​-म्हणून अनंतराव भालेराव यांचं स्मरण ​गरजेचं आहे…  

‘कैवल्यज्ञानी’ हा पत्रमहर्षि अनंतराव भालेराव यांच्या बहुपेडी स्मरणांचा ग्रंथ वाचकांच्या हाती सोपवतांना एक विलक्षण समाधान आहे . स्वतंत्र लेखन आणि संपादन असं मिळून , हे माझं पंधरावं  पुस्तक . स्वतंत्र लेखनाला मिळालेला वाचकांचा प्रतिसाद आणि त्यातून मिळणाऱ्या समाधानापेक्षाही संपादनातून मिळणारा आनंद जास्त आहे , हे प्रांजळपणे मी कबूल करतो . याचं कारण कदाचित , गोतावळ्यात रमणं मला आवडतं  हे असावं . ‘आई’ , ‘ग्रेस नावाचं गारुड’ , ‘माध्यमातील ‘ती’’ आणि आता ‘कैवल्यज्ञानी’ या चार पुस्तकांच्या संपादनाच्या निमित्तानं अभिजनांच्या मांदियाळीत वावरता येण्याचा अनुभव काही औरच होता . गिरीश कर्नाड , महेश एलकुंचवार , आशा बगे , ग्रेस , यशवंत मनोहर , सुरेश द्वादशीवार , ह. मो. मराठे , या सभागृहात उपस्थित असलेले डॉ . सुधीर रसाळ , न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर उपाख्य नानासाहेब चपळगावकर , निशिकांत भालेराव , राधाकृष्ण मुळी , डॉ . सविता पानट अशा असंख्यांच्या  या मांदियाळीत समावेश आहे . कुठलंच पुस्तक कधीच एकट्या लेखकाची निर्मिती नसते . ‘कैवल्यज्ञानी’ही त्याला अपवाद नाही . सर्व सहभागी मान्यवर लेखक , अनेक पत्रकार , अभंग प्रकाशनचे सर्व सहकारी , मुद्रितशोधनाची महत्त्वाची कामगिरी बजावणारे डॉ . सुरेश सावंत , अंतर्गत मांडणी करणारे अतुल बर्रेवार , संपादनाच्या कामात महत्त्वाची भूमिका निभावणारे संजीव कुळकर्णी , मुखपृष्ठकार सरदार जाधव अशा अनेकांचा सहभाग हा तीनशे पानी ग्रंथ सिद्ध करण्यात लाभलेला आहे ; या सर्वाविषयी मी कृतज्ञता व्यक्त करतो .
अनंतराव भालेराव हे काही पत्रकारितेतील स्कूल किंवा विद्यापीठ नाही तर  हा मराठवाड्याच्या सलग चार पिढ्यांच्या पत्रकारितेवर , समाजमनावर झालेला मूल्य आणि निष्ठा यांचा तो अमीट संस्कार आहे . निशिकांत भालेराव हा अनंतराव भालेरावांचा पुत्र आणि पत्रकारितेतील माझा दोस्त . अनंतरावांना तो अण्णा म्हणत असे .  म्हणून त्यांना मीही अण्णाचं म्हणत असे ; माझ्या वडिलांनाही मी अण्णा म्हणत असे म्हणजे एका अर्थानं ते माझे पितृतुल्यही . अनंतराव भालेराव यांना जाऊन आता ३० वर्षे झाली आणि त्यांचा मराठवाडा बंद होऊनही सुमारे अडीच दशके उलटली तरी मराठी पत्रकारितेत अनंतराव आणि दैनिक ‘मराठवाडा’ हा संदर्भ आणि महत्त्व अजूनही कालबाह्य झालेला नाही . अनेकांना आवडणार नसलं तरी , स्पष्ट सांगायचं  झालं तर , अनंतराव भालेराव यांच्यानंतर मराठवाड्याच्या सामाजिक , आर्थिक , राजकीय , सांस्कृतिक जगताचा दुसरा प्रवक्ताच अजूनही निर्माण होऊ शकला नाही , इतकं अण्णाचं एक संपादक म्हणून असलेलं स्थान अनन्यसाधारण आहे .
या पुस्तकाचं  नाव ‘कैवल्यज्ञानी’ ठेवण्यामागे एक निश्चित भूमिका आहे . कैवल्य ज्ञान म्हणजे शुद्धज्ञान . अनंतराव भालेराव यांची पत्रकारिता शुद्ध होती , पत्रकारितेच्या पवित्रतेवर त्यांची अव्यभिचारी निष्ठा होती . त्यांच्या पत्रकारितेचा तो संस्कार आमच्या पिढीवर आहे  , म्हणूनच या पुस्तकाचे नाव ‘कैवल्यज्ञानी’ आहे . हा गौरव ग्रंथ नाही तर मराठी पत्रकारितेतील चार पिढ्यांवर पत्रकारितेचा शुद्ध संस्कार करणाऱ्या एका वारकऱ्याचे अनेकांकडून हे करण्यात आलेले नम्र स्मरण आहे .
केवळ अनंतराव भालेरावच नाहीतर त्यांचे समकालीन असणारे रंगा उपाख्य अण्णा वैद्य , दादासाहेब पोतनीस , भाई मदाने , निशिकांत उपाख्य नानासाहेब  जोशी , ब्रिजलाल बियाणी , कांतीलाल गुजराथी , सुधाकर डोईफोडे , अनंत गोपाळ शेवडे , ‘सत्यवादी’कार पाटील…अशी महाराष्ट्राच्या विविध भागातील संपादक मंडळी ; पत्रकारिता म्हणजे सामाजिक बांधिलकी , जनतेचे प्रश्न मांडणं , अबोलांचा आवाज होणं , सत्य सांगणं , यावर प्रखर निष्ठा ठेवलेले संपादक होते आणि हे स्पष्टपणे सांगण्यासाठी प्रसंगी कारागृहात जाण्याची किंमतही त्यांनी मोजली . तेव्हाची वृत्तपत्रे आजच्यासारखी मालकांच्या नावानं  नव्हे तर या संपादकांच्या नावानं ओळखली जात असत , इतका त्यांच्या नावाचा प्रभाव वाचकांच्या मनावर होता
दोन घटना सांगतो .
एक– एका माध्यम समुहाच्या वार्षिक बैठकीत एका ज्येष्ठ पत्रकाराला त्याच्या वर्षभराच्या उपलब्धीच्या संदर्भात (Key Result Area) विचारण्यात आलं . तेव्हा त्यानं कुठल्याशा सामाजिक विषयावर त्याच्या बातम्या कशा गाजल्या . विधिमंडळात त्या बातम्यांवर घनघोर चर्चा कशी झाली आणि त्या विषयाची उकल होण्यास मदत कशी झाली हे सांगितलं . त्यावर व्यवस्थापनाचा म्हणजे ( मालकाचाच ! ) प्रश्न होता की , ते सगळं ठीक आहे , पण त्याचा आपल्या ब्रॅण्डला त्याचा काय आर्थिक फायदा झाला ? याचा अर्थ पत्रकारितेच्या सामाजिक बांधिलकीपेक्षा आर्थिक फायदा व्यवस्थापनाला जास्त महत्त्वाचा वाटतो .
दोन- ‘कैवल्यज्ञानी’ या ग्रंथाच्या प्रकाशनाच्या बातम्या बहुतेक सर्व माध्यमात प्रकाशित झाल्या . मात्र ज्या माध्यमात एक वार्ताहर ते एका आवृत्तीचं संपादक असा विविध पदांवर माझा प्रवास झाला आणि ज्या माध्यमात मी दिल्लीचा राजकीय संपादक म्हणून काम केलं त्यात प्रकाशित झालेल्या बातम्यात  ‘कैवल्यज्ञानी’च्या संपादकाच्या ( म्हणजे माझ्या ! ) नावाचा उल्लेख नव्हता ! ठेंगण्या मनाची किरट्या विचाराची माणसं बहुसंख्येनी जिथे असतात तिथे यापेक्षा वेगळं काही घडूच शकत नाही ( असं काहीसं मूळ प्रतिपादन फ्रेंच विचारवंत व्हॉलटेअर याचंही आहे . ) त्यामुळे मला ना त्याचं आश्चर्य वाटलं ना वैषम्यही .  कारण इथे  मुद्दा सर्व प्रकारच्या माध्यमातील पत्रकारिता कशी खुजी होत आहे , पत्रकारितेचं कसं सुमारीकरण होतंय हा आहे .  एखाद्या माध्यमांनं नाव प्रकाशित केल्यानं मी आणखी काही मोठा होणार नाही किंवा न केल्यानं लहानही होणार नाही तर आहे तिथंच राहणार आहे , यांची मला जाणीव आहे मात्र असा  खुजा आणि किरटा संस्कार आमच्यावर अनंतरावांकडून झालेला नव्हता , हे इथे आवर्जून सांगायलाच हवं . अनंतराव भालेराव आणि वर उल्लेख केलेल्या सर्व संपादकांनी त्यांच्या सहकाऱ्यांवर केलेला पत्रकारितेवर केलेल्या पत्रकारितेच्या संस्कारांना प्रखर मूल्य आणि निष्ठांची जोड होती . हे आजच्या पिढीतील पत्रकारांना समजावं हे ‘कैवल्यज्ञानी’च्या निर्मितीमागचं एक प्रमुख कारण आहे . अण्णांची पत्रकारिता कशी होती हे जर समजलंच नाही तर अण्णांसारखे निष्ठावान आणि मूल्यनिष्ठ संपादक ही आजच्या आणि पुढच्या पिढीतील पत्रकारांना एक दंतकथाच वाटू शकेल !
कुठल्याही व्यवसायाच्या यशा-अपयशाचा  मुख्य निकष  वित्तीय असतो . वार्षिक उलाढालीनंतर किती नफा किंवा तोटा झाला त्यावर त्या उद्योग व्यवसायाचं यशापयश आकडेवारीचा आधार घेऊन मोजलं जातं . लोकशाहीत लोककल्याण आणि सेवाव्रत म्हणून केलेल्या पत्रकारितेतही सामाजिक बांधिलकी महत्त्वाची असते . एखाद्या वृत्तपत्रानं / माध्यमानं जनतेची किती प्रश्न मांडली ? किती समस्यांना वाचा फोडली ? आणि त्या संदर्भात असंवेदनशील असणाऱ्या सरकारला कसा जाब विचारला हे निकष पाळले जातात . ‘शहाणे करुन सोडावे सकल जन‘ आणि सरकार आणि प्रशासनातील सत्ताधाऱ्यांना खडसावणं , त्यांना प्रश्न  विचारणं , सांस्कृतिक क्षेत्राला दिशादिग्दर्शन करणं अशी बहुपेडी  कामगिरी पत्रकारिता / माध्यमांना बजावावी लागते . म्हणूनच एस . टी . महामंडळ नफ्यात आहे की तोट्यात हा विचार न करता ‘गाव तिथे एस . टी .’ पोहचून जनतेचा प्रवास सुसह्य झाला हे महत्त्वाचं असतं आणि हेच सूत्र सेवा किंवा व्रत म्हणून पत्रकारिता करणाऱ्या संस्थांना लागू होतं . अनंतराव भालेराव यांच्या पिढीनं ते समर्थपणे निभावलं . आजच्या पत्रकारितेत तसं घडत नाहीये . पत्रकाराला राजकीय भूमिका असावी पण तो कोणत्याही राजकीय विचारांचा प्रवक्ता होऊ नये हा निकष आता बाद झालाय आणि त्याने अन्य काही स्वीकारलेल्या बंधनांमुळे पत्रकारितेच्या  निर्भीडता आणि विश्वासाहार्यतेवर प्रश्नचिन्ह लागलं आहे त्यामुळे पत्रकारितेचा तोल  ढळला आहे म्हणूनच अनंतराव भालेराव यांचं स्मरण ​गरजेचं आहे…
स्वातंत्र्यानंतर भारतीय पत्रकारितेचा प्रवास ‘मिशन टू प्रोफेशन टू बिझनेस’ असा झाला . कोणतेही बदल जसे अपरिहार्य असतात तसेच ते काही बरे आणि काही वाईटही असतात . अध:पतन ही एक मूलभूत प्रक्रिया असते आणि ती अशा बदलातून जन्माला येते . पत्रकारितेच्या बाबतीत निष्ठा आणि मूल्य या दोन्ही निकषावर सर्वच माध्यमातील  विद्यमान  पत्रकारितेचं झालेलं संपादकाचं व्यवस्थापनाच्या अधीन होणं त्यामुळे संपादकपद निष्प्रभ होणं ( पूर्वी संपादक ही व्यक्ती नव्हे तर संस्था मानली जात असे  ) , बाजारपेठेचा माध्यमांवर वाढलेला दबाव आणि त्यातून पत्रकारितेच्या मूल्य आणि निष्ठांचा उठलेला बाजार अशी अनेक कारणं या अध:पतनासाठी आहेत . आपल्या देशात जागतिकीकरण आणि खुल्या व्यवस्थापनानंतर हे जास्त वेगानं घडलं . अध:पतनाचं आणखी एक कारण म्हणजे ,  व्यवस्थापनातली तरुण पिढी व्यवसायात उतरली आणि या पिढीनं निष्ठा व मूल्यापेक्षा पेड न्यूजला विविध माध्यमातून  उदार आश्रय दिला  तेव्हा आवाज न उठवता  बहुसंख्य संपादकांनी शेपट्या कापलेल्या उंदराप्रमाणे माना तुकवल्या आणि सर्वच  माध्यमातील पत्रकारितेची विश्वसनीयता  धोक्यात आली .
हा विषय एवढ्या प्रतिपादनात संपणारा नाही पण , सांगायचं इतकंच आहे  की , अनंतराव भालेराव यांना अपेक्षित असलेली आजची पत्रकारिता नाही . ज्येष्ठ मित्र आणि कवीश्रेष्ठ  ग्रेस यांच्या शब्दांत सांगायचं तर , ‘केवळ पत्रकारिताच नाही तर , समाजाच्या सर्वच क्षेत्रात बहुसंख्येनं छिनाल जमलेले आहेत !’ म्हणून अनंतराव भालेराव यांचं स्मरण विद्यमान परिस्थितीत पुन्हा एकदा करणं आणि तशी न घाबरता सत्य सांगणारी , सरकारला जाब  विचारणारी निर्भीड पत्रकारिता पुन्हा प्रस्थापित होणं गरजेचं आहे याचं स्मरण करुन देणं  हेच या ग्रंथाच्या निर्मितीमागचं प्रयोजन आहे .
जो काही  वेळ संयोजकांनी दिला त्यात एवढंच सांगता येणं शक्य आहे म्हणून या मोठ्या उपस्थितीबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो आणि माझं प्रतिपादन इथेच थांबवतो .

( ‘कैवल्यज्ञानी’ च्या प्रकाशन समारंभात करावयाच्या मनोगताचा हा मसुदा आहे . अत्यंत निकटच्या आप्ताचे आकस्मिक निधन झाल्यानं या कार्यक्रमात मला सहभागी होता आलं नाही . म्हणून ते मनोगत इथे देत आहे . )

( ■अनंतराव भालेराव यांचे पोर्ट्रेट – सरदार जाधव )
प्रवीण बर्दापूरकर

​Cellphone  ​+919822055799

www.praveenbardapurkar.com

संबंधित पोस्ट