जय हो, अम्मा !

जयललिता जर क्रिकेट खेळत असत्या आणि त्या फलंदाजीला आल्या तर, मैदानावरचे क्षेत्ररक्षक, गोलंदाज आणि पंच त्यांना साष्टांग दंडवत घालत आहेत, असं एक व्यंगचित्र नुकतच पाहण्यात आलं. जयललिता नावाचं व्यक्तीस्तोम त्यातून ध्वनित होतं तसंच, तामिळनाडूच्या राजकारणातली लाचारी, बिनकणाही त्यातून समोर येतो. विधानसभा निवडणुकीत एखाद्या राजकीय पक्षानं सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला जाण्याची गेल्या सहा विधानसभा निवडणुकातील ही पहिलीच वेळ आहे. आलटून पालटून एकेक टर्म जयललितांच्या अण्णाद्रमुक आणि करुणानिधींच्या द्रमुकलां सत्ता देण्याचा प्रघात मतदारांनी तामिळनाडूत पाडला आणि पाळला. तो प्रघात म्हणजे जणू घटनात्मक तरतूदच आहे असं समजून, विविध जनमत पाहणीचे निष्कर्ष आणि मिडियात व्यक्त झालेल्या अंदाजानुसार जयललिता आणि त्यांचा पक्ष या निवडणुकीत बहुमत मिळवू शकणार नव्हता. ते निष्कर्ष आणि अंदाज जयललिता यांनी पार खोटे ठरवले, निकालानंतर झालेल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत ‘तुमच्या नाकावर टिच्चून माझा विजय झालाय हे लक्षात घ्या’, असं म्हणूनच त्यांनी टेचात पत्रकारांना सुनावलं. त्याचवेळी तिकडे कोलकात्यात ममतांनी पत्रकारांना सुनावलं की, ‘तुमचे अंदाज खोटे ठरुन तृणमूल कॉंग्रेसनं घवघवीत यश संपादन केलंय, त्याबद्दल तुमच अभिनंदन!’, दोन्ही ठिकाणच्या ‘बिच्चाऱ्या’ पत्रकारांनी ते निमूटपणे ऐकून घेतलं!
व्यक्तीपूजा, कर्मकांड आणि ब्राह्मणी वर्चस्वाच्या विरोधात रामस्वामी नायकर यांनी सुमारे सहा दशकापूर्वी सुरु केलेल्या द्रविडी कझागम चळवळीचे संपूर्ण विरोधाभासी आणि विदारक चित्र म्हणजे जयललिता यांचं नेतृत्व आहे. रामस्वामी यांनी ही चळवळ सुरु केली तेव्हा त्यांना जो पाठिंबा देणारे जे लोक लाभले त्यात अण्णा दुराई हे एक होते. त्यांनीच पुढे या चळवळीची राजकीय शाखा म्हणून द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाची १९४९ साली स्थापना केली. अण्णादुराई यांना जे राजकीय शिष्य लाभले त्यात चित्रपट अभिनेते-लेखक-निर्माते एम करुणानिधी आणि एम जी रामचंद्रन हे प्रमुख. त्यात करुणानिधी सिनियर तर ‘एमजीआर’ नावाने एमजी रामचंद्रन या अत्यंत लोकप्रिय अभिनेत्याचा या पक्षातला प्रवेश १९५३ सालचा. या दोघांत नेतृत्वासाठी इर्षा होती, वाद होते. अण्णा दुराई यांच्या पश्चात १९७२ साली हे दोन्ही नट-नेते आणि त्यांचे गट, राजकीय पक्ष म्हणून वेगळे झाले. करुणानिधी हे द्रमुकचे नेते झाले. तर रामचंद्रन यांना मानणारा कार्यकर्त्यांचा गट म्हणजे अभाद्रमुक. तेव्हापासून या राज्याचं राजकारण या दोनच राजकीय पक्षांभोवती फिरतं आहे. १९८९साली एमजी रामचंद्रन याचं निधन झाल्यावर त्यांच्या पत्नी जानकी यांनी काही काळ अभाद्रमुकचं नेतृत्व केले पण, ‘पुरची थलैवी’-म्हणजे ‘क्रांतीकारक’ जयललिता यांची मोहिनी आणि प्रभाव मोठा होता. सहाजिकच जयललिता अभाद्रमुकच्या सर्वेसर्वा झाल्या
तामिळनाडूचं राजकारण या दोन पक्षांपेक्षा करुणानिधी आणि जयललिता या दोन व्यक्ती, त्यांच्यातील इर्षा-स्पर्धा-सुडाची भावना याभोवती जास्त केंद्रित आहे. द्रमुक सत्तेतून जाणार आणि अभाद्रमुक येणार, पुढच्या निवडणुकीत अभाद्रमुक जाणार आणि द्रमुक सत्तेत येणार असंच आजवर सुरु राहिलं. झोपडपट्टीतील बायका पाण्यासाठी सार्वजनिक नळावर जशा कचाकचा भांडतात अक्षरश: तस्सच हे दोघेही नेते आणि त्यांचे पक्ष वचावचा भांडतात तसंच वागतातही. या दोघांची मनधरणी करत पूर्वी कॉंग्रेस पक्ष आणि आता भाजप स्वत:चं अस्तित्व टिकवण्याची केविलवाणी धडपड करत आहे. द्रमुक आणि अभाद्रमुकनं कॉंग्रेस आणि भाजप या दोन्ही राष्ट्रीय पक्षांचा तामिळनाडूत प्रादेशिकपक्षापेक्षा जास्त संकोच केला आहे.
मागे एकदा उल्लेख केला होता त्याची पुनरावृत्ती- जयललिता या तमीळ, तेलगु प्रादेशिक चित्रपटातील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री होत्या. जयललिता यांचा जन्म २४ फेब्रुवारी १९४८चा. पूर्वाश्रमीच्या म्हैसूर राज्यातील मेळूकोटे हे त्यांचं जन्मगाव. वडील जयरामन हे म्हैसूरच्या राजाच्या सेवेत होते. जयललिता हे नामकरण केलं ते जयरामन यांच्या वडिलांनी, म्हणजे जयललिता यांच्या आजोबांनी तर, आई त्यांना ‘कोमकली’ म्हणत असे. जयललिता जेमतेम दोन वर्षांच्या असताना त्यांचे वडील जयरामन वारले आणि आईसोबत जयललिता बंगलोरला स्थायिक झाल्या. त्यांच्या आईला चित्रपटात कामे मिळू लागली. त्या ‘संध्या’ या नावाने आताचे चेन्नई (तत्कालिन मद्रास) तसंच बंगलोरच्या चित्रपटसृष्टीत प्रख्यात होत्या. आईनं चोखाळलेल्या वाटेवर चालायला सुरुवात करत वयाच्या पंधराव्या वर्षी जयललितांनी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला. तिथंच त्यांची एमजी रामचंद्रन यांची भेट झाली. इंग्रजी, तमीळ, कन्नड, मल्याळम, तेलगु आणि हिंदी अशा सहा भाषा जयललिता अत्यंत अस्खलितपणे बोलत. जयललिता सौंदर्यवती होत्याच. महत्वाचं म्हणजे त्यांच्या बुद्धिमत्तेनं ‘एमजीआर’ खूपच प्रभावितच झाले! एम जी रामचंद्रन यांनीच जयललिता यांना १९८२ साली राजकारणात आणलं. दिल्लीत म्हणजे, संसदेत तामिळनाडूचे प्रश्न प्रभावीपणे मांडले जावेत म्हणून इंग्रजीवर प्रभुत्व असणाऱ्या जयललिता यांना तामिळनाडूचे तत्कालिन मुख्यमंत्री असणाऱ्या एमजी रामचंद्रन यांनी राज्यसभेवर पाठवलं.
एम जी रामचंद्रन यांच्या निधनानंतर सुरुवातीला जयललिता यांना पक्षातच जानकी रामचंद्रन यांच्याशी स्पर्धा करावी लागली, जानकी तसंच जयललिता असे दोन गट निर्माण झाले पण, १९८९च्या विधानसभा निवडणुकीत लोकांनी एम जी रामचंद्रन यांचा वारस जयललिता यांचा गट असल्याचा स्पष्ट कौल दिला. अखेर हे दोन्ही गट विलीन झाले आणि विधानसभेत विरोधी पक्षनेत्या म्हणून जयललिता यांचं आगमन झालं. काहीशा अंतर्मुख आणि आत्मकेंद्रित वाटणाऱ्या, कमी पण, ठाम बोलणाऱ्या, ऐश्वर्यशाली जीवनशैलीत रमणाऱ्या जयललिता १९८९ नंतर द्रमुक तसंच करुणानिधी यांच्याशी कडवा संघर्ष करत राज्याच्या राजकारणातच स्थिरावल्या.
राज्याच्या राजकारणात स्वत:ला गुंतवून घेत पुढे जयललितांनी देशातील एक महत्वाची प्रादेशिक राजकीय शक्ती म्हणून स्वत:ला प्रस्थापित केलं. त्यासाठी आधी त्यांनी काँग्रेस आणि नंतर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना बिनधास्तपणे वेठीला धरलं, अनेकदा तर वाकायलाही लावलं! तमिळींच्या प्रश्नांवर श्रीलंकेशी पंगा घेण्याचा संवयीतून त्यांचं नाव जसं आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकू लागलं तसंच ते काही दहशतवादी संघटनांच्याही यादीत ‘टार्गेट’वर गेलं. त्यामुळेच सत्ताधारी असो की विरोधी बाकावर, अम्मा नावाने ज्यांची तामिळनाडूत अक्षरशः पूजा केली जाते, त्या जयललिता कायम अत्याधुनिक सशस्त्र कमांडोजच्या गराड्यात आणि बुलेटप्रुफ जाकीट घालून असतात. जयललिता काय किंवा करुणानिधी काय, या दोन्ही नेत्यांची मुख्यमंत्री म्हणून कारकीर्द कायम वादग्रस्त आहे. सभ्यता आणि सुसंस्कृतपणाच्या सर्व सीमा पार करून जयललिता आणि करुणानिधी यांनी परस्परांच्या भ्रष्टाचाराची कुलंगडी कोणताही विधिनिषेध न बाळगता तामिळनाडूच्या वेशीवर धुतली आहेत. जयललिता यांना बेहिशेबी संपत्तीच्या चौकशीत करुणानिधी यांनीच राजकीय सूड म्हणून अडकवलं अशी ‘अम्मा’ भक्तांची ठाम धारणा आहे. मात्र केवळ या एकाच नव्हे तर तानसी जमीन घोटाळासारख्या अनेक प्रकरणातही जयललिता यांचं नाव जोडलं गेलेलं आहे.
करुणानिधी यांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात, कनिष्ठ न्यायालयानं ६६ कोटी ६५ लाख रुपयांच्या बेहिशेबी संपत्तीच्या आरोपाच्या पुष्ठ्यर्थ सादर करण्यात आलेले पुरावे ग्राह्य धरून जयललिता यांना सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली, परिणामी मुख्यमंत्रीपद-आमदारपद तडकाफडकी गेलं आणि त्यांना कारागृहात मुक्कामी जावं लागलं. बरोब्बर एक वर्षापूर्वी मे महिन्याच्या सुरुवातीला अम्मा-जयललिता तुरुंगात होत्या. जयललिता यांना उच्च न्यायालयाने बेहिशेबी संपत्ती जमा केल्याच्या आरोपातून मुक्त केलं. जे पुरावे कनिष्ठ नायायाल्यात ग्राह्य ठरतात तेच पुरावे उच्च न्यायालयात अग्राह्य कसे ठरतात हे कोडं काही सामान्य माणसला उलगडलं नाही. पण, दस्तुरखुद्द उच्च न्यायालयाननं ‘निर्दोषत्वाचे प्रमाणपत्र’ दिल्यानं ‘अम्मा’ जयललिता यांचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला. २०१५च्या मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात त्या पुन्हा मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत स्थानापन्न झाल्या आणि आता बरोब्बर एका वर्षानं तामिळनाडूच्या मतदारांनी अम्माच्या पारड्यात विक्रमी बहुमताचा कौल टाकला आहे. अर्थात, त्या जरी मुख्यमंत्रीपदी नव्हत्या म्हणजे, कारागृहात होत्या तरी, त्यांच्याच मर्जीने कारभार सुरु होता, एका अर्थाने जयललिता नावाच्या आधुनिक ‘रामा’चे मावळलेले मुख्यमंत्री पेनीर आधुनिक ‘भरत’ होते!
कर्मकांड, व्यक्तिपूजा आणि ब्राह्मण्य याविरुद्ध जी बहुजनांची चळवळ सुरु झाली आणि ज्या चळवळीचा पुढे राजकीय विस्तार झाला तिचे सर्वोच्च्च विद्यमान सत्ताकेंद्र म्हणजे जयललिता आहेत आणि त्या कानडी ब्राह्मण आहेत… एका चळवळीचा हा केवढा विदारक काव्यगत विरोधीप्रवास आहे! मूळ चळवळीत व्यक्तीपूजा तसंच कर्मकांड नाकारलं पण, जयललिता ‘अम्मा’ म्हणजे साक्षात देवीचा अवतार आहे अशी आज त्याच प्रवाहाची मान्यता आहे, या अम्माची पूजा केली जाते. अम्माची देवळे उभारण्यात आलेली आहेत. ‘अम्मा’ची बेहिशेबी संपत्ती बाळगल्याच्या आरोपातून सुटका व्हावी म्हणून ४० हजार ठिकाणी रुद्राभिषेक करण्यात आले किंवा अम्माच्या छायाचित्र/मूर्तीची पूजा तरी करण्यात आली, असं प्रकाशित झालेल्या बातम्यात म्हटले आहे. ते जर खरं असेल तर, द्रविड कझागम चळवळीचा झालेल्या प्रवासाला लाभलेला विरोधाभास आकलनाच्या कवेत मावणारा नाही.
‘तामिळनाडूतील विजय व्यक्तीकेंद्रित राजकारणाचा आहे’, अशी टीका कॉंग्रेसनं करावी हेही घोर राजकीय अज्ञान आणि विरोधाभास आहे, व्यक्तीकेंद्रित राजकारणाची सुरुवात करून पक्षातील सामुहिक नेतृत्व निकालात काढण्याची प्रक्रिया इंदिरा गांधी यांनी या देशात कशी सुरु केली आणि कॉंग्रेस नेते ‘गांधीं’समोर कसे झुकले, अजूनही कसे झुकतच आहेत हे सर्वश्रुत आहे. (अधिक माहितीसाठी लोकनेते शरद पवार लिखित ‘लोक माझे सांगाती’ या आत्मकथनात्मक पुस्तकातील प्रकरण ३ आणि ४ वाचावं). ‘शहजादे’ राहुल फलंदाजीला उतरले तर बहुसंख्य कॉंग्रेस नेते घरापासून साष्टांग दंडवत घालत क्रिकेटच्या मैदानापर्यंत जातील आणि राहुल गांधी त्यांच्या घरी पोहोचेपर्यंत दंडवत घालूनच राहतील, इतकी ही काँग्रेसी व्यक्तीनिष्ठा विधिनिषेधशून्य आहे. कॉंग्रेसनंच लावलेल्या या व्यक्तीकेंद्रित राजकारणाला आलेली फळे म्हणजे जयललिता, ममता, मायावती, मुलायम, लालू आहेत! म्हणून यासंदर्भात विनाकारण ‘राजकीय पवित्रते’चा आव कॉंग्रेसनं आणू नये.

=प्रवीण बर्दापूरकर
९८२२०५५७९९ / ९०११५५७०९९
praveen.bardapurkar@gmail.com

संबंधित पोस्ट