दसऱ्याची धुळवड !

शिवसेनेतल्या उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटांनी या वर्षीच्या  दसऱ्याचा माहोल  ‘हायजॅक’ केला . या मेळाव्यापुढे प्रकाश वृत्त वाहिन्या , डिजिटल प्लॅटफॉर्म आणि मुद्रीत माध्यमांना या राज्यात इतर काही प्रश्न आहेत याचा जणू विसरच पडलेला होता . गर्दीचा निकष लावला तर एकनाथ शिंदे आणि भाषणाच्या आघाडीवर उद्धव ठाकरे बऱ्यापैकी उजवे ठरले . ( दोन्ही गटांनी , गर्दी ‘जमवलेली’ नसून ‘जमलेली’ आहे , असे केलेले दावे आपण ‘सहृदयतेनं’ समजून घ्यायला हवेत ! ) शाप , तळतळाट , तगमग , टोमणे अशी एकमेकांची अंतर्वस्त्र या दोन्ही गटांकडून जाहीररित्या धुवून वाळत घातली जाण्यातून दसऱ्याला धुळवडच  साजरी झाली असंच म्हणावं लागेल . राजकीय शक्ती प्रदर्शन म्हणजे धुळवड हा जो संदेश त्यातून गेला हे लोकशाहीवर नितांत श्रद्धा असणाऱ्या कुणाही संवेदनक्षम माणसाला अस्वस्थ करणारं  आहे . या दोन्ही गटांनी यापुढे विजयादशमी धुळवड म्हणून  साजरी करण्याचा ‘विचार’ मांडू नये म्हणजे झालं .

राजकारण हे नेहमीच व्यक्ती केंद्रीत असतं पण , त्यातून साधलं जायला हवं असतं ते जनतेचं हित . हे दोन्ही मेळावे मात्र व्यक्तिगत उण्या-दुण्यांच्या चक्रातच अडकले .  राज्याच्या आर्थिक धोरणात त्यांनी काय बदल केलेत आणि यांनी काय करायला हवेत , विकासाच्या आघाडीवर नेमकी स्थिती काय आहे , किंमती  नियंत्रणात आणण्यासाठी कुणी काय केलं आणि काय करणार आहे , बेरोजगारीच्या आघाडीवर सकारात्मक असं काय घडलं , कोणते नवीन प्रकल्प आले , असा मूलभूत लेखाजोखा कुणीच मांडला नाही .  या दोघांच्याही सरकारांच्या काळात जे काही महत्त्वाचे प्रश्न चर्चेत आहेत त्यात मुंबई पोरबंदर, वंदेमातरम् द्रुतगती रेल्वे , मुंबई कोस्टल  मार्ग , बुलेट ट्रेन , मुंबई मेट्रोपोलोटीन  रिजनचा विस्तार , मुंबईतील मेट्रोचं जाळं विस्तारणं , समृद्धी महामार्ग आदींचा समावेश आहे . समृद्धी महामार्गाच्या कामाची सुरुवात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळात झाली आणि त्याच काळात हा प्रकल्प ८० टक्के पूर्ण झाला त्यामुळे त्याचं श्रेय एकट्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारला घेता येणार नाही . नाही म्हणायला , राज्यातील एक कोटी गरीब कुटुंबांना १०० रुपयांत दिवाळी गोड करण्याची योजना एकनाथ शिंदे यांनी मांडली आहे . त्या योजनेचं स्वागतही करायला हवं पण , केवळ टीआरपी मिळवून देणाऱ्या अशा योजना आर्थिक निकषावर राज्याच्या हिताच्या आहेत का याचा विचार करण्याचं भान आपल्या देशातील राजकीय पक्ष कधीचेच विसरलेले आहेत . यात एक महत्त्वाचा मुद्दा , वरील सर्व योजनांत मुंबईतील प्रकल्पांना प्राधान्य आणि त्या वरील योजनांत भांडवली गुंतवणूकही जास्त आहे आणि या तुलनेत ग्रामीण भागात येणाऱ्या प्रकल्पांतील गुंतवणूक कमी आहे  . उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे दोघंही मुंबईचाच विचार जास्त करतात , संपूर्ण महाराष्ट्राचा नाही , असा संदेश त्यातून जातो आहे  . संयुक्त महाराष्ट्राच्या हिताचं काय असा प्रश्न त्यातून निर्माण होतो .

उद्धव ठाकरें पेक्षा जास्त जबाबदारी एकनाथ शिंदे यांच्यावर होती कारण ते आता राज्याचे मुख्यमंत्री आहेत . दीड तासाच्या रटाळ भाषणात स्व-राज्याच्या विकासाचं ,जनहिताचं  कोणतं नियोजन एक मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या मनात आहे , हेच त्यांनी सांगणं अपेक्षित होतं . मात्र , सुमारे दीड तासाच्या त्या संदर्भात कांहीच सांगितलं गेलं नाही . एकनाथ शिंदे यांचा सगळा वेळ उद्धव ठाकरे यांच्या म्हणण्याचं खंडन करण्यात गेला . उद्धव ठाकरे यांनी रचलेल्या सापळ्यात एकनाथ शिंदे पूर्ण अडकले . शिंदे यांना केवळ शिवसेना ताब्यात घ्यायची आहे आणि त्यांची विकासाची दृष्टीही अल्प  असल्याचा संदेश त्या भाषणातून गेला .

स्वत:चीच शिवसेना खरी आणि धनुष्यबाण आपल्यालाच मिळायला हवा याविषयी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलेली तळमळ अप्रामाणिक आहे , असं मुळीच म्हणता येणार नाही मात्र , भाषणाच्या ओघात ‘खरं आणि खोटं’ सिद्ध करण्यासाठी दोघांनीही काढलेले एकमेकांचे आई-बाप किंवा नातवाचा केलेला उल्लेख , दोघांनीही एकमेकांना लगावलेले टोमणे शिवसेनेच्या ‘ठाकरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शोभेसे  असले  तरी लोकशाहीवादी राजकारणाला मारक  आहेत . शिवाय ‘ती’ ठाकरी शैली बाळासाहेब ठाकरे यांना जाम  शोभून दिसत असे  कारण , त्यात बिनधास्तपणा तसंच  रोखठोकपणा याचं टायमिंग साधलेलं  मिश्रण असे ; आता ठाकरी भाषा म्हणजे केवळ टोमणे उरले आहेत ! राजकारण म्हणजे केवळ शिमगा साजरा करणं हाच संदेश दसऱ्याच्या या धुळवडीतून व्यक्त झालेला आहे ; त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्तर मुळीच उंचावलेला नाही . ही अशी बेसूर  उणी-दुणी निघत गेली तर उद्या हे दोन्हीही नेते एकमेकांच्या असल्या-नसल्या शारीरिक न्यूनाचाही उद्धार करायला मागेपुढे पाहणार नाहीत .

शिवाय एकनाथ शिंदे यांचा इतिहास पक्का नाही . हेही या निमित्तानं समोर आलं . धर्मवीर म्हणून ओळखले जाणारे ठाण्याचे आनंद दिघे याचं निधन ऑगस्ट २००१ मध्ये झालं . २००२ मध्ये झालेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे सक्रिय झाले आणि त्याच्या पुढच्या वर्षी म्हणजे , २००३ मध्ये शिवसेनेच्या महाबळेश्वरला झालेल्या बैठकीपासून उद्धव राजकारणात सक्रिय झाले ; शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून याच बैठकीत त्यांची निवड करण्यात आली . हा घटनाक्रम जर लक्षात घेतला तर आनंद दिघे याचं निधन झालं तेव्हा सेनेत सक्रिय नसणाऱ्या उद्धव ठाकरें यांना  एकनाथ शिंदे कसे काय भेटले , असा प्रश्न निर्माण होतो . केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शिवसेनेला अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद द्यायचं कबूल केलं होतं हे उद्धव ठाकरे यांचं म्हणणं जसं मिथक ठरतं तसंच आनंद दिघेंच्या निधनानंतर त्यांच्या संपत्तीची चौकशी उद्धव ठाकरे यांनी केली , हे एकनाथ शिंदे यांचं म्हणणं मिथकचं ठरतं .  ‘शिवसेनेचा झेंडा आणि राष्ट्रवादीचा अजेंडा’ असं एकनाथ शिंदे यांनी सोडलेलं टीकास्त्र खरं आहे असं मानायचं असेल तर शिंदे सरकारच्या काळात ‘शिवसेनेचा झेंडा आणि भाजपचा अजेंडा‘ असा कारभार सुरु आहे ; हे म्हणजे ‘आपलं ठेवावं झाकून आणि दुसऱ्याचं पाहावं वाकून’ असाच मामला झाला की ! एकनाथ शिंदे यांच्या एकूणच भाषणात अशा बऱ्याच  गफलती आहेत . अनेकदा तर ‘या बाबत मी योग्य वेळी बोलेन. ‘ असा सूचक (?) इशारा ते देतात आणि मुद्द्याला बगल देतात  .

उद्धव ठाकरेंचं भाषण एका अनुभवी नेत्याचं होतं तरी , जे कांही टोमणे त्यांनी लगावले आणि व्यक्तिगत उणी-दुणी त्यांनीही काढली ती त्यांच्या सुसंस्कृत प्रतिमेला शोभणारी मुळीच नव्हती . एकनाथ शिंदे यांच्या , लोकसभा सदस्य असलेल्या  ‘कार्टा’ हा आणि नातवाचा उद्धव ठाकरे यांनी केलेला उपहासपूर्ण उल्लेख तर पूर्णपणे अनाठायी होता . उद्या जर आदित्य किंवा तेजस ठाकरे यांचा ‘कार्टा’ असा हेटाळणीयुक्त उल्लेख कुणी केला तर ते उद्धव ठाकरे सहन करु शकणार नाहीत हे स्पष्टच आहे . राजकारण नेहमीच एका                   ( किंवा  कांही मोजक्याच ) नेत्यांभोवती केंद्रित झालेलं असतं . त्याला शिवसेना तर  मुळीच अपवाद नाही . तरी  पक्ष म्हणजे मी आणि मी म्हणजेच पक्ष अशी भूमिका घेता येत नसते कारण कोणत्याही राजकीय पक्षांचं अस्तित्व कार्यकर्त्यांवर बळकट आणि निर्भर असतं . पक्ष आणि सत्तेत लाभाची पदं मिळाली की कार्यकर्त्यांना आणि त्यातून पक्षाला  बळ मिळत असतं , असा हा परस्परपूरक मामला असतो . उद्धव ठाकरे मात्र ‘मी त्यांना अमुक केलं’ , ‘मी त्यांना तमुक दिलं’ ‘तो माझ्यामुळे घडला’ अशा संमोहात  वावरत आहेत , असंच दिसतं . महाविकास आघाडीत उद्धव आणि सेना एकटे पडले असल्याचं चित्र आहे तर एकनाथ शिंदे यांच्यासोबत भाजप साम-दाम-दंडासह ठामपणे उभा आहे ; म्हणजे आता लढाई फारच विषम व आव्हानात्मक आहे . यापुढील प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक उचलावं लागणार आहे . सेनेत पडलेल्या फुटीच्या संदर्भात मुळीच भावनोत्कट न होता आत्मपरीक्षणाची नेमकी परखड भूमिका न घेता उद्धव ठाकरे केवळ तळतळाट व्यक्त करत आहेत , असाच संदेश त्यांच्या भाषणातून गेला आहे . या संमोहातून उद्धव ठाकरे जितक्या लावकर बाहेर येतील तितकं सेनेसाठी चांगलं ठरेल .

शेवटी – आदित्य ठाकरे यांच्याबद्दल . सेना फुटल्यापासून आदित्य ठाकरे यांचं वागणं शिवसेनेसाठी फारच आशादायक आहे . उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूती  असल्याचं ग्रामीण भागात पदोपदी जाणवतं पण , उद्धव ठाकरे अजूनही त्यांच्यापर्यंत गेलेले  नाहीत आणि आदित्य मात्र फुटीची जखम  भळाभाळा स्त्रवत असतानाही जोशात  सर्वत्र फिरत आहेत , फार क्वचित अपवाद वगळता नेमकं बोलत आहेत . राजकारणात हे असं चालणारच असा जो भाव त्यांच्या वर्तनात दिसतो तो उमदा आहे .  प्रकृती साथ देत नसेल तसंच  भावनोत्कटता बाजूला ठेवून आणि नेतृत्वाच्या संमोहनातून बाजूला होणं शक्य नसेल तर , आदित्य ठाकरे व  सेनेच्या कांही जुन्या-जाणत्यांचे एक अष्टप्रधान मंडळ स्थापन करुन त्यांच्या हाती उद्धव ठाकरे यांनी सेनेचा कारभार सोपवायला हवा , हाच आदित्य यांच्या या आशादायक वावराचा संकेत  आहे  .

प्रवीण बर्दापूरकर

Cellphone  +919822055799
www.praveenbardapurkar.com

संबंधित पोस्ट