महाविकास आघाडीच्या बाजारात तुरी !

वी दिल्ली हे देशातल्या सर्व राजकीय चर्चा आणि गावगप्पाचं (Gossip) प्रमुख केंद्र आहे . अनेक चर्चा लगेच खऱ्या ठरतात असं नाही तर अनेक चर्चा पुढे गावगप्पात रुपांतरित होतात ; दिल्लीतल्या काही चर्चा आणि गावगप्पा कधी कधी सत्यातही उतरल्याची अनेक उदाहरणं आहेत . हे आठवायचं कारण संसदेचे एक महाराष्ट्रातले सदस्य नुकतेच भेटले . दिल्लीतल्या एका चर्चेबाबत ते म्हणाले , ‘भाजप आणि राष्ट्रवादी ही युती नजीकच्या भविष्यात अगदीच काही अशक्य नाही  पण , त्या एक प्रमुख अडसर देवेंद्र फडणवीस आहेत  . (महा)राष्ट्रवादीला देवेंद्र फडणवीस नको असल्यानं कदाचित भविष्यातल्या (महा)राष्ट्रवादी-भाजप युतीचे नेते म्हणून नितीन गडकरी महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून येऊ शकतात .’ या चर्चेकडे गांभीर्यानं बघितलं पाहिजे कारण कर्नाटकातल्या विजयामुळं काँग्रेस-(महा)राष्ट्रवादी-उद्धव ठाकरे यांची शिवसेना या महाविकास आघाडीत एकीकडे सध्या फारच उत्साह आहे . तर दुसरीकडे लोकसभा आणि विधानसभेच्या जागा वाटपाची जोरदार  खडाखडी सुरु  आहे . नितीन गडकरी खरंच महाराष्ट्रात आले तर महाविकास आघाडीत पसरलेलं चैतन्य आणि या आघाडीतील एकीच्या वज्रमुठीची चर्चा बाजारात तुरी…ठरु शकते . ( ही म्हण अर्धीच वापरली आहे. कारण पूर्ण उद्धृत केली तर जातीयवादाची राळ उडवली जाईल . )

महाराष्ट्रातली महाविकास आघाडीत तशीही एकजूट कधीच नव्हती . उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि (महा)राष्ट्रवादीनं काँग्रेसला तसंही वळचणीलाच टांगून ठेवलेलं होतं आणि आहेही . एक लक्षात घेतलं पाहिजे , या  महाविकास आघाडीची मोट बांधण्याचं सर्व श्रेय शरद पवार यांना दिलं जातं . शरद पवार दीर्घदृष्टीचे नेते , कुशल प्रशासक आणि सर्व क्षेत्रात वैपुल्यानं संचार असलेले नेते असले तरी राजकारणी म्हणून ते भरवशाचे नाहीत . भाजपशी या आधी अनेकदा त्यांनी कशी हातमिळवणी केली आहे , त्यांच्या हालचाली भाजपला अनुकूल ककशा  राहिल्या आहेत ,याची असंख्य उदाहरणं गेल्या तीन साडेतीन दशकात महाराष्ट्रानं अनुभवलेली आहेत .

(महा)राष्ट्रवादीत आघाडीत राहून शरद पवार यांनी ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीत तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर खूप सारं  शरसंधान केलेलं आहे . उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री म्हणून मुळीच किमान क्षमतेचेही नव्हते . हेच शरद पवार यांनी या पुस्तकात सुचित केलेलं आहे . हे एवढ्यावरच थांबलेलं नाहीतर राजकीयदृष्ट्याही उद्धव ठाकरे पुरेसे ‘मॅच्युअर्ड’ नव्हते , हेही शरद पवार यांनी स्पष्टपणे सांगून टाकलेलं आहे . दुसरीकडे शिवसेनेतून एकनाथ शिंदे फुटल्यावर सोळा आमदारांच्या अपात्रतेवरुन जो काही पेच निर्माण झाला त्याला नाना पटोले हेच जबाबदार असल्याचा ठपका  आहे हे (महा)राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी ठेवला आहे . शरद पवार यांच्या पुस्तकात व्यक्त करण्यात आलेल्या मतांचा उद्धव ठाकरे यांनी अजून तरी इन्कार केलेला नाही , संजय राऊत यांनी दुबळासा इन्कार केलेला आहे पण , शरद पवार यांच्या उद्धव ठाकरे यांच्यावरील शेरेबाजीमुळे शिवसेनेत अस्वस्थता आहे हे नक्की . नाना पटोले यांनी मात्र अजित पवारांना थेट शिंगावर घेतलं आहे हे खरं आहे पण , या सर्व वादावादीतून राष्ट्रवादी काँग्रेस आणि विशेषत: शरद पवार एकाच वेळेस काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला राजकीयदृष्ट्या कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सातत्यानं करत आहेत हेच दिसतं  . नितीन गडकरी यांच्या संदर्भात दिल्लीत सुरु असलेली चर्चा खरी का खोटी हे कळायला मार्ग नाही पण , काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला पकडलेल्या कोंडीतून (महा)राष्ट्रवादीनं बाहेर पडण्याचा मार्ग कोणता आहे , याचे संकेत देणारी ही दिल्लीतली चर्चा आहे .

कर्नाटकात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या विजयामुळे म्हणजेच भाजपच्या झालेल्या सणसणीत पराभवामुळे महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीला नवसंजीवनी प्राप्त झाल्याच्या चर्चा खऱ्या ठरणं केवळ शरद पवार आणि (महा)राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याच हाती आहे . मुळात शरद पवार यांच्या तोडीचा नेता महाराष्ट्र काँग्रेसमध्ये नाही आणि उद्धव ठाकरे हे सक्षम नेते नाहीत , हे शरद पवार यांनी जाहीर करुन टाकलं आहे . त्यामुळे शरद पवार यांच्या मागे फरपटत जाण्याशिवाय काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला केवळ एकच पर्याय उरतो आणि तो म्हणजे (महा)राष्ट्रवादीची साथ सोडणं . राजधानीतील नितीन गडकरी यांच्याबाबतची चर्चा किंचित का असेना खरी असेल तर शरद पवार आणि अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यातून भविष्यात महाराष्ट्रात कोणते राजकीय दिवे उजळणार आहेत हे स्पष्ट होतं .

महायुतीत असलेल्या परस्परांविषयीच्या संशयाचा आणखी एक पैलू आहे आणि तो म्हणजे उद्धव ठाकरे यांची सेना व नाना पाटोळे यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस यांच्यातही सारं काही सुरळीत नाही . त्याच्या तपशीलात जाण्यात अर्थ नाही पण काँग्रेसला उद्धव ठाकरे यांच्या सेनेबद्दल खात्री वाटत नाही याचा अनुभव नुकताच आला . राज्यातले काँग्रेसचे एक  बडे नेते खाजगीत सुरु असलेल्या चर्चेत म्हणाले, ‘उद्धव ठाकरे यांच्या गटाची यानंतरही अशीच कोंडी होत राहिली तर भाजपसोबत पुन्हा हातमिळवणी करण्याशिवाय त्यांच्यासमोर दुसरा पर्याय नाही . त्यामुळे आमचा काही या सेनेवर भरवसा नाही .’ शिवाय मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहे , हाही महाविकास आघाडीच्या तथाकथित वज्रमुठीला तडा देणारा आणखी एक मुद्दा असेल .

या सर्व पार्श्वभूमीवर ‘बाजारात तुरी…’ ठरणाऱ्या  महाविकास आघाडीतील लोकसभा निवडणुकीतील जागा वाटपाच्या खडाखडीकडे बघायला हवे . गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपसोबत युती केलेल्या शिवसेनेचे १८ खासदार विजयी झाले ; त्यापैकी १३ खासदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले तरी त्या १८ जागा शिवसेनेला मिळायला हव्यात असा संजय राऊत यांचा आग्रह आहे . तो आग्रह अर्थातच काँग्रेस आणि (महा)राष्ट्रवादीला मुळीच मान्य नाही म्हणजे जागा वाटपाची चर्चा ‘प्रथम ग्रासे मक्षिकापात…’  अशी झालेली आहे . शिवाय २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर कर्नाटकात काय घडलं याचा विसर पडू देता कामा नये . कर्नाटक विधानसभ निवडणुकीत सभागृहातला सर्वांत मोठा पक्ष ठरुनही भाजप नव्हे तर काँग्रेस आणि जनता दल सेक्युलर या युतीचं सरकार आलं होतं . त्या सरकारच्या शपथविधीला देशभरातल्या भाजपविरोधी पक्षांच्या नेत्यांची उपस्थिती होती . त्या व्यासपीठावरुन विरोधी पक्षांच्या भाजप विरोधी ऐक्याची ग्वाही देण्यात आलेली होती . गेल्या पाच वर्षांत ती ग्वाही विरतच कशी गेली हे जनतेला बघायला मिळालेलं आहे . तसंच याही वेळी घडणारच नाही याची खात्री कोण देणार ?

कर्नाटकातील विजयाचा भावनिक आधार महाविकास आघाडीला नक्कीच मिळू शकतो तरी कर्नाटक आणि महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती पूर्णपणे भिन्न आहे याचं भान सुटू देता  कामा नये . कर्नाटकात लिंगायत जसे एकगठ्ठा काँग्रेसच्या बाजूने उभे राहिले तसं महाराष्ट्रातील मराठा मतदारांच्या संदर्भात घडण्याची शक्यता येत्या कोणत्याही निवडणुकीत मुळीच नाही . महाराष्ट्रातील मराठा  मतदार काँग्रेस , (महा)राष्ट्रवादी , उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे आणि भाजप अशा पाच पक्षांत विभागलेला आहे . प्रकाश आंबेडकरांकडे बहुजन आणि वंचितांचा मोठा मतदार आहे . तोही काही महाविकास आघाडीकडे वळण्याची शक्यता नाही . मुंबई , ठाणे , नासिक , पुणे भागात राज ठाकरे यांच्या महाराष्ट्रा नवनिर्माण सेनेचा चांगला बोलबाला आहे . मराठवाडा आणि मुंबईत एमआयएमनं पुरेसे पाय रोवले आहेत . त्यातच तेलंगाणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती (बीआरएस)नं जोरदार जुळवणी सुरु केलेली आहे . या पक्षात जाणारे सध्या तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचेच माजी का असेना पदाधिकारी , आमदार आहेत . भारत राष्ट्र  समिती  (बीआरएस) हा पक्ष निवडणुकीत यश मिळवेल किंवा नाही हा मुद्दाच नाही , पण हा पक्ष काँग्रेस आणि (महा)राष्ट्रवादीचीच मते खाणार हे स्पष्ट आहे . अशा परिस्थितीत महाराष्ट्रातही कर्नाटकप्रमाणे भाजपच्या विरोधात मतदारांचा निर्णायक कौल मिळेल असे दावे म्हणा की आतापासून सुरु झालेले स्वप्नरंजन बाजारात तुरी… याच सदरात मोडणारं रे आहे .

प्रवीण बर्दापूरकर

Cellphone  +919822055799

www.praveenbardapurkar.com

संबंधित पोस्ट