्यात तर पत्रकारांना सोबत सहभागी करुन घेण्याची पद्धत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रद्द केली आहे .

मायदेशी परतीच्या प्रवासात पंतप्रधानांनी उडणार्‍या विमानातच एक पत्रकार परिषद घेण्याचा रिवाज तेव्हा होता . ( ‘पंतप्रधानांच्या विमानातून’ अशी डेट लाईन असलेल्या बातम्या अनेकांना आठवत असतील .) त्याप्रमाणे पत्रकार परिषदेसाठी रशियातून भारतात परततांना , पत्रकार बसलेल्या विमांनाच्या मध्यवर्ती भागात डॉ . मनमोहन सिंग आले . सर्व पत्रकारांनी अदबीनं उठून उभं राहून पंतप्रधान डॉ . मनमोहन सिंग यांना अभिवादन केलं . हात जोडून सस्मित पत्रकारांनी केलेल्या सामूहिक अभिवादनाचा स्वीकार केल्यावर , केल्यावर , स्वत:च्या आसनाकडे जाण्याऐवजी पंतप्रधान डॉ . मनमोहन सिंग यांनी प्रत्येक पत्रकाराच्या आसनाजवळ जाऊन त्याच्याशी हस्तांदोलन केलं . हे इतकं अनपेक्षित घडलं की उपस्थित २२/२३ पत्रकारांपैकी कुणालाही डॉ . मनमोहन सिंग यांच्यासोबत छायाचित्र काढण्याचंही भान राहिलं नाही ; अर्थात याची चुटपुट नंतर सर्वांनाच लागली . महापालिकेचा तर सोडाच , नगर पंचायत किंवा पंचायत समितीचा सदस्य झाल्यावर माज ओतप्रोत अंगात भिनलेले लोकप्रतिनिधी गल्लीबोळात एका किलोग्रॅमला हजार पाहायला मिळत असल्याचे दिवस आलेले असतांना पंतप्रधानासारख्या देशाच्या सर्वोच्च्चपदी असणार्‍या शिवाय उच्चविद्याविभूषित असणार्‍या या माणसाचा हा सुसंस्कृतपणा आणि नम्रता ‘वाखाणणे’ या शब्दात मुळीच मावणारी नाही . चार दशकांच्या पत्रकारितेत कांही पंतप्रधान जवळून तर कांही लांबून पाहता आलं मात्र , असा सच्चा , साधा , नम्र आणि सुसंस्कृत पंतप्रधान केवळ डॉ . मनमोहन सिंग हेच एकमेव .

मनमोहन सिंग यांचा पक्ष किंवा सरकारात कोणताही दबाव गट नव्हता ; होता तो केवळ त्यांच्या विद्वतेचा आणि स्वच्छ प्रशासनाचा सात्विक दबदबा ! त्यामुळे आता संसदीय आणि सक्रिय राजकारणातून डॉ . मनमोहन सिंग निवृत्त झाल्यातच जमा होणार असले तरी , या देशाला आर्थिक खाईतून वर काढणारे , देशात विविधांगी प्रगतीच्या वाटा निर्माण करणारे आधी अर्थमंत्री आणि नंतर सलग दहा वर्ष पंतप्रधान राहणारे द्रष्टे नेते म्हणून त्यांचं नाव कायम स्मरणात राहणार आहे .

कोणत्याही वादळ-वार्‍याला न जुमानता एखाद्या विस्तीर्ण माळरानावर एकमेव हिरवा कंच  , विस्तीर्ण , डेरेदार महावृक्ष अविचल उभा असावा , तसे भारतीय राजकारणात डॉ . मनमोहन सिंग किमान मला तरी कायम वाटत आले . डॉ . मनमोहन सिंग हे कांही कोणत्याच अंगानं राजकारणी नव्हते , ते होते एक सुसंस्कृत ,  ॶॅकेडेमिशियन , अर्थतज्ज्ञ . तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांनी त्यांना राजकारणात ओढलं आणि थेट देशाचं अर्थमंत्री केलं तर सोनिया गांधी यांच्यामुळे ते पंतप्रधान झाले . माणसांच्या कर्तृत्वाचं मूल्यमापन अनेकदा दृष्यमान नसलेल्या बाबींवरुन करायचं असतं . पी. व्ही. नरसिंहराव यांच्या नेतृत्वाखाली अर्थमंत्री म्हणून डॉ . मनमोहन सिंग यांनी देशात जागतिकीकरण आणि आर्थिक उदारीकरणाचं धोरण अंमलात आणलं ; त्यांचं सरकार पायउतार झाल्यावर केंद्रात नंतर आलेल्या देवेगौडा , इंदरकुमार गुजराल आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील कोणत्याही सरकारांनी त्या धोरणात किंचितही बदल केला नाही , यावरुन त्या धोरणांची आणि ते आखणार्‍या माणसाच्या दूरदृष्टीची महती लक्षात घ्यायला हवी .

 श्रीमती सोनिया गांधी  आणि  पी.व्ही. नरसिंहराव यांच्यासोबत मनमोहनसिंग .

पी. व्ही. नरसिंहराव यांनी पंतप्रधान म्हणून देशाचं नेतृत्व स्वीकारलं तेव्हा देश एकाच वेळी अनेक अरिष्टांच्या खाईत सापडलेला होता . राजीव गांधी यांची नुकतीच हत्या झाल्यानं राजकीय आघाडीवर सैरभैरता होती ; मंडल आयोगाच्या अंमलबजावणीनंतर देशभर आगडोंब उसळवण्यात आलेला होता , त्यामुळे देशाच्या अनेक भागात हिंसक वातावरणही होतं ; त्यातच राम मंदिराच्या उभारणीच्या नावाखाली हिंस्र धर्मांधतेची लाट देशभर निर्माण केली जात होती ; देशाचं सोनं गहाण टाकलेलं होतं आणि आर्थिक वाढीचा दर चार टक्क्यांपेक्षा खाली गेलेला होता . नरसिंहराव यांनी देशाला या खाईतून वर काढलं कारण त्यांना समर्थ साथ मिळाली ती डॉ . मनमोहन सिंग यांची . ( नरसिंहराव यांना डॉ . मनमोहन सिंग गुरु मानतात हेही नोंदवून ठेवणं जसं गरजेचं आहे तसंच पक्षश्रेष्ठींकडून गुरुचा अक्षम्य अवमान झाला तरी त्यांच्या या शिष्यानं त्यासंदर्भात आवाज न उठवता कायम नमतं घेतलं , याचीही नोंद घ्यायला हवीच .) पुढे पंतप्रधान झाल्यावर हीच धोरणे डॉ . मनमोहन सिंग यांनी शांत पण कणखरपणे राबवली . आज आपल्याकडे जी आर्थिक सुबत्ता आलेली आहे ; आधुनिक तंत्र आणि यंत्रज्ञान अभिमानानं मिरवणारा मूलभूत सोयी-सुविधांच्या वाटांवर चालणारा जो देश दिसतो आहे , ती त्या धोरणाला लागलेली मधुर फळं आहेत आणि त्याबद्दल डॉ . मनमोहन सिंग यांच्याविषयी कृतज्ञतेची भावना भारतीयांनी कायम बाळगायला हवी .  डॉ . मनमोहन सिंग नावाच्या ३३  वर्ष राज्यसभेचं सदस्यत्व भूषवलेल्या सदस्यानं त्या धोरणांची बीजं पेरली होती हे विसरता कामा नये . म्हणूनच डॉ . मनमोहनसिंग यांची राज्यसभेतून निवृत्ती ही एका माणसाची नाही तर एका सुबत्त कर्तृत्वाची आहे . कधीही वायफळ न बोलता , स्वकर्तृत्वाचा कोणताही गाजावजा न करता ,  टिमकी न वाजवता ‘सिंग इज किंग’ हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे आणि असा राजा लोकांच्या मनातून कधीच निवृत्त होत नसतो .

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत डॉ . मनमोहनसिंग नावाचा हा वृक्ष अनेक वादळ-वार्‍यांना तोंड देत अविचल होता . त्यांना त्यांच्या तोडीचे सहकारी फारच कमी लाभले ; त्यांचे बहुसंख्य सहकारी विचारानं खुरटे आणि ऊंचीनं खुजे होते ; या खुरट्या आणि खुज्यांनी डॉ . मनमोहनसिंग यांना पूर्ण क्षमतेनी काम करु दिलं नाही उलट सतत अडवणूकच कशी केली याचे असंख्य दाखले चर्चेत आहेत . पक्षातूनही त्यांना कायम प्रखर विरोध झाला , सरकारात अनेक मंत्र्यांनी त्यांची अडवणूक केली ; त्यांच्याच पक्षातील भावी नेतृत्वाकडून जाहीरपणे अवहेलना वाट्याला आली तरी डॉ . मनमोहन सिंग नावाचा विशाल वृक्ष देशाला सुबत्तेची सावली देण्यासाठी अविचल राहिला . डॉ . मनमोहनसिंग नावाच्या या महावृक्षाची सुबत्त सावली या देशाला यापुढेही अशीच मिळत राहो .

प्रवीण बर्दापूरकर   

Cellphone  +919822055799

www.praveenbardapurkar.com

 

 

संबंधित पोस्ट