नितीशकुमारांची अगतिकता…

बिहार राज्यात सत्तापालट करण्याचा जो खेळ नितीशकुमार यांनी गेल्या आठवड्यात रंगवला , त्यावर टीका करायची ठरवली तर ‘कंबरेचं सोडून डोक्याला बांधणं’ अशी करता येईलही पण , तो नितीशकुमार यांच्या आजवरच्या संधीसाधू धोरणांशी सुसंगत असा ठरवून खेळलेला अगतिक डाव आहे . कायमच येनकेन प्रकारे सत्तेत राहण्याचं राजकारण करणाऱ्या नेत्यांची ही अशी शोकांतिका अपरिहार्यच असते .

लोकसभा निवडणुका तोंडावर आणि त्यापाठोपाठ विधानसभा निवडणुका असतांना , १९८५पासून म्हणजे , सुमारे चाळीस वर्षांपासून राजकारणात असलेले नितीशकुमार कोणतीही खेळी आंधळेपणानं खेळतील असं समजणं चूक आहे . नितीशकुमार राजकारणात आल्यापासून प्रामुख्यानं भाजपप्रणीत एनडीए सोबत आहेत . समाजवादी विचारांचा नेता अशी ओळख असणारे नितीशकुमार यांनी १९९५ च्या लोकसभा निवडणुकीत डाव्यांशी युती केली पण , पदरी साफ अपयश पडल्यावर (  त्यांचा तेव्हाचा पक्ष समता पार्टी होता  ! ) १९९६पासून भाजपप्रणीत एनडीएसोबत गेले . मुख्यमंत्री होण्याआधी ते केंद्रातील अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रीमंडळात प्रदीर्घ काळ मंत्री होते . अटलबिहारी वाजपेयी यांच्या उदारमतवादी नेतृत्वाची भुरळ पडलेले अनेक समाजवादी तेव्हा केंद्रीय मंत्रीमंडळात होते . याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी या भाजपच्या नेत्यांनी त्यांचे ( म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक  संघाला अभिप्रेत असणारं ) राममंदिर, समान नागरी कायदा , काश्मीरसाठी ३७० वे कलम आणि असे कांही प्रखर हिंदुत्ववादी मुद्दे सत्तेसाठी तेव्हा बाजूला ठेवले होते . जरा वेगळ्या शब्दांत सांगायचं तर , त्या मुद्यांसाठी अनुकूल वातावरण निर्माण होईपर्यंत वाजपेयी-अडवाणी यांनी सबुराईचं धोरण बाळगलं होतं . त्यामुळेच जॉर्ज फर्नांडिस , शरद यादव आणि नितीशकुमार एनडीएत राहिले असंही म्हणता येईल . याच काळात सर्व सहमतीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून इतर कांही नेत्यांसोबतबत नितीशकुमार यांचं नाव राष्ट्रीय स्तरावर घेतलं जाऊ लागलं .

२००० ते आता २०२४ या सलग काळात नितीशकुमार बिहारचे मुख्यमंत्री आहेत . या काळात त्यांचं सतत राजकीय तळ्यात-मळ्यात सुरु आहे . या काळात नितीशकुमार एकूण नऊ वेळ मुख्यमंत्री झाले आणि त्यापैकी तब्बल  सहा वेळा त्यांनी भाजपचा पाठिंबा घेत हे पद पटकावलं . तर तीन वेळा लालूप्रसाद यांच्या राष्ट्रीय जनता दल व काँग्रेसच्या पाठिंब्यावर ते मुख्यमंत्री झाले आहेत . २०१५च्या बिहार विधानसभा निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त जनता दल , राष्ट्रीय जनता दल , काँग्रेस आणि अन्य पक्षाच्या आघाडीला दोन तृतीयांश जागा मिळाल्यावर तर , नरेंद्र मोदी यांना भाजपेतर पक्षांचा सहमतीचा उमेदवार म्हणून नितीशकुमार यांच्याकडे मोठ्या आशेनं बघितलं जाऊ लागलं आणि नेमक्या याच काळात समकालीन राजकारणातील देशातला सर्वात मोठा संधीसाधू राजकारणी अशीही त्यांची प्रतिमा झाली .

नितीशकुमार संधीसाधू आहेत किंवा नाही , हा कांही वादाचा मुद्दा होऊ शकत नाही पण , त्यांच्या राजकीय वाटचालीचा आढावा घेतला तर      त्यांच्या संधीसाधूपणात कायम सत्तेत राहण्याचं एक निश्चित धोरण दिसतं हे मात्र  खरं . इथे शरद पवार आणि नितीशकुमार यांच्यात तुलना अपरिहार्य आहे . दोघांनीही वारंवार ‘इकडे-तिकडे’ उड्या मारलेल्या आहेत आणि   सत्ता    प्राप्त केलेली आहे . सेक्युलर असण्याचा  कितीही आव आणला तरी शरद पवार आणि नितीशकुमार हे दोघेही कायम भाजपनुकूल राहिलेले आहेत . ( शरद पवार  यांच्यापासून फारकत घेतल्यावर त्यातील अनेक ठोस  दुवे अजित पवार आणि  प्रफुल्ल पटेल यांनी मांडले आहेत . ) तरी या दोघातील फरक म्हणजे नितीशकुमार हे भाजपसोबत जाण्यासाठी कधीच कचरले नाहीत तर शरद पवार यांनी उघड उघड भारतीय जनता पक्षासोबत जाणं टाळलेलं आहे .

शरद पवार आणि नितीशकुमार या दोघांच्या राजकीय मर्यादा समान आहेत म्हणजे , मायावती , मुलायमसिंग , जयललिता , ममता बॅनर्जी आणि अन्य कांही नेत्याप्रमाणं नितीशकुमार आणि शरद पवार त्यांच्या गृह राज्यात कधीही स्वबळावर सत्ता प्राप्त करण्याइतकं बहुमत संपादन करु शकलेले नाहीत .  शरद पवार यांनी अनेकदा काँग्रेस पक्षाचा त्याग केला आणि सत्तेसाठी पुन्हा त्याच काँग्रेसशी पुनः-पुन्हा घरोबा केला आणि त्याचं समर्थनही केलेलं आहे , हा इतिहास आहे . पंतप्रधान पदासाठी नाव समोर आलं तेव्हा श्रीमती सोनिया गांधी यांच्या परदेशी असण्याचा मुद्दा समोर करुन शरद पवार यांनी राष्ट्रवादीची स्थापना केली आणि त्याच सोनिया गांधी यांचं नेतृत्व पुन्हा मान्य करताना ‘सोनिया गांधी परदेशी असण्याचा  मुद्दा मतदारांनी निकालात काढला’ , असा ( लटका ! ) बचाव केलेला आहे . यशवंतराव-शरदराव या गुरु-शिष्यातलं एक साम्य बघा  ; जनता पक्षाचा  दारुण पराभव करुन श्रीमती इंदिरा गांधी पुन्हा सत्तेत आल्या तेव्हा असाच बचाव पुन्हा काँग्रेस पक्षात प्रवेश करतांना पवार यांचे गुरु यशवंतराव चव्हाण यांनी केला होता , त्याचं स्मरण या ठिकाणी होतं .

१९९६ ते २०१३ नितीशकुमार भाजपप्रणीत एनडीए सोबत होते . भारतीय जनता पक्षानं पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांचं नाव जाहीर केल्यावर नितीशकुमार भाजपपासून दूर झाले . यांची कारणं दोन , एक तर नरेंद्र मोदी तेव्हा  राष्ट्रीय राजकारणात नवे होते , नितीशकुमार यांना ते ज्युनिअर होते आणि दुसरं कारण म्हणजे मोदी हे वाजपेयी यांच्याप्रमाणे उदारमतवादी नव्हे तर जगजाहीर कट्टर हिंदुत्ववादी होते ; त्यामुळे भाजपला संसदेत बहुमत मिळालं तर  ते राममंदिर, समान नागरी कायदा , काश्मीरसाठीचं  ३७० वे कलम रद्द करणं  अशा कांही मुद्यांवर आग्रही भूमिका घेतील आणि त्यामुळे आपल्या सेक्युलर प्रतिमेला तडा जाईल अशी भीती  नितीशकुमार यांना वाटली असणार . त्यामुळेच एनडीए म्हणजे भाजपची साथ सोडण्याचा निर्णय त्यांनी २०१३ साली घेतला पण , लोकसभा निवडणुकीत त्यांच्या संयुक्त जनता दलाचे केवळ दोघेच बिहारमध्ये लोकसभा निवडणुकीत विजयी झाले . भाजपची साथ सोडली तर जनाधार कमी होतो हे नितीशकुमार यांच्या लक्षात आलं आणि राष्ट्रीय जनता दल व काँग्रेसची साथ सोडून २०१७मध्ये ते पुन्हा भाजपसोबत गेले . २०२२मध्ये नितीशकुमार पुन्हा राष्ट्रीय जनता दल व काँग्रेससोबत गेले आणि आता पुन्हा एनडीए म्हणजे भाजपसोबत सत्तेत परतले आहेत . बिहारमधे गेली साडेतेवीस वर्ष नितीशकुमार हेच मुख्यमंत्री आहे आणि विधानसभेला विरोधी पक्ष नेता मात्र बदलत आहे , असं हे चित्र आहे .

नितीशकुमार पुन्हा भाजपसोबत का गेले असावेत याच्या कांही शक्यता आहेत- त्यांचाच पक्ष फुटेल अशी भीती वाटणं कारण आणि १८-२० आमदार भाजपसोबत जातील  तशी चर्चा होतीच ! , राष्ट्रीय जनता दलाशी न पटणं  आणि महत्त्वाचं म्हणजे, भाजप म्हणजे नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत परत येण्याचे स्पष्ट संकेत मिळणं . याशिवाय विविध केंद्रीय तपास यंत्रणा हाही एक त्यांच्यावरील दबावाचा मुद्दा असू शकतोच . त्यातच काँग्रेसप्रणीत ‘इंडिया’ आघाडीचं नेतृत्व मिळण्याची शक्यता पूर्णपणे मावळली आहे , तसंच राम मंदिराचा मुद्दा निकालात निघाला आहे आणि समान नागरी कायद्याचं काय  होणार हे स्पष्ट झालं आहे म्हणजे , त्या दोन्ही न पटणाऱ्या निर्णयात माझा सहभाग नव्हता , अशी साळसूद  भूमिका घेण्याचा नितीशकुमार यांचा मार्ग आता मोकळा झाला आहे .

या अशा एकूण परिस्थितीत शरद पवार यांच्या प्रमाणं एकटं पडायचं की पुन्हा सत्तेत राहायचं  या संदर्भात कोणताही संभ्रम न बाळगता सत्तेचंच राजकारण करण्याची म्हणजे नरेंद्र मोदी यांना शरण जाण्याची भूमिका नितीशकुमार यांनी घेतली असावी . ती भूमिका आश्चर्याची मुळीच नाही तर नितीशकुमार यांच्या आजवरच्या संधीसाधू धोरणाशी पूर्णपणे सुसंगत आहे , ती अपरिहार्य आहे , खूपशी अगतिकपणाचीही आहे आणि त्यातच त्यांची शोकांतिकाही लपलेली आहे !

जाता जाता- बिहारमध्ये  घडलेल्या या नव्या खेळात , महाराष्ट्राच्या पक्षीय राजकारणातून डावलल्या गेलेल्या विनोद तावडे यांची भूमिका कळीची आहे अशा बातम्या प्रकाशित झाल्या आहेत आणि लगेच त्यांची तुलना प्रमोद महाजन यांच्याशी करण्यात आली आहे ; ‘भावी जे. पी. नड्डा’ , पक्ष श्रेष्ठींनी नितीन गडकरी , देवेंद्र फडणवीस यांना उभा केलेला पर्याय असा त्यांचा उल्लेख होतोय ; हे सर्व एकाच वेळी साध्य होण्यासाठी विनोद तावडे यांना शुभेच्छा !  

 प्रवीण बर्दापूरकर
भ्रमणध्वनी – ९८२२०५५७९९

www.praveenbardapurkar.com

praveen.bardapurkar@gmail.com

संबंधित पोस्ट