‘भ’कार आणि शिवराळ संजय राऊत !

खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासंदर्भात विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरादाखल केलेली थुंकण्याची कृती हा महाराष्ट्रातल्या राजकारण्यांच्या किळसवाण्या संस्कृतीचा कळस आहे . ज्या राजकारण्यांना आता सक्तीनं घरी बसवण्याची वेळ आली आहे त्या यादीत संजय राऊत यांचं नाव अग्रभागी आहे . कारण अश्लाघ्य असंस्कृतपणे जाहीर वर्तन करण्याची संजय राऊत यांची ही काही पहिली वेळ नव्हे.

संजय राऊत यांच्याकडे दोन नजरेतून पाहण्याची गरज ज्या वर्गात आहे त्यातील मीही एक आहे. एक्स्प्रेस वृत्तपत्र समूहात संजय आमचा सहकारी होता. अतिशय धडपड्या , उत्साही आणि माहितीपूर्ण असा तेव्हाचा सळसळता तरुण संजय अजूनही आठवतो . त्याच्यातील लेखन कौशल्य ‘लोकप्रभा’चे तत्कालीन संपादक प्रदीप वर्मा यांनी रत्नपारख्याच्या नजरेनं हेरलं . पाहता पाहता संजय राऊत राज्यातला आघाडीचा पत्रकार बनला . संजय राऊत लोकप्रभात असतांना आम्हा ज्येष्ठांशी अतिशय अदबीनं वागायचा . पुढे ‘सामना’चा कार्यकारी संपादक आणि राज्यसभा सदस्य झाल्यावरही संजयनं ज्येष्ठांशी अदबीनं वागायची सवय कायम ठेवली , हे आवर्जून नोंदवायला हवं . आमच्या पिढीतला सर्वात तरुण संपादक संजय झाल्याचा अभिमान आणि कौतुक तेव्हा आम्हाला होतंता . राजकारणात पुढे तो आणखी मोठा झाला . शिवसेनेनं भाजपशी फारकत घेतल्यावर राज्यात सत्तारुढ झालेल्या महाविकास आघाडीचा तो एक शिल्पकार होता . माध्यमात त्याचा उल्लेख ‘चाणक्य’ असा केला जाऊ लागला . सत्ता आणि पद मिळूनही संजयचे पाय जमिनीवरच असल्याचा अनुभव याही काळात अनेक ज्येष्ठांनी घेतला . शिवसेनेचा खासदार ,  प्रवक्ता म्हणून हजरजबाबीपणानं वावरणारा , आक्रमणपणे प्रतिपक्षावर तुटून पडणारा संजय आम्हा मित्रांसाठी मुळीच बदलला नव्हता . अशात भेट झाली तेव्हा ‘काय चाणक्य कसा आहेस?’ असा उल्लेख केल्यावर ‘तुम्हा ज्येष्ठांसाठी मी तोच ‘संज्या’ आहे’ , असा म्हणणारा संजय राऊतच आहे .

संजय राऊतनं श्रीकांत शिंदेंच्या संदर्भात जे काही वर्तन केलं त्याचं मुळीच समर्थन करता येणार नाही . श्रीकांत शिंदे खासदार नसते , मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव नसते , राजकारणातही नसते तरीही संजय राऊत यांचं ते वर्तन कोणत्याच पातळीवर समर्थन करण्यासारखं ठरलं नसतं . संजय राऊत आक्रमक होते आणि आहेतही , शिवसेनेच्या ‘संस्कृती’शी अद्वैत नातं असल्यानं संजय राऊत यांच्यात एक शिवराळपणाही आहे . ‘अरे’ला ‘कारे’ करत समोरच्याला शिंगावर घेण्याची बेडर वृत्तीही संजय राऊत यांच्यात आहे . हे सर्व गुण आहेत का अवगुण हे ठरवण्याचे निकष व्यक्तीसापेक्ष असू शकतात . शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्यातही असे गुण होते आणि त्यांच्या छत्रछायेत प्रदीर्घ काळ राहिल्यामुळे ते संजय राऊत यांच्यात स्वाभाविकपणे उतरले आहेत , पण जे बाळासाहेबांना शोभत होतं ते आपल्याला शोभेल असं नसतं , याचा विचार संजय राऊत यांनी कधीच केलेला दिसत नाही . त्यामुळे जनसामान्यात सोडाच पण शिवसेनेच्या नेते आणि सैनिकांतही फार काही आपुलकीची भावना संजय राऊत यांच्याबद्दल आहे असं महाराष्ट्रात तरी फिरतांना जाणवत नाही .

महाराष्ट्राच्या राजकारणाला आक्रमकतेची परंपरा आहे , पण त्या आक्रमकतेनं सुसंस्कृतेशी फारकत घेतल्याची फार काही उदाहरणे २०१० पर्यंत सापडत नाहीत . माझी पिढी पत्रकारितेत येऊन आता साडेचार दशकं  होताहेत . १९८१ साली विधीमंडळ आणि नंतर राजकीय वृत्तसंकलनाच्या क्षेत्रात आल्यावर  बरेच नेते बघायला मिळाले . पुढे केंद्रीय मंत्री झालेल्या बबनराव ढाकणे यांनी प्रेक्षक गॅलरीतून थेट सभागृहात उडी मारणं , त्याच सभागृहाचा सदस्य असताना राजदंड पळवणं किंवा जाबुवंतराव धोटे यांनी अध्यक्षांच्या दिशेनं पेपरवेट भिरकावणं , अशा काही आक्रमक कृती घडल्या आहेत . मुख्यमंत्री असलेल्या बाबासाहेब भोसले यांचा जाहीर ‘उद्धार’ करणं किंवा तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या दिशेनं चपला भिरकावल्या गेल्याचेही प्रकार आठवतात . आज खूपसे  शांत झालेले छगन भुजबळ यांनी विधीमंडळ सभागृहातल्या आक्रमकतेला एक वेगळाच आयाम मिळवून दिला . सभागृहात झालेलं कामकाज किंवा एखाद्या सदस्यानं केलेलं वक्तव्य नोंदीतून काढून टाकण्याचा निर्णय अध्यक्ष किंवा सभापतींनी दिला तर तो पत्रकारांवरही बंधनकारक असतो ; त्याचं प्रकाशन करता येत नाही . छगन भुजबळ विधानसभेवर निवडून आलेले ते शिवसेनेचे एकमेव सदस्य होते . तेव्हा विधानसभेत  २८८ निवडून आलेले आणि एक नियुक्त असे  एकूण २८९ सदस्य असत . विधानसभेच्या कामकाजात भुजबळ विरुद्ध अन्य २८८ सदस्य असं रणकंदन नेहमीच माजत असे . कारण भुजबळ यांचा शिवसेना संस्कृतीला साजेशा काहीशा शिवराळ आक्रमकपणा असे . विधानसभा अध्यक्षांनी भुजबळांचं म्हणणं कामकाजातून काढून टाकण्याचे आदेश द्यायला सुरुवात केली तेव्हा भुजबळ यांनी वेगळीच शक्कल लढवली . सभागृहातून वक्तव्य काढून टाकण्याचा आदेश दिला गेला की, छगन भुजबळ सभागृहाबाहेर येऊन पत्रकारांशी बोलतांना कामकाजातून काढून टाकल्या गेलेल्या वक्तव्याचा पुनर्उच्चार करत आणि त्यांना मोठी प्रसिद्धी मिळत असे . शिवसेनेत बंडखोरी केल्यावर छगन भुजबळ आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यात रंगलेली जुगलबंदी अनेकांच्या अजूनही स्मरणात असेल मात्र , त्या जुगलबंदीत ‘भ’कार नव्हता .

संजय राऊत यांनी मात्र राजकारण करतांना सुसंस्कृतपणा आणि शिष्टाचाराचे सिमोल्लंघन केले आहे . ते पूर्वी आक्रमकपणे बोलत असत पण , एकनाथ शिंदे आणि गट शिवसेनेतून फुटून निघाल्यावर संजय राऊत यांच्या वक्तव्यातला चौकीदार , रिक्षावाला अशा तुच्छ उल्लेखसह शिवराळपणा ‘भ’काराकडे झुकला आहे आणि थुंकण्याच्या प्रतिक्रियेतून तो कृतीच्याही पातळीवर उतरला आहे . हे अतिशय निंदनीय आहे . पक्षाच्या प्रवक्त्याला पक्षाचीच भूमिका लावून ठेवावी लागते . रेटून न्यावी लागते असं करणं ही पक्ष प्रवक्त्याची अपरिहार्य अगतिकता असते , हे खरं आहे पण , सध्या एकूण राजकारणात जो काही शिवराळ आणि ‘भ’कारपणा आला तो सर्वपक्षीय असल्यानं जास्तच निषेधार्ह आहे . असा शिवराळपणा करणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील अनेक नगांची नावे घेता येतील पण , महाराष्ट्रापुरतं बोलायचं तर संजय राऊत या निंदनीय शिवराळांचे महामेरु आहेत असंच म्हणावं लागेल . एकनाथ शिंदे गटाचे महेश शिंदे आणि संजय शिरसाट , राष्ट्रवादीचे जितेंद्र अव्हाड , उद्धव ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे , भाजपचे आशिष शेलार , अतुल भातखळकर असे अनेक जण या शिवराळ पंथाचे निष्ठावंत वारकरी आहेत . संजय राऊत यांच्यासकट या सर्वांचच बौद्धिक , सांस्कृतिक आणि नैतिकही अध:पतन वैपुल्यानं झालं आहे . याचा खेद आहे .

शिवराळपणा क्षणभर बाजूला ठेवूया पण , महाराष्ट्राचे मूलभूत प्रश्न किंवा मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून संजय राऊत राज्यसभेत कधी आक्रमक झाल्याचे आजवर दिसून आलेलं नाही . ज्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार बेकायदेशीर असल्याचा दावा संजय राऊत करतात त्याच एकनाथ शिंदेंना भेटायला वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत निवासस्थानी शरद पवार जातात तेव्हा संजय राऊत यांचा ‘भ’कारी शिवराळपणा आणि आक्रमकता दडून बसलेली असते , असा हा विरोधाभास आहे . उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची सध्याची अवस्था लक्षात घेता संजय राऊत यांना राज्यसभेची संधी पुन्हा मिळण्याची शक्यता नाही . एकदा का सत्ता आणि पद गेलं तर एक चांगला पत्रकार , एक चांगला मित्र आणि एक आक्रमक राजकारणी म्हणूनही संजय राऊत विस्मरणात जातील . कारण ‘भ’कार आणि शिवराळपणाच्या पाण्यावर राजकारणाचं पीक कायमच बहरलेलं नसतं ,  हे संजय राऊत यांनी विसरु नये .

प्रवीण बर्दापूरकर

Cellphone  +919822055799
www.praveenbardapurkar.com

संबंधित पोस्ट