जिव्हाळ्याची सावली !

विदर्भाच्या राजकारण , समाजकारण , शिक्षण , पर्यावरण  आणि सांस्कृतिक क्षेत्रातील  ज्येष्ठ नेते गिरीश  गांधी आज , २३ जुलै २०२२ला वयाच्या पंच्याहत्तरीत प्रवेश करत आहेत . त्यानिमित्ताने प्रकाशित होणाऱ्या ‘सावली’ या गौरव ग्रंथातील  हा  ‘अनकट ‘ लेख  –

सर्व  छायाचित्रे – विवेक रानडे 

खादं शहर पूर्ण जाणून घ्यायचं असेल तर अगदी गल्लीबोळात मनसोक्त पायी फिरा , लोकांशी बोला , त्यांचं बोलणं लक्षपूर्वक ऐका आणि एखादा माणूस जाणून घ्यायचा असेल तर त्याच्यासोबत फिरा , त्याचा गोतावळा बघा , त्यांच्याशी बोला ; अशी शहर आणि माणूस जाणून घेण्याची शैली अनेकांची असते ; माझीही आहे . गिरीश गांधी यांची ओळख १९८१त झाली . मानव मंदिर या संस्थेच्यावतीने गरीब-गरजू विद्यार्थ्यांना तेव्हा मोफत सायकली दिल्या जात . शेकडोनं अर्ज येत . त्यातील पात्र विद्यार्थ्यांची  निवड करण्यासाठी जी समिती  गिरीश गांधी आणि अनंतराव घारड नेमत , त्यात चार वर्ष माझाही समावेश होता . त्या चार वर्षात प्रशस्त रस्त्यांच्या पलीकडे असलेलं झोपडपट्टीत , नाल्याच्या कांठावर राहणारं , नागरी सुविधांचा नावनिशाणा नसलेलं आत्यंतिक गरीब  नागपूर अनुभवायला मिळालं . त्या भटकंतीतून नागपूरच्या मातीचा एक भाग मी झालो .  जसं नागपूर उमजत गेलं तसंच या काळात गिरीश गांधीही तुकड्या-तुकड्यात समजत गेले . माणूस म्हटल्यावर गुण आणि दोष आलेच ; गिरीश गांधीही त्याला अपवाद नाहीतच पण , हा माणूस जिव्हाळ्याची सावली होऊन आपल्यासोबत वावरत असतो , हाच आजवरचा अनेकांचा अनुभव आहे , हे नि:संकोचपणे मान्य करायलाच हवं . या म्हणण्याचे अनेक दाखले देता येतील पण , त्यातील कांही अनुभव इतके वैयक्तिक आहेत की , ते सांगितलेले गिरीश गांधी यांनाही आवडणार नाही .

नितळ गव्हाळ वर्ण , डोईवरचे काहीसे फुगवून मागे वळवलेले केस , मध्यम ऊंची , अंगावर साधारण अर्ध्या बाह्यांचा तलम खादीचा शक्यतो बुशशर्ट , त्या शर्टाच्या खिशाला हिरव्या शाईचा पेन , मंद रंगाची फुलपॅन्ट , बोलण्याचा स्वर बहुतांश वेळा ऋजू , असं गिरीश गांधी यांचं एकूण व्यक्तिमत्त्व आहे . ‘गिरीश भाऊ ‘ हे त्यांचं प्रचलित उल्लेखन परिवारात आहे . समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रातील गुणवंतांची मांदियाळी जमा करणं आणि त्यात रमणं , हा या माणसाचा छंद आहे . या आघाडीवर हा माणूस एवढा छंदिष्ट आहे की , एकटे गिरीश गांधी त्यांच्या घरातही पाहायला मिळत नाहीत . या छंदाचा विस्तार म्हणजे मित्र आणि मान्यवरांना , घरी किंवा हॉटेलात नेऊन भरपूर आग्रहानं खिलवणं हा आहे .

आसामात एका चहाच्या मळ्यात मॅनेजर म्हणून मिळणारी संधी नाकारुन सुमारे पाच-साडेपाच दशकापूर्वी वरुडहून नोकरीसाठी नागपूरला आलेले गिरीश गांधी आता नागपूरच्या सार्वजनिक जीवनाचा एक अविभाज्य घटक झालेले आहेत . राजकारण , समाजकारण , पर्यावरण व वृक्ष संवर्धन , पत्रकारिता , शिक्षण , कृषी तसंच सांस्कृतिकतेच्या विविध दालनात गिरीश गांधी यांचा कार्यकर्ता ते नेता असा वैविध्यपूर्ण वावर आहे . गिरीश गांधी यांच्या वावरामुळे या सर्वच क्षेत्रात उत्साह संचारला हे नाकबूल करणं आत्मवंचना ठरेल . अनेक संस्था संघटनांच्या व्यवहारात कांही क्षणांपूर्वी कार्यकर्ता किंवा संघटकांच्या भूमिकेत वावरणारे गिरीश गांधी नंतर व्यासपीठावर दिसतात . नुसतेच दिसत नाहीत तर , सभा गाजवून टाकतात . किती संस्था आणि संघटनांशी गिरीश गांधी संबंधित आहेत यांची यादी करता येईल पण  , किती संस्था व संघटनांना  त्यांनी प्रेरणा दिली , आर्थिक बळ पुरवलं आहे , त्याची मात्र संख्या सांगता येणार नाही इतकी ती मोठी आहे .

अगदी हेच गिरीश गांधी यांनी संकट समयी मदत केलेल्या माणसांबाबतही लागू आहे . समोरच्यांचा परदेश प्रवास असो की घर घेणं की आजारपण की गरजूला नोकरी मिळवून देणं , अशा अनेक समयी गिरीश गांधी यांचा हात कायम खंबीर दात्याच्या भूमिकेत असतो .  मी तर  नेहमी म्हणतो , ‘समोरचा स्नेहीजन संकटात येण्याच्या नेमक्या वेळी गिरीश गांधी यांचा धीर देणारा एक हात त्याच्या पाठीवर आणि दुसरा त्याच्या खिशात असतो’ . एखाद्याला नोकरी मिळवून देण्यासाठी तो गरजू जितक्या चकरा मारणार नाही त्यापेक्षा जास्त हेलपाटे त्या संस्थेच्या व्यवस्थापनाकडे गिरीश गांधी मारणार , असा अनुभव मी अनेकांच्या बाबतीत अनेकदा घेतलेला आहे . यातल्या फारच थोड्या माणसांनी त्या मदतीबद्दल गिरीश गांधी यांच्याबद्दल कायम कृतज्ञता बाळगली असल्याचाही अनुभव आहे मात्र , अंतरीचं हे शल्य सहसा उघड न करण्याचा सुसंस्कृतपणा गिरीश गांधी यांच्यात आहे . हे असं वागणं फार कमी लोकांना जमतं , हे नक्की .

संस्थात्मक पातळीवर वावरताना गिरीश गांधींनी बाळगलेली शिस्त आवर्जून लक्षात घेण्यासारखी आहे . पदाधिकारी म्हणून नातं असलेल्या गिरीश गांधी यांच्या प्रत्येक संस्थेची प्रशासकीय आणि आर्थिक घडी अनुकरणीय आहे . त्यांच्या नेतृत्वाखालील प्रत्येक संस्था आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण आणि सर्व हिशेब तसंच कार्यालयीन रेकॉर्ड एकदम चोख . ज्या कामासाठी संस्था स्थापन केली त्या कामासाठी निधी कधी कमी पडल्याचा अनुभव  गिरीश गांधी यांच्या बाबतीत येत नाही . रुपयांच्या कमी होणाऱ्या अवमूल्यनामुळे निधी क्वचित कमी पडला तर , त्यासाठी अन्य कोणत्या संस्थेतून निधी वळता करुन घेण्याचा अव्यापरेषू व्यवहार गिरीश गांधी कधीच करत नाहीत तर हवी तेवढी भर टाकतात . त्यामुळे एका संस्थेच्या आर्थिक व्यवहाराच्या तंगड्या दुसऱ्या संस्थेच्या पायात अडकलेल्या आहेत आणि एका क्षणी दोन्ही संस्थांचे व्यवहार ठप्प झालेले आहेत असं होत नाही . अनेक संस्थांचं सारथ्य  करत असतांना ‘इकडून तिकडे’ पैसे वळवण्याचा ट्रेंड सार्वत्रिक असतांना गिरीश गांधी मात्र त्याला अपवाद आहेत .

गिरीश गांधी यांच्या एकसष्ठी निमिता आयोजित कार्यक्रमात समकाल या गौरव ग्रंथाच्या प्रकाशन समारंभ प्रसंगी डावीकडून महेश एलकुंचवार , प्रकाश आमटे , गिरीश गांधी , नितीन गडकरी , प्रवीण बर्दापूरकर अभय बंग आणि भास्कर लक्ष्मण भोळे .

‘कदरदान’ता हे गिरीश गांधी या माणसाचं आणखी एक वैशिष्ट्य . बहुसंख्य लोक दुसऱ्याचं कौतुक करण्याच्या बाबतीत कंजूष असतात पण , गिरीश गांधी त्याला पूर्ण अपवाद आहेत . स्नेहीजनांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याऱ्या पत्रावर केलेल्या हिरव्या रंगाच्या शाईनं लफ्फेदार सहीनं याची सुरुवात होते . माझ्या अंदाजाप्रमाणं वर्षभरात अशी दोन हजारांवर तरी शुभेच्छा पत्र गिरीश गांधी पाठवत असणार . हेच गिरीश गांधी स्वत:च्या वाढदिवसाच्या जाहीरपणाबद्दल मात्र फारसे उत्सुक नसतात . त्यांचा साठीचा सत्कार एकसष्ठी उलटल्यावर आणि तेही ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार व ज्येष्ठ  विचारवंत डॉ . भास्कर लक्ष्मण भोळे यांनी पुढाकार घेतल्यावर कसा झाला , याचा मी एक साक्षीदार आहे . याही कार्यक्रमात गिरीश गांधी सत्कारमूर्ती म्हणून नाही तर कार्यकर्ता म्हणून वावरले , ही त्यांच्यातली शालीनता होती हे लक्षात घ्यायला हवं .

प्रकाशित झालेली बातमी किंवा मुद्रीत माध्यमातला अन्य मजकूर चांगला आहे , हे सांगणारा पहिला फोन गिरीश गांधी यांचा असतो . हेच प्रकाशित झालेल्या साहित्याबद्दलही . एक बाब इथे आवर्जून नोंदवून ठेवायला हवी-पुस्तक प्रकाशित होणं हा लेखक-कवीच्या आयुष्यातला आनंद आणि प्रातिभ  समाधानाचा एक सुवर्णक्षण असतो पण , देखणा प्रकाशन सोहळा करणं मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर असतं . अशा समयी असे अत्यंत नेटके कार्यक्रम आयोजित करण्यात गिरीश गांधी यांनी वैपुल्यानं पुढाकार घेतलयांचा अनुभव अनेकांना आजवर आलेला आहे . सांस्कृतिक क्षेत्रातल्या बहुसंख्य लोकांचे अहंकार फारच टोकदार असतात . अगदी  हवेच्या छोट्याशा झुळुकीनंही त्या अहंकाराचा भडका उडतो आणि मानापमानाचे प्रयोग सादर होतात . मात्र , अशा सर्वांना सांभाळून घेणाऱ्या गिरीश गांधी यांच्या संयम व सहिष्णुतेला दाद द्यावी लागेल . हे सांभाळत नागपूर आणि विदर्भात साहित्य , संगीत , चित्रविषयक कार्यक्रम , संमेलनं आयोजित करण्यात गिरीश गांधी यांची इतकी मक्तेदारी निर्माण झाली की , एकदा ‘लोकसत्ता’त लिहिलेल्या एका मजकुरात त्यांचा उल्लेख मी ‘विदर्भाचे सांस्कृतिक प्रवक्ते’ असा केला आणि तो सर्वमान्य झाला !

गुणी जनांचं कौतुक करण्याचा पुढचा टप्पा म्हणजे , नागपूर आणि विदर्भाच्या क्षितिजावर विविध पुरस्कार सुरु करण्यात गिरीश गांधी यांनी घेतलेला पुढाकार . हा खरं तर एक स्वतंत्र विषय आहे . नागपूर आणि विदर्भ भूषण ते डॉ . बाबासाहेब आंबेडकर , प्रबोधनकार ठाकरे , प्रकाश देशपांडे यांच्या नावाने पुरस्कार असा हा सन्मानांचा व्यापक पट आहे . या उपक्रमांमुळे नागपूरकर गिरीश गांधी विदर्भातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचले . सन्मान देण्यासाठी योग्य व्यक्तीची निवड करण्याच्या प्रक्रियेत गिरीश गांधी यांच्या सोबत काम करण्याची संधी मलाही अनेकदा मिळाली . त्यामुळे त्यांचं वाचन आणि राज्यात कुठे कोण काय विधायक काम करत आहे , ही माहिती असण्याचा आवाका किती मोठा आहे , हे लक्षात आलं . असा सन्मान देतांना समोरच्यांच्या दोष किंवा उणिवांची चर्चा न करणं आणि केवळ त्याचं कर्तृत्व विचारात घेणं , ही गिरीश गांधी यांची खासीयत दुर्मीळ आहे . नियमाला अपवाद म्हणून की काय , अगदीच क्वचित असा सन्मान देण्यासाठी निवड करतांना गिरीश गांधी जास्तच ‘दयाळू’ होतात असाही अनुभव आहे . अग्रलेख मागे घेण्याचा जागतिक नीचांक करणाऱ्या संपादकाला ‘प्रबोधनकार ठाकरे’ सन्मान देण्याचा त्यांचा निर्णय मला नेहेमीच ‘धाडसी दयाळू’पणाचा वाटत आलेला आहे पण , ते असो .

महाराष्ट्रातल्या राजकारणात गिरीश गांधी यांचा वावर आणीबाणीच्या आधीपासून आहे . विधानसभेची एक निवडणूकही त्यांनी त्या काळात लढवली होती . लोकशाहीच्या मूल्यांवर त्यांची नितांत श्रद्धा आहे म्हणूनच या मूल्यांचा होणारा संकोच त्यांना अस्वस्थ करतो . त्यांचं राजकीय आकलन आणि सर्व राजकीय पक्षांतला त्यांचा शीर्ष नेतृत्वाशी असणारा संपर्क व वावर राष्ट्रीय तसाच राजकारण विरहित आहे . दिल्ली , मुंबई , नागपूर , पुणे औरंगाबाद , अमरावती अशा विविध ठिकाणी गिरीश गांधी यांच्यासोबत प्रवास करण्याची संधी मिळाली तेव्हा त्यांचा हा अफाट लोकसंग्रह लक्षात आला . जगजीवनराम ,  पी . व्ही . नरसिंहराव , शंकरराव चव्हाण यांच्यापासून ते राज्यातल्या अनेक मुख्यमंत्र्यांशी गिरीश गांधी यांची असणारी ही विश्वासाची घसट मी ‘फर्स्ट  हँड’ अनुभवली आहे . अनेक राजकीय दिग्गजांच्या खास गोटातले म्हणून ते अजूनही ओळखले जातात .  तरी , राजकारणात गिरीश गांधी नावाचा माणूस ‘वाट चुकलेला मुसाफीर’ आहे . जनता दल , राष्ट्रवादी  ते काँग्रेस या प्रवासात त्यांच्यातल्या क्षमतांना न्याय मिळणं तर  लांबच राहिलं , त्या क्षमता सिद्ध करण्याची किमान संधीही त्यांना मिळाली नाही , असं माझं ठाम मत आहे .  लोकशाही मूल्यांवरील परकोटीची श्रद्धा आणि ‘ॲक्रॉस द पार्टी’ असणारा गिरीश गांधी यांचा  संपर्क तर , त्यासाठी अडथळा ठरला नसावा ना अशी शंका अनेकांच्या प्रमाणे माझ्याही मनात आहे . याबद्दल केव्हा तरी गिरीश गांधी यांनीच जाहीर खुलासा करायला हवा . राष्ट्रवादी काँग्रेसनं  त्यांना  विधानपरिषद सदस्यत्व दिलं पण , तेही  अल्पकाळच . पुन्हा हे सदस्यपद पूर्ण टर्म त्यांना मिळालं नाही कारण समोर सार्वत्रिक निवडणुका होत्या आणि मतांसाठी ‘गांधी’ ऐवजी दुसऱ्या कुणाला उमेदवारी देणं हा त्या पक्षाचा प्राधान्यक्रम ठरला , अशी चर्चा तेव्हा झाली ती खोटी कशी काय असू शकेल ? पण , कोणतीही खळखळ न करता अपरिहार्यता म्हणून ते नाकारणं खिलाडू वृत्तीनं गिरीश गांधी यांनी स्वीकारलं .  त्या छोट्या कारकिर्दीतही त्यांनी छाप उमटवली . आमदार म्हणून मिळणारं सेवानिवृत्ती वेतन सरकारी खजिन्यात जमा करणारे माझ्या साडेचार दशकांच्या पत्रकारितेतील गिरीश गांधी हे एकमेव आहेत .

अकाली दिवंगत झालेली प्रतिभावान अभिनेत्री स्मिता पाटील हा गिरीश गांधी यांचा हळवा कोपरा आहे . स्मिता पाटील हिच्या स्मृत्यर्थ गेल्या साडेतीन दशकांपासून एक वार्षिकांक गिरीश गांधी प्रकाशित करतात . स्त्री हेच या अंकाचं सूत्र असतं . आजवरच्या जवळ जवळ प्रत्येकच अंकाला संदर्भ मूल्य आहे . एकाच विषयावर इतका प्रदीर्घ काळ वार्षिकांक प्रकाशित होण्याचा मराठीतला तरी हा विक्रम असणार . या अंकाचं तीन वेळा संपादन मी केलं . ते करतांना ‘मालक’ गिरीश गांधी यांनी मला पूर्ण स्वातंत्र्य आणि अतिशय सन्मानजनक मानधन दिलं हे आवर्जून सांगायला हवं . ‘आईकडे एक स्त्री म्हणूनही पहिलं पाहिजे’ हे माझ्या ‘आई’ या अंकाचं सूत्र तसं तर स्वीकारायला कठीण होतं पण , त्यासंदर्भात अतिशय खुला दृष्टिकोन गिरीश गांधी यांनी दाखवला .  मी संपादित केलेली ‘आई’ आणि ‘माध्यमातील ती’ ही दोन पुस्तकं म्हणजे याच अंकातील मजकुराची सुधारित आवृत्ती  आहे . ठरवलं असतं तर कॉपी राईटचा मुद्दा काढून त्या मजकुराची पुस्तकं करतांना बराच ‘मालकी हक्क’ गिरीश गांधी यांना दाखवता आला असता पण , त्यांनी कोणतीच खळखळ केली नाही . असं उमदेपणानं वागणं प्रत्येकालाच जमेल असं कधीच नसतं .

प्रत्येकाला भावलेले  ( आणि कदाचित कांहीना न भावलेलेही ! ) गिरीश गांधी वेगवगळे असणं अगदी स्वाभाविक आहे . शिवाय त्यांचं व्यक्तिमत्त्वही बहुपेडी आहे म्हणून ते कुणा एकाच्या कवेत मावणार नाही . मला गिरीश गांधी हे एखाद्या झाडासारखे वाटतात . झाड शीतल छाया , फुलं आणि फळं देतं . गिरीश गांधी नावाचं झाड जिव्हाळ्याची सावली देणारं आहे .

प्रवीण बर्दापूरकर  

/ एफ-१२ / चाणक्यपुरी / फेज-१ / दर्गा रोड / औरंगाबाद ४३१००५ /

​Cellphone  ​+919822055799

www.praveenbardapurkar.com
 

 

 

संबंधित पोस्ट