शिकणारे विद्यार्थी आणि शिकवणारे शिक्षक कुठे गेले ?

( मराठवाडा मुक्ती दिनाच्या कार्यक्रमात डॉ . बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्रस्तुत लेखकाने ‘मराठवाडा इथं कमी पडतो’ या विषयावर दिलेल्या व्याख्यानाचा संपादित अंश- )

ज्या विद्यापीठात आपण शिकलो , वावरलो त्याच विद्यापीठात प्रमुख पाहुणा म्हणून येणं हा मला फार मोठा सन्मान वाटतो . इथं येतांना मला आनंद झालेला आहे आणि मी कांहीसा गांगरलोही आहे . हमरस्त्यालगतच्या कमानीतून या सभागृहापर्यंत येतांना विद्यापीठाचा झालेला विस्तार डोळ्यात भरत होता . तो बघतांना मी मात्र आमच्या काळातील जुना चिंचोळा रस्ता , दुतार्फा असलेली गुलमोहोराची झाडं , गेस्ट

हाऊसजवळचा पूल अशा ओळखीच्या जुन्या खुणा शोधत होतो . त्यावेळी इयत्ता चौथीत असतांना वाचलेल्या कवी वा. भा. पाठक यांच्या कवितेच्या-

खुणा गावच्या दिसू लागल्या स्पष्ट मला लोचनी

उडे किती खळबळ माझ्या हृदयातुनी

या ओळी आठवल्या .

या परिसरात मी खूप बागडलो . नेहेरु युवक केंद्रात काम करत असतांना तेथे येणारे पाहुणे विद्यापीठाच्या गेस्ट हाऊसमधे मुक्कामाला असत . त्यामुळे या परिसरात नेहेमी यावं लागे . तेव्हा हा परिसर निवांत होता . या परिसरातली अनेक झाडं माझी मित्र झालेली होती . त्या झाडांखाली बसून मी अनेकदा वाचन करत बसत असे . गेस्ट हाऊसच्या त्या पुलावर बसूनच श्रावणातल्या एका पावसाळी दुपारी ‘संध्याकाळच्या कविता’ या कविता संग्रहातून माझी कवीश्रेष्ठ ग्रेस यांच्याशी ओळख झाली . त्या संग्रहातील-

पाऊस कधीचा पडतो झाडांची हलती पाने

हलकेच जाग मज आली दु:खाच्या मंद सुराने

या ओळी माझ्या आवडत्या . गंमत बघा , पुढे माझी ग्रेस यांच्याशी दाट ओळख झाली . असाच एकदा गप्पा मारतांना माझी-माझी पहिली भेट कुठे झाली हे त्यांना सांगितलं तेव्हा ते मंदसे हंसले . आज जी सहा पुस्तकं मी कृतज्ञता म्हणून विद्यापीठाला भेट म्हणून कुलगुरु डॉ. प्रमोद  येवले यांच्या स्वाधीन केली आहेत , त्यात ग्रेस यांच्यावरचं संपादित केलेलं माझं ‘ग्रेस नावाचं गारुड’ हेही पुस्तक आहे . या विद्यापीठानं मला शिक्षण दिलं , आत्मविश्वास दिला , एक माणूस म्हणून कसं जगावं याची प्रेरणा दिली म्हणूनच , इथं येण्याचं आमंत्रण जेव्हा आवडता कवी दासू वैद्य आणि डॉ. मुस्तजीब खान यांनी दिलं तेव्हा मी भारावून गेलो आणि नम्र भावनेनं ते आमंत्रण स्वीकारलं .

मुख्य विषयाकडे वळण्याआधी एक तुम्हाला आवर्जून आणि बजावून सांगतो . प्रशासकीय शिस्त , कामाचा वकूब असलेला आणि महत्वाचं म्हणजे स्वच्छ प्रतिमेचा व चारित्र्याचा कुलगुरु या विद्यापीठाला खूप वर्षानी डॉ. प्रमोद येवले यांच्या रुपात मिळाला आहे . एक पत्रकार म्हणून मी शिक्षण किंवा विद्यापीठ हे बीट कांही फार वर्ष केलेलं नाही तरी , डॉ. येवले यांनी एक प्राचार्य आणि प्र-कुलगुरु म्हणून बजावलेली कामगिरी मला चांगली ठाऊक आहे ; त्यांनी वर्ध्याचं फार्मसी महाविद्यालय राज्यात नंबर एकचं करतांना घेतलेले श्रम , त्या महाविद्यालयाला लावलेली शिस्त मी बघितली आहे . त्या महाविद्यालयात मी प्रमुख पाहुणा म्हणूनही २/३ वेळा गेलेलो आहे , म्हणून मला हे सर्व ठाऊक आहे . कुलगुरुपदावर ते कुणाच्या मेहेरबानीनं किंवा वाशिल्यानं नव्हे तर मेरीटवर कसे आलेले आहेत याची खातरजमा मी केलेली आहे . म्हणून डॉ . बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सर्व प्राध्यापक , प्राध्यापकेतर कर्मचारी , व्यवस्थापन समिती तसंच विद्वत सभेचे सर्व सदस्य आणि चळवळ्या विद्यार्थ्यांना माझं कळकळीचं आवाहन आहे की , डॉ. प्रमोद येवले यांना कुलगुरु म्हणून काम करतांना अडथळे निर्माण करु नका ; त्यांना सहकार्य करा आणि या विद्यापीठाला पूर्ववैभव प्राप्त करुन देण्यास मदत करा .

पुस्तके कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांच्या स्वाधीन करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाविषयी कृतज्ञता व्यक्त करताना . 

‘मराठवाडा कुठं कमी पडतो’ या विषयावर मी माझ्या स्वभावाला साजेसं स्पष्ट बोलणार आहे . या मराठवाड्यात मी शालेय ते पदवी पर्यंतचं शिक्षण घेतलं , ग्रंथालय शास्त्रात प्रमाणपत्र आणि पुढचं शिक्षण घेतलं . या शिक्षणानं मला भाषा दिली , त्यातून येणारा  आत्मविश्वास दिला , उडण्यासाठी पंख दिले . मग मी पत्रकारितेत गेलो आणि गेली चाळीस तिथेच वर्ष रमलो . ‘लोकसत्ता’ आणि ‘लोकमत’सारख्या वृत्तपत्राच्या संपादकपदापर्यंत पोहोचलो , मराठीसोबतच हिन्दी आणि इंग्रजीत लेखन केलं . अनेक पुस्तकं प्रकाशित झाली . आंतरराष्ट्रीय अभ्यासवृत्ती मिळाली . वृत्तसंकलन आणि व्याख्यानांच्या निमित्तानं ४०-४२ देश फिरुन झाले . अनेक पुरस्कार आणि मोठे सन्मान मिळाले . हे सगळं या मराठवाड्याच्या भूमीत मिळालेल्या शिक्षणामुळेच शक्य झालं , अशी माझी नम्र धारणा आहे .

एकेकाळी जालना रेल्वे स्टेशनवर ओरडून वृत्तपत्र आणि साप्ताहिकं विकणार्‍या , रोजगार हमी योजनेवर काम केलेल्या माझ्यासारख्या , ग्रामीण भागातून आलेल्या  मुलाला पत्रकारिता आणि लेखनाच्या आघाड्यांवर बर्‍यापैकी मजल मारता आली कारण मराठवाड्यात घेतलेल्या शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणानं , माझ्यातला  विद्यार्थी घडवतानाच मला आत्मविश्वास दिला , माझ्यातला माणूस घडवला ; नुसता माणूस नाही तर मूल्यनिष्ठ माणूस घडवला . या पार्श्वमीवर वैद्यक , अभियांत्रिकी , व्यवस्थापन असे कांही मोजके अभ्यासक्रम वगळता , आधी विद्यार्थी आणि मग माणूस म्हणून घडवणं , त्याला आत्मविश्वास देणं , उडण्यासाठी पंख देणं याबाबत आज मराठवाड्यातील शिक्षणाची अवस्था कशी आहे ? याचं उत्तर किंचित आशादायक आणि खूपसं निराशादायक चित्र आहे , हेच मिळतं .

माझं म्हणणं स्पष्ट करण्यासाठी दोन अनुभव सांगतो . पहिला आहे सत्तरीच्या दशकात या विद्यापीठाचे कुलगुरु असलेल्या डॉ. आर. पी. नाथ यांचा . डॉ. नाथ एकदा एका केश कर्तनालयाच्या उद्घाटनासाठी गेले . कुलगुरु , म्हणजे शिक्षकांचे गुरु , त्या कार्यक्रमाला गेले म्हणून तेव्हा मराठवाडा , अजिंठा , लोकविजय या वृत्तपत्रातून खूप टीका झाली . त्यावर ‘एक शिक्षक म्हणून मला केवळ शिकवायचं नाही तर विद्यार्थी घडवायचा आहे ,  तर त्याला त्याच्या पायावर उभं करायचं आहे , त्याच्यातला माणूस घडवायचा आहे . शिक्षक म्हणून ते माझं कामच आहे’, असं उत्तर आर. पी. नाथ यांनी दिलं होतं . असे शिक्षक आता मराठवाड्याच्या शिक्षण क्षेत्रात आहेत का ? बहुसंख्य शिक्षक माणूस घडवणं तर सोडाच पण , विद्यार्थी तरी किमान नीट घडवत आहेत का ? न शिकवणारे बहुसंख्य शिक्षक , न शिकणारे बहुसंख्य विद्यार्थी आणि कोचिंग क्लासेसमधे गर्दी , असं आजचं चित्र आपल्या देशात सर्वत्रच आहे पण , मराठवाड्यात ते जास्त भीषण आणि अगदी गाव स्तरापर्यंत व बजबजपुरीचं आहे .

दुसरी आठवण पण , अशीच जुनीच आहे . १९७० ते ८०च्या दशकात तेव्हाच्या नागपूर विद्यापीठाच्या शिक्षणाच्या दर्जाची अवस्था अतिशय वाईट होती . नोकर्‍यांच्या जाहिरातीत ‘नागपूर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी अर्ज करु नयेत’ असे उल्लेख असत , इतकी तेव्हाच्या नागपूर विद्यापीठाची प्रतिमा रसातळाला गेलेली होती  . पुढे डॉ. वि. भि. कोलते कुलगुरु झाल्यावर ती प्रतिमा बदलली . आपल्या मराठवाड्याच्या शिक्षण क्षेत्राची अवस्था तेव्हाच्या नागपूर विद्यापीठासारखी आज झालेली आहे , हे नमूद करतांना मला अतिशय खेद वाटतो . शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च संस्था म्हणून ही प्रतिमा बदलण्यासाठी पुढाकार घेण्याची जबाबदारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची आहे , असं माझं मत आहे .

मी नागपूर , मुंबई , दिल्लीत पत्रकारिता केली . अनेक देशात फिरलो . या भटकंतीत काम संपलं की तिथलं विद्यापीठ आणि ग्रंथालयांना भेटी देणं हा माझा आवडता उद्योग असायचा . अगदी दुबईला प्रथम गेलो तेव्हाही काम संपल्यावर मी ‘गोल्ड सूक’ म्हणजे सोन्याच्या बाजारात न जाता विद्यापीठात गेलो ! अलिकडची दोन वर्ष वगळता अनेक ठिकाणी मी शिकवायला जातो . या अनुभवांती सांगतो , सगळ्याच विद्यापीठात थोडं बहुत कुरघोडीचं राजकारण असतं , स्पर्धा आणि हेवेदावे असतात . आपल्या डॉ . बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मात्र अति राजकारण आहे . त्यातही जास्त वाईट बाब म्हणजे या राजकारणाला जाती , उपजाती , पोटजाती तसंच धर्माचे पदर आहेत आणि पक्षीय हेव्यादाव्याचे दाट रंगही त्याला आहेत  . हेच चित्र एकूण मराठवाड्याच्या शिक्षण क्षेत्राचं आहे . शिक्षण मागे पडलंय , विद्यार्थ्यांना माणूस म्हणून घडवणं बाजूला पडलं आहे , हे मला अनेक वर्ष बाहेर राहून आल्यावर तर जास्त जाणवलं . त्यामुळे मी विषण्ण झालो आणि आपला मराठवाडा यातून बाहेर पडणार कसा असा प्रश्न त्यामुळेच मला छळतो आहे .

मुळात सुलभीकरण आणि सार्वत्रिकीकरण करण्याच्या नादात आपल्या शिक्षणातून ज्ञान हद्दपार झालं आणि शिक्षण माहिती आधारित झालं . त्यामुळे कोणत्याच विषयाचं मूलभूत ज्ञान शिक्षणातून मिळत नाही हे खरं असलं तरी आपली मराठवाड्यातली बहुसंख्य मुलं शुद्ध भाषेच्या बाबतीतही फारच कमी पडतात , असा माझा अनुभव आहे . त्यांच्यावर शाळा आणि महाविद्यालयात भाषा संस्कार झालेला आहे की नाही असा प्रश्न पडावा अशी ही स्थिति आहे . एक लक्षात घ्या , भाषा म्हणजे केवळ कांही अक्षरांचे पुंजके नव्हे . प्रत्येक शब्दाला जन्म असतो , अर्थ , भाव आणि गंध असतो . संवादाचं माध्यम भाषा असते . भाषा म्हणजे संस्कृती , आपलं संचित . माणसाची ओळखच मुळी त्याच्या बोलण्यातून म्हणजे त्याच्या भाषेतून निर्माण होते . म्हणजे एका अर्थानं भाषा माणूसही असते . कवी आरती प्रभू म्हणतात-

जीभ झडली तरी जे गात असतात

शब्द शब्द शाबूत ठेऊन

त्यांना मरण म्हणजे

एक अफवा वाटत असते   

ही त्यांची एक शेवटची कविता समजली जाते . त्यातून आरती प्रभू यांचं भाषेवरचं अव्यभिचारी प्रेम दिसतं . असं प्रेम आपण भाषेवर केलं पाहिजे असा संस्कार करणारे शिक्षक माझ्या पिढीला याच मराठवाड्यात शिक्षण घेताना शाळा आणि महाविद्यालयात लाभले . आज मात्र कुठे गेले तसे शिक्षक ? असा प्रश्न मला पडलेला आहे .

मराठीचे कट्टर पुरस्कर्ते डॉ . वि. भि. कोलते यांच्या नेतृत्वाखाली मराठीसाठी झालेल्या आंदोलनात हिरीरीनं सहभागी झालेलो असलो तरी मला कोणताही भाषेचा वाद निर्माण करायचा नाही . भाषेबाबत माझ्या मनात ‘राज’ किंवा ‘अबू’ मुळीच नाही . भाषेची समज कमी असेल , दुबळी असेल तर माणूस प्रभावशून्य होतो , मुका होतो म्हणून स्पष्टपणे सांगतो , मराठवाड्यातील बहुसंख्य विद्यार्थी तर मातृभाषा मराठीतही मार खातात असा माझा अनुभव आहे .

भाषेचा संस्कार आधी घरात होतो आणि त्याला पैलू शालेय शिक्षणात पडतात ; म्हणजे पाडले जावेत अशी अपेक्षा असते ; आमच्या काळात तरी असं घडत असे . पण , भाषाविषयक मूलभूत ज्ञान घेण्यात विद्यार्थी आणि देण्यात , भाषा संस्कार करण्यात मराठवाड्यातील बहुसंख्य शिक्षकही कमी पडलेले आहेत , असं आजचं चित्र आहे . त्यामुळे भाषा विषयक जागरुकता आणि ज्ञान या दोन्ही बाबतीत मराठवाड्यातील बहुसंख्य विद्यार्थी कच्च मडकं झालेले आहेत .

हे माझ्या लक्षात आलं ते माझे प्राचीन मित्र आणि कम्युनिस्ट पक्षाचे आता एक राष्ट्रीय  नेते असलेले डॉ. भालचंद्र कांगो यांच्यामुळे . मराठवाड्यातील पत्रकारांना कांही तरी संधी मिळावी म्हणून डॉ. कांगो यांनी ३/४ वेळा पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या कांही मुलांना वेगवेगळ्या वेळी मुंबई आणि नागपुरात माझ्याकडे पाठवलं . त्यांच्याशी बोलतांना सर्वप्रथम ही बाब माझ्या लक्षात आली . त्यापैकी साहित्याच्या क्षेत्रात कांही तरी करु इच्छिणार्‍या दोघांना ( त्यातला एक तर कवी होता ! ) कवी आरती प्रभू आणि लेखक    चिं . त्र्यं . खानोलकर यांच्यात काय नातं आहे , हे माहिती नव्हतं . प्रक्षेपण हा शब्द त्यांनी ‘प्रकशेपन’ असा लिहिला . फार तपशीलात जात नाही पण , नंतर मराठवाड्यातून आलेल्या मुलांच्या भाषेची तपासणी करण्याची संवयच मला लागली . औरंगाबादला स्थायिक झाल्यावर तर हा छंदच जडला . नंतर मी मराठवाड्यात ठिकठिकाणी फिरतांना चांचपणी केली तर परिस्थिति अतिशय भयावह असल्याचं लक्षात आलं .  मराठवाड्यातील माध्यमात आणि शिक्षण संस्थांच्या जाहिरातीतही ‘बीड बायपास रोड’ किंवा ‘मृतक मोटर सायकलवरुन जात असतांना’ असे उल्लेख दिसतात ; अशी असंख्य उदाहरणे सांगता येतील . त्यामागे भाषाविषयक अज्ञानच आहे . त्याचं कारण हे अज्ञान शिक्षण घेताना/देतांना दूर झालं नाही हेच आहे . ‘बायपास’ आणि ‘रोड’  हे समानार्थी शब्द आहेत , मृतक म्हणजे मेलेला माणूस वाहन कसे चालवेल ? असे प्रश्न मराठवाड्यातील शिक्षक , संपादक आणि वाचकांनाही पडत नसले तरी उमेदवार नाकारण्यासाठी या चुका पुरेशा असतात .

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे स्मृतीचिन्ह

दिल्ली सोडल्यावर आम्ही औरंगाबादला स्थायिक झाल्यावर पत्रकारितेची मास्टर्स पदवी घेणार्‍या इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांसमोर बोलण्यासाठी मला आमंत्रित करण्यात आलं . त्यांचं माध्यम इंग्रजी असल्यानं मी स्वाभाविकपणे इंग्रजीत बोलायला सुरुवात केली तर आठ-दहा मिनिटाच मुलांची चुळबुळ सुरु झाली . मी कारण विचारलं तर एक विद्यार्थी म्हणाला , ‘मराठीत ब्वोला की . मराठीतच सोपं पडतं आम्माला’ . हे मी जशाला तसं ‘कोट’ करतोय कारण ते रेकॉर्ड केलेलं व्याख्यान मी नंतर अनेकदा इतरांना ऐकवलं होतं . वास्तववादी लेखन म्हणून साहित्यात ही भाषा ठीक असू शकेल पण , माध्यमात किंवा अन्य कोणत्याही नोकरीत कशी चालेल ?

मराठीची बोंब , ज्ञानभाषा इंग्रजीचीही बोंबाबोंब अशी परिस्थिति असल्यावर मराठवाड्यातला बहुसंख्य विद्यार्थी मराठवाड्याबाहेरच्या आणि स्पर्धेच्या जगात आत्मविश्वासानं उभा कसा राहू शकेल याचा विचार शिक्षण क्षेत्राला करावाच लागेल .  यासाठी शिक्षणाची सर्वोच्च संस्था म्हणून या विद्यापीठाची जबाबदारी मोठी आहे .

बहुसंख्य विद्यार्थ्यांचं भाषाज्ञान वाढवण्यात , माणूस म्हणून स्वबळावर त्यांना उभं करण्यात मराठवाड्याचं शिक्षण क्षेत्र कमी पडलं , अशा वेळी साहित्यिक जगताची जबाबदारी मोठी होती पण , ती पेलण्यात बहुसंख्य साहित्यिकही कमीच पडले . बोलण्यासोबतच शिक्षणात प्रमाण ऐवजी बोली भाषा हा दुबळा युक्तीवाद त्यांनी केला आणि मराठवाड्यातील भाषक अज्ञान दूर करण्याच्या यज्ञात आहुती टाकली नाही .

हेही कमी की काय म्हणून मराठवाड्यातील बहुसंख्य लेखकू प्रेमाचं मुळूमुळू लेखन किंवा विद्रोहाचे फुसके हुंकार टाकण्यात आणि त्यातून मिळणार्‍या टाळ्यांच्या सांपळ्यात अलगद अडकले  . बदलत्या जगाचा वास्तववादी वेध घेण्यातही मराठवाड्याचे बहुसंख्य साहित्यिक कमी पडले आहेत . जागतिकीकरण  आणि खुल्या अर्थ व्यवस्थेमुळे ,  विकास कामांच्या रेट्यामुळे समाजातले अनेक घटक उध्वस्त झाले पण , ते उध्वस्तपण , उजाडपण , त्यांचे उसासे , अश्रू साहित्यात व्यक्त झालेच नाहीत .

हे व्यासपीठ राजकीय बोलण्याचं नाही याचं भान मला निश्चितच आहे तरी ओझरता उल्लेख करायलाच हवा कारण राजकारणानं आपलं जीवन व्यापून टाकलेलं आहे शिवाय या विद्यापीठात खूपच राजकारण चालतं , हे कांही आता लपून राहिलेलं नाहीये . त्यामुळे मीही एखादी तरी कमेंट करायला हरकत नसावी . अर्थ संकल्पात तरतूद झालेलाही निधी पळवला जात असल्यानं महाराष्ट्राच्या विविध भागात विकासाचे आणि विकासाच्या अनुशेषाचे प्रश्न निर्माण झाले . याचं एक  कारण प्रादेशिक स्तरावरील विविध पक्षांच्या राजकीय नेत्यांची एकजूट नसणं हेच आहे . विकास आणि विकासाच्या अनुशेषाच्या बाबत भरपूर बोललं जात असतांना एक लक्षात घ्या , आपल्या देशातील राजकारणाचा बाज अलीकडच्या कांही वर्षात झपाट्याने बदलला आहे . एकदा निवडणुका संपल्या की विकासाच्या कामांसाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवण्याचा ट्रेंड आता प्रस्थापित झालाय . आधी हे पश्चिम महाराष्ट्रात दिसलं आणि आता विदर्भात दिसतं आहे . अलीकडच्या काळातील मराठवाड्यातील नेते विकासाचं राजकारण करण्यात कायमच कमी पडतात हे मला राज्याच्या राजधानी आणि उपराजधानीत तसंचं देशाच्या राजधानीत पत्रकारिता करतांना जाणवलेलं आहे . मराठवाड्यातील नेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री , राज्याचे मंत्री होतात पण , ते मराठवाड्याचे प्रश्न सोडवू शकत नाहीत हे वास्तव आहे आणि तेच माझं शल्यही आहे .

अशा अनेक आघाड्यांवर मराठवाडा कमी पडतो आहे . या सर्व कमी पडण्यातून बाहेर पडून मराठवाडा सुजलाम सुफलाम होवो अशी आशा तसंच सदिच्छा मराठवाडा मुक्ती दिनी व्यक्त करतो आणि थांबतो .

( छायाचित्र सौजन्य – पंकज बेडसे )

-प्रवीण बर्दापूरकर    

संपर्क- 9822055799

praveen.bardapurkar@gmail.com

www.praveenbardapurkar.com

संबंधित पोस्ट