‘भाजप’नुकूल कल !

हा मजकूर लिहायला घेतला तेव्हा रात्रीचे आठ वाजले असून बिहार विधानसभा निवडणुकीचे कल आता पुरेसे स्पष्ट झालेले आहेत . या निवडणुकीचे सर्व निकाल हाती येण्यास अजून वेळ आहे परंतु , मतमोजणीच्या बहुसंख्य फेऱ्या संपल्या  आहेत . त्यामुळे हे कल कायम राहतील असं दिसतंय . कोरोनामुळे जे काही सावधगिरीचे उपाय अवलंबण्यात आले त्यात मतमोजणी यंत्रांची संख्या   साधारणपणे ३५ टक्के वाढवल्यानं त्यामुळे मतमोजणी अद्याप पूर्ण झालेली नाही . पूर्ण निकाल येण्यास कदाचित मध्यरात्र उलटेल . मात्र , आतापर्यंत जे काही कल हाती आले आहेत त्यानुसार सध्याचे जे चित्र आहे  त्यात काही फार मोठा बदल होईल असं काही दिसत नाही . आताच्या चित्रानुसार भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी ( एनडीए ) आघाडीला  बहुमतापेक्षा साधारणपणे ४ ते ६ जागा जास्त मिळतील . म्हणजे यापूर्वीच्या मजकुरात  जो अंदाज वर्तविला होता त्याप्रमाणे निसटतं का असेना बहुमत भाजप-जेडीयूला मिळालेलं असेल आणि नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील .  ( हाही अंदाज गेल्या मजकुरात व्यक्त करण्यात आला होता , तोच खरा ठरतोय . ) सुशीलकुमार मोदी पुन्हा मुख्यमंत्री होतील की नाही ? अद्याप अस्पष्ट आहे . ‘बिहारच्या  निवडणुकीचे कल बदलत आहेत का ?’ असा प्रश्न गेल्या आठवड्यात मी व्यक्त केला   होता .त्यासाठी बिहारमधून येणारे  काही रिपोर्टस् हा आधार होता . त्यानुसार या निकालात बिहारमध्ये अनेक कल बदलले आहेत . या बदलेल्या कलांचा फायदा केवळ भाजपला झालेला आहे आणि फटका अन्य सगळ्या पक्षांना बसलेला आहे . बिहारच्या निवडणुकीत जर पराभव पत्करावा लागला तर भाजपाला येणाऱ्या काळात   होणाऱ्या पश्चिम बंगाल , तमीळनाडू , आसाम इत्यादी राज्यातील विधानसभा   निवडणुकात फार मोठ्या आव्हानांना सामोरे जावं लागेल , असा जो अंदाज प्रस्तुत      भाष्यकाराने व्यक्त केला होता तो खरा ठरणार नाही , असं बिहारच्या या     निकालातून स्पष्ट होतंय असंच म्हणावं लागेल . शिवाय उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेशात झालेल्या पोटनिवडणुकातही भाजपनं अपेक्षेप्रमाणे उत्तम कामगिरी बजावली असल्यानं दिवाळी जोरात साजरा करण्याचा आणि विरोधकांच्या नाकावर टिच्चून फटाके फोडण्याचा भक्तांचा मार्ग मोकळा झालेला आहे

गेल्या चार निवडणुकांचा आढावा जर घेतला तर भाजपा हा बिहारमध्ये ‘धाकटा भाऊ’ होता . या निवडणुकीच्या निकालातून भाजपकडे  बिहारमधेही भाजपाकडे ‘मोठ्या भावा’ची भूमिका आलेली आहे आणि नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील जनता दल युनायटेड आता धाकट्या भावाच्या भूमिकेत गेलेला आहे . मात्र , असं असलं तरी नितीशकुमार हेच मुख्यमंत्री होतील , असं भाजपच्या बहुतुक सर्व नेत्यांनी स्पष्ट केलंय . मनोजकुमार तिवारी हे भाजपचे नेते तर म्हणाले की , नितीशकुमार हेच मुख्यमंत्री असतील , हे आमचं युती करताना ठरलं होतं आणि आम्ही युतीधर्म पाळणार आहोत . ते ऐकतांना प्रश्न इतकाच निर्माण होतो की , जो युतीधर्म भाजप बिहारमध्ये पाळतो तो महाराष्ट्रामध्ये का पाळत नाही ? हाच युतीधर्म पाळून महाराष्ट्रात पहिली अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे दिलं असतं तर , महाराष्ट्रात विरोधी पक्षात बसण्याची वेळ भाजपावर आली नसती . पण ते असो…

बिहारच्या विधानसभा निवडणुकीत यावेळेस अनेक उलथापालथी घडलेल्या आहेत . सुरुवातीला भाजपा आणि जनता दल युनायटेडला म्हणजे नरेंद्र मोदी आणि नितीशकुमार यांना सहज-सोपा वाटणारा विजय मतदानाच्या पहिल्या टप्प्यानंतर अधिकाधिक अवघड होत गेला , अशा बातम्या , असे वेगवेगळ्या संस्थांचे अहवाल हाती येत गेले कारण तेजस्वी यादव अचानक एका वादळासारखे पुढे आले त्यामुळे भाजप आणि जनता दल युनायटेड समोर एक खूप मोठं आव्हान उभं राहिलेलं होतं , असं वाटत होतं  . ३० वर्षाच्या तेजस्वी यादवनं या निवडणुकीत नरेंद्र मोदी आणि नितीशकुमार यांना चांगलाच घाम फोडला , यात शंका नाही . ही निवडणूक भाजप आणि नितीशकुमार या दोघांसाठीही भाजप आणि जनता दल युनायटेड म्हणजे नरेंद्र मोदी आणि नितीशकुमार या दोघांसाठीही अतिशय प्रतिष्ठेची होती त्या पार्श्वभूमिवर काँग्रेसला मदतीला घेऊन तेजस्वी यादवनं जे काही आव्हान उभं केलं होतं त्यामुळे भाजप आणि जनता दल युनायटेड या गोटात बरीच खळबळ माजलेली होती . खरं तर , खळबळ माजण्यापेक्षा घबराट माजलेली होती असंच म्हणावं लागेल . कारण शेवटी अशा निवडणुकात जो हुकमाचा पत्ता खेळायचा असतो तो नितीशकुमार यांना खेळावा लागला आणि ‘ही माझी शेवटची निवडणूक आहे’, असं भावनिक आव्हान त्यांना करावं लागलं .

बिहारमधली मतमोजणीचे कल आज सकाळपासूनच सतत इकडून तिकडे झुकत होते . सकाळी साधारण ११ पर्यंत राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस यांचं महागठबंधन  निसटतं का असेना बहुमत प्राप्त करणार असं चित्र हाती आलेल्या कौलातून दिसून आलेलं    होतं . मात्र , हे चित्र हळूहळू बदलत गेलं आणि हा मजकूर लिहित असेपर्यंत निसटतं बहुमत भारतीय जनता पक्ष आणि जनता दल युनायटेडकडे स्पष्टपणे झुकलं आहे आणि आता त्यात फार काही बदल होणार नाहीत . या निवडणुकीमधून एक गोष्ट अतिशय स्पष्ट झाली की , भाजपा हा बिहारमधला एक मोठा राजकीय पक्ष ठरलेला आहे . गेल्या पंधरा वर्षाच्या राजकारणात सतत नितीशकुमारचा म्हणजे प्रादेशिक पक्षाचा पदर धरुन भाजपनं बिहारमध्ये सत्ता मिळवली . खरं तर २०१० च्या निवडणुकीत भाजपाला ९० पेक्षा जास्त जागा होत्या  आणि जनता दल युनायटेडला ११५ जागा होत्या . पण , तेव्हाही मुख्यमंत्रीपदासाठी भाजपा आग्रही राहिला नाही . याच कारण भाजप ज्या पद्धतीनी संघटनात्मक उभारणी करतो त्यात आहे . पहिल्याच झटक्यात भाजप कधीच विजयाची आशा बाळगत नाही . हा पक्ष  हळूहळू पाय पसरत जातो , त्या आजवरच्या अनुभवाप्रमाणे नितीशकुमार हा चेहरा समोर करुन भाजपाने आपले हातपाय अधिक पसरले आहेत , मुळं अधिक मजबूत केली आहेत . भाजपाला जवळपास ७५ जागा या निवडणुकीत मिळाल्या आहेत आणि बाकी सगळेच पक्ष या मतदानाचा हा जो काही कौल आणि कल बदललेला आहे , त्याचे बळी आहेत .

गेल्या निवडणुकीत तेजस्वी येदव यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय जनता दलाला ८० जागा होत्या . त्यावेळेस त्या जवळजवळ २५ नी कमी होतायेत असं दिसतंय . काँग्रेसची अवस्था बिहारमध्ये दिवसेंदिवस अधिकच केविलवाणी होतेयं . अलीकडच्या २५ -३० वर्षांत बिहारमध्ये काँग्रेसचा फार मोठ्या प्रमाणावर संकोच होत गेला आणि जनता पक्ष/दलाचे विविध गट वेगवेगळ्या नावानं सातत्याने आघाडीवर राहिले . या निवडणुकीत काँग्रेसचा प्रभाव ज्या पद्धतीनं ओसरला त्याचा फटका राष्ट्रीय जनता दलाला बसलेला आहे यात शंकाच नाही . जेमतेम २० जागा काँग्रेसला या निवडणुकीत मिळतील असं सध्याचं चित्र आहे . राजदनं काँग्रेससोबत आघाडी केली तेव्हा हे दोन्ही पक्ष मिळून साधारण ११० ते ११५ पर्यंत जातील असं चित्र मतदानात्तर कौलातून समोर आलेलं होतं . परंतु , प्रत्यक्षात मात्र तसं घडतांना दिसलेलं नाहीये . त्यामुळे काँग्रेससोबत केलेल्या आघाडीचा येत्या काही दिवसांत राष्ट्रीय जनता दलानं फेरविचार केला तर फारसं आश्चर्य वाटायला नको . शिवाय काँग्रेस पक्षानं सगळ्यात मोठी केलेली चूक म्हणजे राहुल गांधी वगळता एकही महत्त्वाचा नेता बिहारमध्ये प्रचाराला उतरवला नाही . पक्षाकडून जिंकण्यासाठी आवश्यक जी काही ‘रसद’ हवी असते , तीसुद्धा पुरेशा प्रमाणात पुरविली नाही , अशी माहिती आता हाती येते आहे . थोडक्यात काँग्रेसनं कचखाऊ भूमिका निभावली असं म्हणण्यास वाव आहे .

या निवडणुकीचं आणखी एक वैशिष्ट्य असं की , रामविलास पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाची फार मोठी हवा माध्यमांनी निर्माण केलेली होती आणि त्याचवेळी माध्यमांनी ही भाजपाची ‘बी टीम’ आहे असं म्हटलेलं होतं . केंद्रामध्ये लोक जनशक्ती पक्ष  एक घटक पक्ष आहे . या पक्षाचे सर्वेसर्वा रामविलास पासवान अगदी परवा परवापर्यंत केंद्रात मंत्रीही होते . त्यांचे पुत्र खासदार चिराग पासवान यांनी बिहारच्या निवडणुकीत नितीशकुमार यांच्याविरुद्ध भूमिका घेतली तरी त्यात विचित्र राजकीय पवित्रा होता . ‘आमचा नरेंद्र मोदी यांना पाठिंबा आहे मात्र , नितीशकुमार यांना विरोध आहे , अशा पद्धतीचा तो त्यांचा पवित्रा होता . त्यातून लोक जनशक्ती पक्षाच्या काठीने भाजप , नितीशकुमारांना मारु इच्छित आहे हे स्पष्ट होत होतं . राजकारण म्हणून हे ठीक आहे परंतु , युतीधर्म पाळण्याच्या दृष्टीकोनातून अशा पद्धतीने दुसऱ्याच्या काठीने कुणाला तरी मारण्याची  भाजपाची ही राजकीय नीती यापुढे देशाच्या राजकारणात अनेक ट्रेंड प्रस्थापित करेल असं दिसतंय . महाराष्ट्रात सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली  सरकार अस्तित्वात असताना स्वत: देवेंद्र फडणवीस आणि भाजपनं युतीतील शिवसेनेची सातत्याने कोंडी आणि संकोच करण्याचा प्रयत्न केलेला होता . हेच देवेंद्र फडणवीस बिहारच्या निवडणुकीचे भाजपचे मुख्य मोहरे म्हणून काम करत होते आणि बिहारमध्येही भाजपने अशाच पद्धतीने नितीशकुमार यांची कोंडी केलेली आहे , हा कांही निव्वळ राजकीय योगायोग म्हणता येणार नाहीये . अतिशय प्राथमिक माहिती जी काय मिळते आहे , त्यानुसार जनता दल युनायटेडला साधारण २७ जागी ५०० ते ७०० मतांनी पराभव स्वीकारलेला आहे . मताधिक्यांची ही आकडेवारी लक्षात घेतली तर जनता दल युनायटेडच्या या सर्व जागी झालेला पराभव हा निसटताच म्हणायला हवा . हा पराभव  घडवून आणण्यामध्ये चिराग पासवान यांनी मोलाची भूमिका बजावली असावी असा एक अंदाज आहे . अर्थात हा अंदाज ठाम नाही पण , चिराग पासवान यांनी नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील जनता दल युनायतेडचे  पंख कापण्यात मोलाची भूमिका बजावली आहे यात शंकाच नाही . चिराग पासवान यांची भूमिका अर्थातच बिहारमध्ये भाज्प्च्य पथ्यावर पडली आहे . .

आणखी एक मुद्दा असा की , निवडणुकांचे जे प्रारंभी येणारे जे कौल असतात ते अंतिम नसतात त्यामुळे मतप्रदर्शन करण्याची घाई करु नये नाही तर , तोंडघशी पडण्याची वेळ येते असा इशारा पुन्हा एकदा सर्व तथाकथित माध्यम तज्ज्ञांना आजच्या दिवसानं दिलेला आहे . सकाळी साधारण ११ वाजेपर्यंतच चित्र लक्षात घेतलं तर राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव हे मुख्यमंत्री झाल्यातच जमा आहे अशा पद्धतीची वक्तव्यं बहुतेक सगळ्या पक्षांकडून आणि प्रकाश वृत्तवाहिन्यांवर बोलणाऱ्या राजकीय विश्लेषकांकडून केली गेली . मात्र, हे सर्व जण तोंडघशी आपटलेले आहेत . मॅन ऑफ द मॅच होण्यासाठी फलंदाजी , क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी अशा तीनही क्षेत्रात जी चौफेर कामगिरी करावी लागते आणि त्याचा फायदा आपल्या चमूला करुन द्यावा लागतो , असं तेजस्वी यादवकडून घडलेलं नाही हे स्पष्ट केलं पाहिजे .

मात्र तेजस्वी यादव यांच्या बाबतीत काहीच चांगलं घडलं असं नाही , हेही त्याचवेळेस लक्षात घेतलं पाहिजे . तेजस्वी यादव यांची निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये खूप हेटाळणी झाली . त्यांच्या शिक्षणाचा खूप मोठ्या प्रमाणात उल्लेख करण्यात आला .      वडिलांनी म्हणजे लालूप्रसाद यादव यांनी  जो पक्ष स्थापन केला आणि त्या पक्षाला बिहारभर पसरवलं ते वडिलांचं ऋणही तेजस्वी यादव विसरले , याबद्दलही खूप तारे तोडले गेले.  मात्र , लालूप्रसाद यांच नाव बाजूला ठेवणं ही तेजस्वी यादव  यांची अपरिहार्य अगतिकता होती कारण लालू यांची प्रतिमा गैरव्यवहारांच्या आरोपामुळे डागाळलेली आहे , ते तुरुंगात आहेत . त्यांच छायाचित्र समोर करुन मत मागणं तेजस्वी यादव यांना खूप अडचणींचं  ठरलं असतं . अशी परिस्थिती असूनही स्वत:च्या बळावर त्यांनी राष्ट्रीय जनता दलाला राज्यातला दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून स्थान मिळवून देण्यात मोलाची कामगिरी बाजावली आहे यात शंकाच नाही आणि भाजपला बिहारमधे तेच टक्कर देऊशकतातहे समोर आलेलं आहे . त्याच वेळेस नितीशकुमार यांची बिहारमधली सद्दी संपत आलेली असल्याचंही त्यांनी सिद्ध केलेलं आहे .

शेवटी – भक्तांनी या विजयाचा फार उन्माद करु नये कारण हा विजय निसटता आहे आणि भाजपला जरी चांगलं यश मिळालं असलं तरी नितीशकुमार हे राजकारणातल्या संधीसाधू वृत्तीचं एक अत्यंत ‘अप्रतिम’ असं उदाहरण आहेत . ते कुठल्याही क्षणी भाजपला टांग मारु शकतात हे भाजपने लक्षात घेतलं पाहिजे . तसंही अलीकडच्या काळात महत्त्वाचे मित्रपक्ष भाजपापासून दुरावले आहेत . बिहार निवडणुकीच्या निकालाचे आकडे बघितल्यावर भाजपापासून दूर राहण्याचा निर्णय नितीशकुमार यांनी लगेच आज नाही पण , भविष्यामध्ये घेतला आणि सत्तेसाठी  बिहारमध्ये एक नवीन आघाडी अस्तित्वात आली तर फारसं आश्चर्य वाटायला नको .

-प्रवीण बर्दापूरकर

Cellphone  +919822055799

www.praveenbardapurkar.com /  praveen.bardapurkar@gmail.com

संबंधित पोस्ट