शेतकरी चळवळीतला एकांडा शिलेदार – विजय जावंधिया

ज्येष्ठ सहकारी असलेल्या प्रा. डॉ . आशा देशपांडे यांचा फोन आला की , शेतकरी नेते विजय जावंधिया महाविद्यालयात विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी येत आहेत . विजयची गळाभेट झाली . खूप वर्षांनी भेटलो . दोघांचाही गहिंवर दाटून आला . बऱ्यापैकी गप्पा झाल्या . गिले-शिकवे झाले .  मन भूतकाळात गेलं .

माझी आणि विजय जावंधिया यांची ओळख १९८०तली . महाराष्ट्रात शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी चळवळ बहरात होती . त्या चलवळीतला विदर्भातील एक धुरंधर विजय होता . विजय वयानं ज्येष्ठ पण लगेच आम्ही एकेरीवर आलो कारण आमच्यात तसं अंतर फार नव्हतं . त्या काळात नागपुरातच नाही तर अन्य अनेक ठिकाणी आमच्या भेटी होत . नागपुरात त्याचं घर सीताबर्डीवरील मोदी गल्लीत होतं . घर कसलं मोठा वाडाच होता तो ! विजयच्या आईच्या हाताला मस्त चव होती आणि त्या माऊलीच्या हातची ती अवीट चव चाखण्याची संधी मला मिळालेली आहे .

त्या काळात विजयचं एक पाऊल नागपुरात आणि दुसरं नागपूरबाहेर म्हणजे देशात कुठेही . जिथे कुठे शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे तिथे विजय हमखास सापडणार ; हे म्हणजे अगदी चुकला  फकीर मशिदीत सापडणार तस्सं झालेलं होतं . उंच आणि कांहीशी धिप्पाड शरीरयष्टी , रापलेला निमगोरा वर्ण ,  विस्तीर्ण भाल प्रदेश कारण डोईवर केसांचा बऱ्यापैकी दुष्काळ , डोळ्यांवर चष्मा , चष्म्याआडचे डोळे कायम उत्सुकतेनं चाळवलेले , अंगावर खादीचे कपडे , शर्टावर शेतकरी संघटनेचा बिल्ला आणि खिशात एक पेन तसंच कांही कागद नक्की असणारच , पायात साध्याशा चपला घातलेला माणूस म्हणजे विजय जावंधिया  . पायी चालत असेल तर तो झपाझप चालणार अशा गतीने की , सोबत  चालणा-याची दमछाक व्हावी . त्या काळात अनेकदा  विजय लुना या वाहनांवर नागपुरात फिरत असे आणि ते दृश्य डोळ्यांचे पारणे फिटवणारे असे ! आता वार्धक्याच्या खुणा चेहेऱ्यावर दिसू लागलेल्या आहेत बाकी विजय तेव्हा होता अगदी तस्साच आजही आहे .

विजयचा जन्म आणि शिक्षण नागपुरात झालं पण मुळचा तो महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या वास्तव्याचा परिमळ लाभलेल्या वर्धा जिल्ह्यातील  वायफडच्या मालदार कुटुंबातला . मालदार म्हणजे भरपूर शेती असलेल्या घरातला . शेतीत लक्ष घातलं आणि विजयला शेतीची परवड लक्षात यायला वेळ लागला नाही . मग त्यानं त्याच्या स्वभावाला शोभणाऱ्या  शैलीत केवळ शेतीच नाही तर एकूणच कृषी व्यवस्थेचा मूलभूत अभ्यास सुरु केला . समतेचा कट्टर पुरस्कर्ता असलेल्या विजयला शेतकरी , शेतमजूर यांच्या विदारक स्थितीचं आकलन झालं . कृषी  व्यवस्थेच्या सर्व पैलुंच्या बाबतीत तो पारंगत झाला .शरद जोशी यांची शेतकरी चळवळ विदर्भात पोहोचण्याआधीच तो या विषयावर बोलता आणि लिहिताही झाला . शरद जोशी आणि त्यांच्या शेतकरी चळवळीच्या संपर्कात आल्यावर त्यांच्या बोलण्याला धार आली . कृषीशी संबंधित

छायाचित्रात डावीकडून प्रवीण बर्दापूरकर , महात्मा गांधी मिशन विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम , विजय जावंधिया , प्राचार्य रेखा शेळके आणि एच . एम. देसरडा .

प्रश्नांवर तो टोकदार झाला . विजयच्या वक्तृत्वाला विलक्षण समंजस अशी ऐट आहे . अतिशय संयत पण वास्तवाचा पाया असलेल्या बोचऱ्या शैलीत तो मांडणी करतो . वाचन भरपूर असल्यानं रुपकं , कविता असे अनेक दाखले देत तो असं कांही बोलतो की समोरचे मंत्रमुग्ध होतात ; विजय काळजाचा ठाव घेतो आणि त्याच्या प्रतिपादनाशी ऐकणारे सहमत होतात . हे केवळ मराठी बाबतच घडतं असं नाही तर हिन्दी आणि इंग्रजीतही तो तेवढाच प्रभावी ठरतो . विजयनं लिहिलेली प्रसिद्धी पत्रकंही मुद्देसूद ; कोणताही फापटपसारा नाही . अक्षर देखणं नसलं तरी सुवाच्य  . त्याच्या अक्षरांना एक वेगळंच वळण . पत्रकांच्या भाऊ गर्दीतही ते वळण लगेच लक्षात येत असे ; व्याकरणाशी मात्र सलगी नसे !

विजय जावंधिया याचा निर्भीडपणे प्रश्न विचारण्याचा आणि वेगळी मत स्पष्टपणे मांडण्याचा स्वभाव शरद जोशी यांना फारसा रुचत नसल्याचं जाणवत असे पण , प्रश्न विचारणं आणि स्पष्ट मतं मांडणं ही विजयची खासीयत होती . शेतकरी संघटना म्हणजे शरद जोशी सर्वेसर्वा असा तो काळ होता . ( तेव्हा शरद जोशी यांना आम्ही कांही पत्रकार खाजगीत ‘बिग ब्रदर’ म्हणत असू ; याचा संदर्भ जॉर्ज ऑरवेलच्या ऑल टाइम ग्रेट ‘1984’ या कादंबरीशी होता . )  तरीही बाकी सर्व गुणांमुळे विजय जावंधिया शरद जोशी यांच्या गळ्यातला ताईत बनला नसता तरच नवल होतं . इतका लाडका ताईत की शरद जोशी यांचा उत्तराधिकारी विजयकडे म्हणून बघितलं जाण्याचे  दिवस आले . विजयकडे संघटनेच्या राज्याध्यक्षपदाची सूत्रे आली .  देशात ठिकठिकाणी तो शेतकरी संघटनेतर्फे संबोधित करु लागला . तेव्हा लाखांच्या गर्दीत झालेल्या विजयच्या सभा अजूनही आठवतात . विजयचा वावर राष्ट्रीय  होण्याचा तो काळ होता . ते सर्व संपर्क विजयनं अजूनही कायम राखले आहेत . मात्र वावर राष्ट्रीय होऊनही नागपुरात आला की ‘डाऊन टू अर्थ’ अकृत्रिम मैत्रीचा प्रत्यय विजय जावंधियाकडून येत असे . आम्हा मित्रांत असणारा त्याचा वावर ‘अहं’ पासून कोसो दूर असायचा .

आज प्रथमच लिहितो आहे , शरद जोशी यांच्या सर्वच भूमिका विजय जावंधिया याला पटणं शक्य नव्हतं आणि कधी तरी तो त्यांच्यापासून विभक्त होण्याची  वेळ येणार यांचा अंदाज आलेला होता . ‘राजकारणात कधीच येणार नाही’ , ‘निवडणूक लढवणार नाहीच’ ( यातील ‘च’ महत्त्वाचा ; एक पत्रकार म्हणून मीही तो अनेकदा ऐकलेला आहे ) असं एकीकडे शरद जोशी ठासून सांगत आणि दुसरीकडे उजव्या विचाराच्या राजकारण्यांशी सलगी  साधत असल्याची सुरु झालेली कुजबूज हळूहळू वाढतच गेली . ( पुढे तर शरद जोशी त्याच उजव्यांच्या सहकार्यानं कृषी विषयक राष्ट्रीय समितीवर गेले , राज्यसभेवर नियुक्त झाले . )

शरद जोशी यांच्यापासून बंडखोरी करण्याचा निर्णय विजय जावंधिया याने अखेर घेतलाच . तेव्हा तो निर्णय फारच धाडसीहोता कारण जो शरद जोशी यांच्यापासून दुरावला तो संपला असं समजलं जाण्याइतका शरद जोशी यांचा करिष्मा गडद होता . मात्र , दुरावल्यावरही शरद जोशी यांच्या धोरणाच्या संदर्भात विजय मत प्रदर्शन करत असे ; शरद जोशी यांचा अवमान होईल असा शब्द विजयच्या तोंडून ( अगदी खाजगीतही ) बाहेर पडला असल्याचं किमान मला तरी आठवत नाही आणि तो सर्वांचाच अनुभव असणार याची खात्री आहे . विजयच्या अंगी असणारा हा सुसंस्कृतपणा विलक्षण भावणारा आहे यात शंकाच नाही .

एक कार्यक्रमात डावीकडून प्रवीण बर्दापूरकर , ज्येष्ठ संपादक प्रकाश दुबे आणि विजय जावंधिया ( छायाचित्र- शेखर सोनी )

शरद जोशी यांच्यापासून विजय दुरावला तरी शेतकऱ्यांच्याप्रती असणाऱ्या  संवेदनापासून त्यानं मुळीच फारकत घेतली नाही . त्याच्या जगण्याचा श्वास आणि नि:श्वास शेतकरी आणि शेतमजूर आहे , त्यांचे प्रश्न विजयचा रक्तगट आहे आणि त्यांना सन्मानानं जगण्याचा समतेचा हक्क मिळावा हेच विजयचं स्वप्न आहे . तो आणि नंतरचा कांही काळ विलक्षण घुसमटीचा होता , प्रवादांचा होता आणि प्रश्नांच्या भोवऱ्यातही गुंतवणारा कसा होता हे ठाऊक असणा-यात मी एक आहे . ते सर्व ताकदीनं  सहन करुन , प्रतिकूल परिस्थितीतही  शेतकऱ्यांच्या प्रश्नांची मशाल हाती घेऊन चालण्याची विजयची एकांडी शिलेदारी विविध व्यासपीठांवरुन सुरुच आहे . शेतीची दुरावस्था , कोसळलेलं अर्थकारण , शेतीचं समाजकारण , कडेलोट झालेलं भावजीवन याविषयी मग सातत्यानं बोलत राहिला . त्याच्या मांडणीची  दखल पंतप्रधानांसह सर्वच राज्यकर्ते गंभीरपणे घेऊ लागले . एकदा तर तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग विजयच्या वर्धा जिल्ह्यातल्या छोट्याशा गावी गेले . विजयचं शेतीबद्दलचं म्हणणं त्यांनी तब्बल तासभर ऐकून घेतलं . अशी मान्यता मिळूनही विजय जावंधिया उतला नाही , मातला नाही . त्याचे पाय जमिनीवरच घट्ट राहिले .

विजय जावंधिया आणि माझे या सर्वापलीकडे जाऊन मैत्रीचे बंध आहेत ; ते रेशमी आहेत , त्यांना भावनेची किनार आहे ; माझी बेगम मंगलाच्या मृत्यू नंतर त्याचा फोन आला पण , आम्ही दोघंही कांहीच बोललो नाहीत इतके ते बंध गहिरे आहेत , पण ते असो .

विजय जावंधिया नावाच्या एकांड्या शिलेदार मित्राचा मला सार्थ अभिमान आहे , हे समाधान अपरंपार आहे .

प्रवीण बर्दापूरकर

Cellphone  +919822055799
www.praveenbardapurkar.com

साडेचार दशकांच्या पत्रकारितेतील अनुभव कथन

आनंद मीडियाच्यावतीने लवकरच प्रकाशित होत आहे

अन्य तपशील लवकरच

संबंधित पोस्ट