‘बसोली’ची पन्नाशी !

​■बालचित्रकारांची आपल्या देशातील एकमेव चळवळ असलेल्या नागपूरच्या ‘बसोली’नं स्थापनेची पन्नाशी नुकतीच पूर्ण केली . त्यानिमित्त प्रकाशित करण्यात आलेल्या विशेषांकातील हा लेख-

साधारण १९८० ते २०१५ या काळात देशात ( किंवा काही वेळा परदेशातही ) असलो तरी ‘बसोली’च्या वार्षिक शिबिरात आवर्जून एक दिवस तरी सहभागी होऊन किमान चार-सहा तास घालवणे मला मनापासून आवडत असे ; खरं तर . अजूनही आवडेल .  मधली काही वर्ष पत्रकारितेच्या निमित्ताने मुंबई आणि तेव्हाच्या औरंगाबाद (आताच्या छत्रपती संभाजी नगरला ) होतो तेव्हाही एकदा खामगाव आणि नंतर नागपूरला झालेल्या शिबिरात हजेरी लावली होतीच . एकूण काय तर ‘बसोली’चे होणारे वार्षिक शिबीर ही माझ्यासाठी एक वार्षिक सवय झालेली होती.

‘बसोली’ची या  वर्षीच्या शिबिराची  सृजनशीलतेची संकल्पना ‘from me to we’ ही आहे . महत्वाचं म्हणजे  ‘बसोली’चं हे पन्नासावं वर्ष . या सुवर्ण महोत्सवी वर्षांची सुरुवात गेल्या वर्षी झाली तेव्हा नागपूरच्या लक्ष्मी नगरच्या आठ रस्ता चौकातील सायंटिफिक सभागृहात ‘बसोली’ला साजेशा झालेल्या दिमाखदार कार्यक्रमात मी सहभागी झालो होतो . ‘बसोलीयन्स’च्या त्या मांदियाळीत सहभागी होताना झालेला आनंद अवर्णनीय होता कारण इवलेसे ते रोप आता वृक्ष झालेले होते . आठवणींचे अनेक पक्षी तेव्हा जागे झाले , अनेक वर्षांपासून न भेटलेले दोस्तयार त्या दिवशी नीळाईच्या छायेत भेटले . आता ‘बसोली’नं पन्नास वर्षांचा गाठलेल्या या टप्प्याच्या पार्श्वभूमीवर ‘बसोली’शी माझं नातं काय ? या प्रश्नाचं उत्तर ‘खूप काही’आणि तरी ‘काहीच नाही’ असं दोन्ही बाजूंनी  देता येईल .

■ ■

रुढार्थाने मी काही बसोलीचा कलावंत नाही ; तेथे राबणारा कार्यकर्ताही नाही आणि आयोजकांपैकी एक किंवा मार्गदर्शक वगैरे तर मुळीच नाही तरीही ; माझं एक घनिष्ठ नातं बसोलीशी आहे , अशी ही गुंतागुंत आहे . पहिली विलोभनीय गुंतागुंत चंद्रकांत आहे . आमच्यातलं नातं दोस्तीचं आहे . दोस्तीच्या वृत्ती आणि धर्माला जागून आम्ही परस्परांना कधीही सरळ आणि आदरारार्थी संबोधत नाही . त्याच दोस्तीला जागून चंदूतल्या गुण आणि अवगुणांविषयीही मी यापूर्वी लिहिलेलं आहे . आमची ही दोस्ती आता चाळीशीत आलेली आहे . म्हणजे भावनांच्या बहराचा काळ उलटून आमची दोस्ती आता बऱ्यापैकी पक्व झालेली आहे . आमच्यातल्या मैत्रीच्या आणि बसोलीच्या पुलाखालून या काळात बरंच पाणी वाहून गेलंय तरी , आमच्यातला अवखळ तिरकसपणा कायम आहे ! चंद्रकांत चन्ने म्हणजे ‘बसोली’ असे  घट्ट समीकरण आहे . वेगळ्या शब्दांत सांगायचे तर ‘बसोली’ मार्गे चंद्रकांत चन्ने म्हणजे मी असा त्याचा एक अर्थ आहे . .

पुनरुक्ती होणार असली तरी अगदी काटेकोरपणे सांगायचे तर २८ जानेवारी १९८४ ला दुपारी साडेचार वाजता पंचशील चौकातल्या नागपूर श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात , नागपूर-विदर्भात रंगभान निर्माण करणार्‍या आणि चित्र जागृतीला चेतना देणार्‍या चंद्रकांत चन्नेंची ओळख झाली . प्रकाश देशपांडेनी ती करुन दिली . दहा-पंधरा मिनिटातच आम्ही ‘अरे-तुरे…’ वर आलो . तिघांनीही समोरच्या कॉफी हाऊसमध्ये जाऊन सिगारेटी फुंकत , दोन कॉफी तिघांत शेअर केली आणि एका दीर्घकाळ चालत राहणार्‍या दोस्तीचा उगम झाला . तेव्हापासून आजपर्यंत तो नाद अव्याहत खळाळतो  आहे . आमच्यातल्या मैत्रीच्या आणि बसोलीच्या पुलाखालून या काळात बरंच पाणी वाहून गेलंय . अतिशय नियमित गाठीभेटी नाहीत , रात्री उशिरापर्यंत गप्पा मारत बसल्याचे प्रसंगही खूप अपवादाने आलेले , एकमेकाला भेटवस्तू देणंघेणं नाही , परस्परांत कुठलाही व्यवहार नाही , एकमेकांच्या व्यक्तिगत आयुष्यात आजवर दोघांपैकी कुणीही, कधीही, कुठेही, केव्हाही डोकावूनही पाहिलेलं नाही, तरीही हा नाद आह…निर्व्याज्य मैत्रीचा .

■ ■

दुसरं म्हणजे , ‘बसोली’च्या अनेक शिबीर/कार्यक्रमात माझा सहभाग प्रमुख पाहुणा , नियोजित न आल्याने ऐनवेळचा पाहुणा , वक्ता ते सतरंजी उचलणारा कार्यकर्ता थोडक्यात चंद्रकांतचा ‘हरकाम्या’ असा आहे . ‘बसोली’च्या सत्कारास पात्र ठरणारा आणि ‘बसोली’चे सत्कारार्थी ठरवणारा अशा दोन्ही भूमिकात अनेकदा वावरलो आहे . ‘बसोली’च्या निवासी शिबिराची ‘रसद’ जमा करताना उन्हां-ताणात वणवण फिरणाऱ्या चंद्रकांत चन्नेसोबत एक सहकारी म्हणून अनेकदा फिरलो आहे . तेव्हा चंदू नावाच्या दोस्ताची या चळवळीविषयी असणारी अव्यभिचारी तळमळ मनावर कायमची बिंबलेली आहे . याशिवाय एक पत्रकार म्हणून अनेक वर्ष ‘बसोली’च्या कार्यक्रमाचं वृत्तसंकलन करणं , ‘बसोली’च्या उपक्रमावर लेख लिहिणं , कार्यक्रम किंवा शिबिराचे पाहुणे इकडून तिकडे पोहोचवणं आणि हे किंवा यापैकी एकही काम असेल/नसेल तरी एक श्रोता म्हणून तरी मी आनंदाने सहभागी होणं , अशा विविध भूमिकात मी वावरलो आहे . म्हणजे, , कोणतंही नाव नसलेलं तरी घट्ट असलेलं एक नातं ‘बसोली’ आणि माझ्यात या काळात निर्माण झालेलं आहे .

‘बसोली’ म्हणजे चंदू असे समीकरण मांडायचे कारण ‘बसोली’ हा चंद्रकांतचा श्वास आहे . चंदूची माणसं जोडण्याची कला विलक्षण तर्‍हेवाईक आहे . म्हणजे कसं तर , चंदूची मैत्री आधी एखाद्या घरातल्या मुलाशी होते , मग मुलाच्या आईवडिलांशी होते , मग त्या मुलाच्या आजी-आजोबांशी होते आणि चंदू एकेकाशी मग जोडत जातो . आजूबाजूला दीडशे-दोनशे मुले वावरत असली , खेळत असली , खेळता खेळता भरपूर गोंगाट करत असली तरीही त्याचा चंदूला काहीही त्रास होत नाही . उलट हा गोंगाट वगैरे आपल्यासाठीच ही मुले करताहेत आणि तोच आपला प्राणवायू आहे , असा चंदूचा भाव असतो . या गोंगाटात चंदू जितका रमतो तितका मोठ्या माणसात प्रत्येकवेळी रमतोच असे नव्हे . मुलांचा गोंगाट जर सलग दोन-चार दिवस ऐकू आला नाही तर चंदूला डिप्रेशन आल्याशिवाय राहणार नाही , असं आम्ही जे म्हणतो ते काही उगाच नाही .

सहज बोलत चित्रकार चंदू  ‘बसोली’चे बालकलावंत साथीला घेऊन अनेक वेगळे ,विस्मय  चकित करणारे  उपक्रम राबवतो . नागपूर जवळचं मोवाड हे गांव अतिअति वृष्टी आणि पुरामुळे मोडून पडलं . तेव्हा मदतीचा ओघ सुरु झाला . ‘लोकसत्ता’त या संदर्भातली एक आठवण खासच आहे . ती बातमी वाचून मदतीचा हात चंदूने समोर केला तो ‘बसोली’च्या माध्यमातून . ‘बसोली’चे बालकलावंत भर पावसात ८/१० ट्रक्समध्ये मराठी कवींच्या कवितांवर आधारत चित्र काढत नागपुरात फिरली . त्या चित्रातून जो निधी जमा झाला तो मोवाडच्या पुनर्निर्माणासाठी  ‘लोकसत्ता’च्या फंडात जमा करण्यात आला .

नागपूरच्या पत्रकार सहनिवासचं बांधकाम नुकतंच सुरु झालं होतं . पत्रकार सहनिवासच्या  त्या साईटवर एक दिवस संध्याकाळी चंदू , प्रकाश ( देशपांडे ) आणि मी गप्पा मारत बसलो होतो . समोर लांsssबलचक पसरलेली आणि  शुष्क भासणारी  कंपाऊंड वॉल चंदूला अस्वस्थ करत होती . ‘आपण या भिंतीवर म्युरल करु यात’ , अशी कल्पना चंदूनं मांडली . प्रकाश पत्रकार गृहनिर्माण संस्थेचा सचिवही होता त्यामुळे प्रकल्प मार्गी लागला . संस्थेच्या कार्यालयासमोर ‘बसोली’च्या बाल कलावंतांनी १२० फूट लांब आणि १० फुट उंचीचे म्युरल शंभर दिवस काम करुन साकारलं . या काळात आम्हा सर्वांचा मुक्काम याच साईटवर असायचा . लोक तेव्हा म्हणाले , ‘ते आशियातील सर्वात मोठं म्युरल आहे’ . पण , काम संपल्यावर चंदूला त्यात कांहीच रस उरलेला नव्हता . काम संपले आणि निर्लेप मनाने  तो आणि ‘बसोली’चे कलावंत  बाजूला झाले .

■ ■

सगळ्या मुलाना असते तशी रंगांची ओढ लहानपणी मलाही होती . कळत्या वयात मुलं कविता आणि चित्रांच्या प्रेमात पडतात तसा मीही पडलो . रेखाचित्रे हा माझा प्रांत होता आणि त्यात बऱ्यापैकी गती होती . चित्रकलेचा विद्यार्थी नसलो तरी चित्रकला महाविद्यालयातील मित्रांसोबत भटकत रेघा ओढत राहण्याचा नाद लागलेला होता आणि त्यासाठी अनेक रात्री बसस्थानक, रेल्वे स्टेशनवर चहाचे कप फस्त करत कशा जागवल्या हे आजही लख्खपणे आठवतं . पुढे पत्रकारितेत आलो आणि विशेषत: रिपोर्टिंगच्या धबडग्यात गुरफटून गेल्यावर रंगाच्या बाटल्या , ब्रश केव्हा अडगळीत गेले हे कळलंच नाही . मात्र , असं असलं तरी, रविवार पुरवणी करताना सहकारी जागा भरण्याच्या समस्येत सापडला किंवा ऐनवेळी आर्टिस्टने दांडी मारली तर एखाद-दुसरं रेखाटन काढून सहकाऱ्याची अडचण भागवायला हिरीरीनं पुढे सरसावणं माझा आवडता उद्योग असे . अनेकदा तर रिपोर्टिंग करताना भाषण किंवा कार्यक्रम अपेक्षेबाहेर कंटाळवाणा झाला तरी जागा न सोडता कार्यक्रमाची टिपणे घेण्यासाठी असलेल्या स्पायरल बाईंडिंगच्या नोंदवहीत रेखाटणं करत त्या कंटाळवाणेपणावर मात करण्याच्या कलेत मी अवगत झालेलो होतो . २००३ मध्ये‘लोकसत्ता’चा निवासी संपादक झाल्यावर एकदा या नोंदवह्या निकालात काढण्याआधी चाळल्या तेव्हा लक्षात आलं की आपल्या नोंदवहीत टिपणं कमी आणि रेघोट्याच जास्त आहेत . पत्रकारांच्या वाट्याला कंटाळवाणे कार्यक्रम जास्तच आलेले असतात याची साक्षच जणू ती रेखाचित्रे देत होती ! हे सांगायचं कारण , माझ्यातला बालपणीचा पुढे हरवलेला चित्रकार मला ‘बसोली’त कायमच दिसत असतो .

 ■ ■

माझ्या पिढीने १९८०च्या दशकाच्या अगदी सुरुवातीला म्हणजे ८०-८१ साली माझ्या पिढीनं पत्रकारितेला सुरुवात केली .  तेव्हा पत्रकारितेला फारसं काही सांस्कृतिक भान नव्हतं . सांस्कृतिक कार्यक्रमाचे वृत्तसंकलन म्हणजे फार फार तर पुस्तक प्रकाशनाच्या बातम्या आणि धनवटे नाट्य मंदिरात ( त्या जागेवर विदर्भ साहित्य संघाची नवी अर्धवट वास्तू आता उभी आहे ) सादर होणाऱ्या राज्य नाट्यस्पर्धेत सादर होणाऱ्या प्रयोगाचे परीक्षण ; असा समज दृढ आणि सार्वत्रिक होता . सांस्कृतिकता म्हणजे यापेक्षा इतर काही कला असतात आणि त्या कशासोबत खायच्या असतात याबद्दल पत्रकार जमात फारशी काही जागरुक नव्हती . शिवाय मिडिया म्हणजे केवळ आकाशवाणी व मुद्रीत माध्यमे , म्हणजे वृत्तपत्रे होती . त्यात बातम्या , राजकीय लेख , पुस्तक समीक्षण , कथा-कविता यांना अग्रहक्काचं तसंच प्रभावशाली स्थान होते  . त्यात मुद्रीत माध्यम रंगीत नव्हते त्यामुळे रंगभान असणं मुळीच गरजेचे नव्हते  . विजय फणशीकर , वामन तेलंग असा एखाद-दुसरा पत्रकार वगळता कला वृत्तसंकलन हे स्पेशलायझेशन आहे हे माहिती नव्हते . अन्य कला हे  कलाविषयक नियतकालिकांचे आणि त्यांच्या मर्यादित वाचकांपुरते हे उपक्रम आहेत , समज तेव्हा होता .

त्यात महत्वाचे म्हणजे , ही काही केवळ मुद्रीत  माध्यमांचीच धारणा नव्हती तर बहुसंख्येने समाजालाही तसंच वाटायचं . अशा प्रतिकूल वातावरणात चंद्रकांत चन्ने नावाचा कोणी तरी शिक्षक नागपूर-विदर्भाच्या बालकांत असलेले रंगभान शोधण्याचा प्रयत्न करतो आहे , हा बहुतेकांसाठी वेडेपणाच होता ! त्या काळात श्रीकांत दाभाडे आणि त्यांच्या सहकाऱ्यानी ( आता त्यांची नावे आठवत नाहीत, सॉरी ) भरवलेली छायाचित्र प्रदर्शने किंवा प्रकाश बिसने याची छायाचित्रे किंवा बसोलीच्या उपक्रमाचे वृत्तसंकलन करणे हा , आमच्या मुख्य वार्ताहराच्या दृष्टीकोनातून वेळ आणि जागा अडवण्याचा ‘आदर्श उद्योग’ होता . नामवंत छायाचित्रकार प्रकाश बिसने याने टिपलेले एक स्त्री एका कडेवर हाताच्या टेकूवर मान कलती पेलत कलंडून निवांत पहुडलेली आहे हे कृष्णधवल छायाचित्र आम्ही ( म्हणजे मी आणि रविवार पुरवणीची सहकारी, माझी तत्कालिन भावी पत्नी मंगला विंचुर्णे  ) नागपूर पत्रिका या दैनिकाच्या रविवार पुरवणीच्या मास्टहेडवर घेतले तेव्हा आमच्या वरिष्ठांना बसलेला शॉक आणि त्यानंतर न्यूजरुममध्ये आम्हा दोघांच्या विरोधात उसळलेली ‘दंगल’ अजूनही आठवली…वरिष्ठांनी त्यावेळी दिलेला मेमो आठवला की हंसू येते . पत्रकार आणि समाज अशा दोन्ही पातळ्यावर कलाविषयक भान असे टोकाचे विपरीत असल्याच्या पार्श्वभूमीवर कलाविषयक जाणीव आणि रंगभान ओंजळीत घेऊन चंद्रकांत चन्ने नावाचा एक ‘वेडा’ कलावंत दौडत निघालेला होता .

■ ■

चंद्रकांत चन्ने हा चित्रकार आहे , त्याने चित्रकलेचे रीतसर-शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलेले आहे , रवींद्रनाथ टागोरांच्या कर्मभूमीत ; शांतिनिकेतनमध्ये जाऊन तो त्याच्यातल्या सर्जनशीलतेचा झेंडा रोवून आला आहे…वगैरे वगैरे काहीही तोपर्यंत नागपूरकरांना माहिती नव्हते . उन्हाळ्याच्या सुटीत लहान मुलांना जमवून रंग ,मातीशी हवे तसं खेळू देणारा ‘चित्रकलेचा एक शिक्षक’ असेच ‘अदखल’पात्र काहीसं चंदकांतबद्दल पत्रकारांसकट बहुतेकांना वाटायचं . मुलं रंगून जातात त्या ‘बसोली’ नावाच्या त्या खेळात , म्हणून अनेक पालक मुलांना पाठवून द्यायचे ; अशीच तेव्हाची सर्वसाधारण मानसिकता होती . मी मात्र त्याच्या ‘बसोली’ नावाच्या रंगवेडात नकळत सहभागी झालो ते माझ्यात असलेल्या चित्रकलेच्या ओढीने . त्यात नंतर प्रकाश देशपांडे , विजय फणशीकर , सिद्धार्थ सोनटक्के असे आणखी काहीजण ओढले गेले आणि आता पाहता पाहता ‘बसोली’ नावाचे रंगभान केवळ नागपूरच नाही तर संपूर्ण विदर्भात पसरले आहे . ‘बसोलीयन्स’नी मिळवलेली राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरची हजारो पारितोषिके, रंगाच्या माध्यमातून राबवलेले विविध उपक्रम यातून बसोलीची मुलं हा एक नंतरच्या काळात नागपूर शहरात कौतुकाचा विषय ठरला हे तर महत्वाचे आहेच पण त्याहीपेक्षा मोलाचे आहे ते , हे कौतुक पुढे कलेच्या क्षेत्रात नागपूरची ओळख ठरले . मिडिया आणि समाजातही रंगभान , रंगजाणीव आणि रंगजागृती निर्माण करणारी अव्याहत पन्नास  वर्ष सुरु असलेली बालकलावंतांची अशी चळवळ देशात आणखी कुठे एवढ्या मोठ्या प्रतिसादात सुरु असल्याचं माझ्या तरी वाचनात आणि पाहण्यात नाही . ज्ञानेश्वरीतील दोन ओळींचा आधार घेत सांगायचं तर- चांगली वाटते , आपल्या मनात मावत नाही आणि ती मग ती इतर अनेकांना सांगावीशी वाटते’ अशी चळवळ म्हणून स्थान मिळवण्याचा लौकिक ‘बसोली’ने मिळवला . अशी ही ‘बसोली’ नावाची चळवळ रुजली…अंकुरली…बहरली आणि ती आता डेरेदार झाली याचा एक साक्षीदार मीही आहे . म्हणूनच सकृतदर्शनी गुंतागुंतीचे  वाटणारं आमच्यातचे नाते सार्थ अभिमानाचे …ममत्वाचे वाटते , अतूट वाटते .

धर्म-जात-उपजात-पोटजात-पंथ असा कोणताही भेद करता , न बाळगता बसोली आज नागपूर-विदर्भाच्या हज्जारो घरातल्या बैठकीच्या खोलीत मोठ्या डौलदारपणे विराजमान झालेली आहे . असं ऐटीत विराजमान होतानाच या हज्जारो घरात आणि लाख्खो मनात या चळवळीने रंगजागृती निर्माण केली आहे , समाजात रंगभान पसरवलं आहे . बसोलीचे हे रंगभान यापुढेही असेच उधळत आणि उजळतही राहो याच शुभेच्छा !

प्रवीण बर्दापूरकर
९८२२०५५७९९

संबंधित पोस्ट