बबनराव ढाकणे नावाचं वादळ

‘ऐसे’ राजकारणी आता दुर्मीळ झाले आहेत…  

त्रकारांच्या माझ्या पिढीनं महाराष्ट्राच्या रस्त्यावरच्या आणि विधिमंडळातल्या राजकारणात अनेक ‘बलदंड’ नेते पाहिले . १९७५ ते ९० चा तो कालखंड होता . तेव्हाचे बहुसंख्य नेते उच्चविद्याविभूषित नव्हते पण , सुसंस्कृत आणि जनतेच्या समस्यांविषयी तळमळ असणारे होते . भलेही बहुसंख्य नेते शैक्षणिक आघाडीवर फारशी चमक दाखवू शकले नसतील पण , त्याच्या आकलनाच्या कक्षा वैपुल्यानं व्यापक होत्या . महाराष्ट्राच्या राजकारण , समाजकारण , सहकार , प्रशासन , अर्थकारण या क्षेत्रांची त्यांना असणारी सूक्ष्म जाणकारी अनुभवतांना चकित व्हायला होत असे . प्रशासनावरची त्यांची पकड वाखाणण्यासारखी असे . एखादा प्रश्न पूर्णपणे जनहिताचाच आहे हे लक्षात आलं की , नियम आणि कायदे बाजूला कसे सारावेत , हे त्यांना चांगलं ठाऊक होतं . सरकारनं एकदा निर्णय घेतला की , कामाचे आदेश (जीआर) आजच्यासारखे महिनोगणती रेंगाळण्याचे ते दिवस नव्हते . वसंतदादा पाटील , शंकरराव चव्हाण , शरद पवार , सुधाकरराव नाईक यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात तर सरकारनं सकाळी एखादा निर्णय घेतला की, दुपारपर्यंत आदेश जारी झालेला असे . सत्तेत प्रामुख्यानं काँग्रेस असण्याचा तो काळ होता आणि विरोधी पक्षात जे बलदंड नेते होते त्यापैकी बबनराव ढाकणे एक. बबनराव ढाकणे नावाचं ते वादळच होतं .
१९७७ साली मी पत्रकारितेत आलो तेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणात बबनराव ढाकणे ( १० नोव्हेंबर १९३७-२६ ऑक्टोबर २०२३ )  यांचं नाव चांगलंच गाजत होतं . याचं कारण त्यांच्यातली वादळी आक्रमकता .  बबनराव अहमदनगर जिल्ह्यातल्या पाथर्डी या दुष्काळी तालुक्यातले . पाथर्डी तालुक्याचे प्रश्न सरकार सोडवत नाही म्हणून तेव्हा तरुण असलेले बबनराव इतके संतप्त झाले की , विधानसभेच्या प्रेक्षक गॅलरीतून सरकार विरोधी पत्रकं फेकत त्यांनी चक्क सभागृहात उडी घेतली . महाराष्ट्राच्या विधानसभेत अशी घटना तत्पूर्वी घडली नव्हती त्यामुळे सभागृह अवाकच झालं होतं . बबनरावांची उडी हा सभागृहाचा मानभंग आहे म्हणून बबनरावांनी माफी मागावी असा प्रस्ताव विधानसभेनं संमत केला . पण, बबनराव बधले नाहीत . या ‘अँग्री  यंग मॅन’नं माफी मागायला ठामपणे नकार दिला आणि आठ दिवस तुरुंगवास पत्करला . बबनरावांची रवानगी ऑर्थर रोड कारागृहात झाली पण , आवर्जून सांगायचं  म्हणजे तेव्हाचे राजकारणी सुसंस्कृत होते . कारागृहातून सुटका झालेल्या बबनराव ढाकणे यांना तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी बोलावून घेतलं . बबनरावांचं म्हणणं काय ते समजावून घेतलं आणि पाथर्डी तालुक्यात विकासाची अनेक काम सुरु करण्याचे आदेश तेव्हा वसंतराव नाईक यांनी दिले ; असं सुसंस्कृत आणि उमदं  राजकारण आणि राजकारणी आता केवळ आठवणीतच उरले आहेत .  गमतीचा भाग असा की , प्रेक्षक गॅलरीतून विधानसभेत उडी मारणारा बबनराव ढाकणे नावाचा अँग्री यंग मॅन पुढे त्याच सभागृहाचा सदस्य म्हणून निवडून आला . एवढंच नाही तर पुलोदच्या
काळात शरद पवार यांच्या नेतृत्वाखालच्या मंत्रिमंडळात बबनराव मंत्री होते , पुढे  बॅ. अंतुले
विधिमंडळाचे सदस्य असण्याच्या काळातील बबनराव ढाकणे
मुख्यमंत्री झाले तेव्हा बबनराव ढाकणे विधानसभेचे विरोधी पक्षनेते झाले . अंतुले यांच्या पाठोपाठ बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री झाले आणि तेही अंतुले यांच्याप्रमाणेच विधी विषयात उच्चशिक्षण घेतलेले म्हणजे बॅरिस्टर होते . या दोन बॅरिस्टरांविरुद्ध जेमतेम आठवा वर्ग शिकलेले बबनराव ढाकणे सभागृहात तडफेनं संघर्ष करत असत .
विधानसभेचे विरोधी पक्षनेते असतांनाच बबनराव ढाकणे यांच्याशी माझा एक पत्रकार म्हणून जवळून संपर्क आला . तेव्हाची एक हकिकत इथे आवर्जून सांगायला हवी कारण त्यातून तत्कालीन विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधी जनतेच्या प्रश्नांबद्दल  कसे आक्रमक होते हे लक्षात येईल . तेव्हा मी नागपूरच्या ‘नागपूर पत्रिका’ या दैनिकाचा मुख्य वार्ताहर होतो .प्रशासनाच्या लालफितशाहीचा फटका एकनाथ बागडे नावाच्या एका इसमाला कसा बसला परिणामी त्याला कारागृहातच कसं राहावं लागलं . अशी एक बातमी माझ्या हाती लागली . एकनाथ बागडे कडून वेडाच्या भरात पोटच्या गोळ्याचीच हत्या झाली होती . म्हणून पोलिसांनी त्याला अटक केली . त्याची बिघडलेली मन:स्थिती लक्षात घेऊन न्यायालयानं त्याला मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवलं . पुढे खटला चालला . न्यायालयानं त्याची निर्दोष मुक्तता केली पण , त्याच्या सुटकेचे आदेश पोलिस , कारागृह  का आरोग्य खात्यानं जारी करायचे अशा लालफितशाहीत एकनाथ बागडेची मुक्तता तब्बल पाच वर्षे लांबली . दरम्यान एकनाथ बागडेची बिघडलेली मन:स्थितीही पूर्णपणे सावरली होती . थोडक्यात एका शहाणा माणूस वेड्यांच्या इस्पितळात प्रदीर्घ काळ ( सुमारे पांच वर्ष ) खितपत पडला होता . विधिमंडळाच्या नागपूरला होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या काळातच ही बातमी प्रकाशित झाली . माणूस पाठवून बबनरावांनी मला बोलावून घेतलं . सर्व माहिती जाणून घेतली आणि सभागृहात हा प्रश्न उपस्थित केला . प्रकरण गंभीरच होतं . म्हणून सहाजिकच विरोधी पक्षाच्या अनेक सदस्यांनीही  ते लावून धरलं . बबनराव आणि अन्य कांही सदस्य इतके आक्रमक झाले की , सभागृहात उत्तर देत असलेल्या तत्कालीन आरोग्य राज्यमंत्री सतीश चतुर्वेदी यांची भंबेरीच उडाली . अखेर मुख्यमंत्री असलेले बॅ. ए. आर. अंतुले यांना हस्तक्षेप करत एकनाथ बागडेची तातडीनं सुटका केली जाईल असं जाहीर करावं लागलं .  जनतेच्या प्रश्नावर विरोधी सदस्य राजकीय विचार बाजूला ठेवून एकत्र कसे येतात याचं दर्शनच त्या निमित्तानं विधानसभेत घडलं . तेव्हापासून बबनरावांची आणि माझी चांगली जानपहचान झाली.
चळवळीतून तावूनसुलाखून नेता झालेला राजकारणी जनतेच्या प्रश्नाप्रती  संवेदनक्षम जसा असतो तसंच लोकांत वावरतांना मोकळा-ढाकळाही असतो . बबनराव ढाकणे यांचं व्यक्तिमत्त्व हे असंच होतं . बंडखोरी आणि तडफ त्यांच्या रक्तातच होती . कारण नसतांना वसतिगृहाचे अधिकारी रागावले म्हणून तेव्हा १४ वर्षे वय असलेल्या बबनरावांनी चक्क विनातिकीट प्रवास करत दिल्ली गाठली आणि तेव्हाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना भेटून त्या अधिकाऱ्याची तक्रारही केली होती . अशी अफलातून जिगर  बबनरावच  दाखवू जाणे . ही हकिकत त्यांच्या रसाळ कथनशैलीत ऐकण्याचा अनुभव मला घेता आला आहे .
बबनरावांच्या आक्रमकतेची विधिमंडळाच्या इतिहासात नोंदवली गेलेली आणखी एक घटना राजदंड पळवण्याची आहे . मंडल आयोगाच्या शिफारशीवर राज्य सरकारनं चर्चा करावी अशी मागणी विरोधी पक्षांनी विधानसभेत लावून धरली . पण सरकार ढिम्म होतं . वातावरण तापलं . इतकं तापलं की,  विरोधी पक्षांचे सदस्य संतप्त झाले . बबनरावांना तर इतका राग आला की, त्यांनी विधानसभा अध्यक्षांच्या समोर ठेवलेला राजदंडच सभागृहाबाहेर पळवून नेला . मध्यम उंची , निमगोरा वर्ण , काहीशी स्थूल म्हणता येईल अशी शरीरयष्टी असणारे बबनराव तसे चपळ (Astute) होते . त्यामुळे राजदंड घेऊन त्यांनी सभागृहाबाहेर धूम ठोकल्यावर सुरक्षा रक्षकांची तो राजदंड परत मिळवतांना बरीच दमछाकच  झाली . सुरक्षा रक्षकांनी तो राजदंड जागच्या जागी ठेवल्यावर जणू काही घडलंच नाही अशा हसतमुखानं सभागृहात प्रवेश करणारे बबनराव अजून आठवतात . तेव्हापासून हा राजदंड कुलूपबंद करण्याची सोय करण्यात आली .
बबनराव आक्रमक होते पण आततायी नव्हते . आक्रमकता आणि आततायीपणा यातला भेद त्यांना चांगला ठाऊक होता म्हणूनच त्यांनी सभागृहात किंवा सभागृहाबाहेरही वावरतांना अनेक ‘धाडसी’ कृत्य केली पण ते आततायी म्हणा का वचावचा , कधीच वागले नाहीत . बबनरावांचं  वाचन चांगलचं होतं आणि महत्त्वाची बाब म्हणजे त्यांची स्मरणशक्ती अतिशय दांडगी होती . शेवटपर्यंत  त्यांच्या सभागृहातील किंवा रस्त्यावरील राजकारणाच्या काळातला संदर्भ तारखेनिशी अचूक सांगत असत . जनता पक्षात असतांना त्यांना स्वपक्षीयांविरुद्धही बराच संघर्ष करावा लागला पण बबनराव डगमगले नाहीत . ज्याला ‘अॅक्रॉस द पार्टी’ म्हणतात  तसा त्यांचा लोकसंग्रह होता . एखाद्या पट्टीच्या राजकारण्याला शोभेशा ( पण , अनेकांना अनाकलनीय वाटणाऱ्या ) राजकीय तडजोडीही त्यांनी केल्या ( असंख्याचं श्रद्धास्थान असलेल्या भगवानगडच्या मुद्द्यावर ते गोपीनाथ मुंडे यांनाही थेट भिडले होते . ) आणि त्यांची किंमतही न डगमगता चुकती केली . वादळी वागण्यामुळे वाट्याला आलेली स्वपक्षीयांची नाराजी बबनरावांनी तमा न बाळगता कसलेल्या राजकारण्याला शोभेशा वृत्तीनं घेतली . लोकसंग्रह करतांना त्यांच्यात स्वार्थीपणा नसायचा हेही तेवढंच खरं . त्यामुळे त्यांचा लोकसंग्रह महाराष्ट्रभर होता . त्या लोकसंग्रहामुळेच बीड लोकसभा मतदार संघातून केशरकाकू क्षीरसागर यांच्यासारख्या मातब्बर नेत्याचा पराभव करता येणं बबनराव ढाकणे यांना शक्य झालं . ते लोकसभेवर विजयी झाले आणि केंद्रात राज्यमंत्रीही झाले .  हे असं असूनही राजकारणातून बाजूला पडल्यावर म्हणा की , निवृत्त पत्करावी लागल्यावर म्हणा , वसतिगृहाच्या एका खोलीत विरक्तपणे जगण्याचा बाणाही बबनराव ढाकणे यांच्या जगण्याच्या शैलीला शोभेसाच होता .
सहकाराच्या क्षेत्रातही बबनराव ढाकणे यांनी चांगली कामगिरी बजावली अर्थात हे तेव्हाच्या सर्वपक्षीय राजकारण्यांचं वैशिष्टचं होतं . जिल्ह्यातल्या बड्या सहकारी नेत्यांशी टक्कर देत पाथर्डीसारख्या दुष्काळी भागात त्यांनी केदारेश्वर साखर कारखाना उभारला , शिक्षण संस्था सुरु करुन तालुक्यातल्या हजारोंना ज्ञानाच्या वाटेवर चालण्यास उद्युक्त केलं . त्यांच्या बायोडेटातील अशी बरीच कामं सांगता येतील . बबनरावांच्या राजकीय कारकिर्दीचा सूक्ष्म आढावा घेण्याइतका मी त्यांच्या निकट नव्हतो  पण , फार दूरही नव्हतो. तरी बबनराव ढाकणे यांची राजकीय कारकीर्द एक पत्रकार म्हणून चांगलीच अनुभवता आली . आम्ही दिल्ली सोडून औरंगाबादला स्थायिक झाल्यावर एक दिवस बबनरावांचा अचानक फारा वर्षांनी फोन आला . माझ्या एका ब्लॉगमध्ये असलेला त्यांचा उल्लेख आणि एका घटनेविषयी त्यांनी बोलायला सुरुवात केली . ते माझ्या लेखनाचे नियमित वाचक आहेत हे तोवर  मला ठाऊकच नव्हतं . (आमच्यातला हा संपर्क केदारेश्वर साखर कारखान्याचे माजी कार्यकारी संचालक आणि माझ्या लेखनाचे नियमित वाचक प्रवीण शिंदे यांनी घडवून आणला होता.) नंतरही अनेकदा त्यांचा फोन येत असे . एखादा राजकीय संदर्भ हवा असला की काँग्रेसचे ज्येष्ठ नेते , ज्येष्ठ मित्रवर्य रत्नाकर महाजन यांच्याशी संपर्क साधण्याची माझी सवय अजूनही आहे ; मग त्या यादीत बबनराव ढाकणे यांचं नाव जोडलं गेलं . पाथर्डीच्याच प्रा . डॉ . संजय उदामले यांनी ‘महाराष्ट्र विधानमंडळातील बबनराव ढाकणे’ हे पुस्तक संपादित केलं  आहे . त्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्तानं भेटायचं आमचं ठरलं होतं , पण कोरोनामुळे तो कार्यक्रमच लांबला आणि नंतर तो झाला तेव्हा त्यात सहभागी होण्याबाबत माझी प्रकृतीची अडचण होती . मात्र , त्या कार्यक्रमासाठी माझ्या प्रतिक्रियेची व्हिडिओ क्लिप बबनरावांनी मागवून घेतली होती . मी जे काही बोललो ते आवडल्याचं बबनरावांनी आवर्जून तेव्हा लगेच कळवलं . समक्ष भेटण्याचे आणि भरपूर गप्पा मारण्याचे  वादे आम्ही परस्परांना दिले ,  पण का कोण जाणे ते कधीच प्रत्यक्षात उतरले नाहीत . आता तर बाबनरावच या जगात नाहीत ; आम्ही परस्परांना दिलेले ते  वादे आता कधीच पूर्ण होणार नाहीत…
जनतेच्या समस्येविषयी नितातं तळमळ असणारे  बबनराव ढाकणे यांच्यासारखे आक्रमक आणि उमद्या स्वभावाचे राजकारणी आता दुर्मीळ झाले आहेत .
प्रवीण बर्दापूरकर
Cellphone  +919822055799
www.praveenbardapurkar.com

साडेचार दशकांच्या पत्रकारितेतील अनुभव कथन

आनंद मीडियाच्यावतीने लवकरच प्रकाशित होत आहे

अन्य तपशील लवकरच

संबंधित पोस्ट