पवार , ठाकरे , फडणवीस , शिंदे यांची झाकली मूठ !

लोकसभा निवडणुकीची तिसरी फेरी संपलेली असून अजून चार फेऱ्या बाकी आहेत .आणखी एका महिन्यानं आजच्याच दिवशी दिल्लीत नवं सरकार सत्तारुढ होण्याची घाई टिपेवर असेल . निवडणुकीच्या मध्यावर प्रचाराची आणि एकमेकांवर कुरघोडी करण्याची स्पर्धा जोरात आहे . प्रचाराच्या कुरुप पातळीबद्दल गेल्याच आठवड्यात लिहिलं होतं . ती पातळी आणखीनच खालावत जाताना दिसत आहे…’तू आई काढली तर मी माय काढतो’, असा उबग आणणारा प्रकार प्रचारात सुरु आहे आणि त्याला आवर घालण्याचा विवेक कोणत्याच पक्षाकडे नाही .
ही  निवडणूक राष्ट्रीय पातळीवर नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी व्यक्तीकेंद्रीत झालेली आहे, तशीच ती महाराष्ट्रातही शरद पवार , उद्धव ठाकरे , देवेंद्र फडणवीस , अजित पवार , प्रकाश आंबेडकर , एकनाथ शिंदे अशी व्यक्तीकेंद्रीत झालेली आहे . महाराष्ट्रात गेल्या निवडणुकीत भाजप आणि सेना युतीला लोकसभेच्या ४१ जागा मिळाल्या होत्या . यापैकी २३ जागा भाजप आणि १८ जागा शिवसेनेला मिळाल्या होत्या . तेव्हा अविभाजित असलेल्या ( महा )राष्ट्रवादी काँग्रेसला ५ आणि प्रत्येकी एका जागी एमआयएम आणि काँग्रेसला विजय संपादन करता आला होता . आता राजकीय परिस्थिती  पूर्णपणे बदललेली आहे . ( महा )राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत फूट पडलेली आहे . दिवस किती बदलले आहेत बघा , बाळासाहेब ठाकरे यांच्या धनुष्यबाणाला मत देऊ नका असं त्यांचा पुत्र उद्धव आणि नातू आदित्य यांना सांगावं लागत आहे तर सुमारे अडीच दशकं चावी देऊन सांभाळलेल्या घड्याळाला मत देऊ नका असं शरद पवार सांगत आहेत !
या निवडणुकीत खरा कस लागणार आहे तो शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्व आणि महाराष्ट्रावरील प्रभावाचा . पक्ष फुटल्यावर लोकसभेवर निवडून आलेल्यांपैकी २ सदस्य अजित पवार यांच्यासोबत गेले तर तिघे शरद पवार यांच्यासोबत राहिले . त्यापैकी एक सुप्रिया या त्यांची कन्या आणि दुसरे श्रीनिवासराव पाटील, शरद पवार यांचे जुने दोस्त . प्रकृतीच्या कारणावरुन श्रीनिवासराव पाटील निवडणुकीच्या रिंगणात नाहीत तर सुप्रिया यांच्या विजयासाठी आयुष्यात ऐंशीपेक्षा जास्त  उन्हाळे-पावसाळे पाहिलेले शरद पवार मोठ्या तडफेनं फिरत आहेत कारण हा त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे . त्यासाठीच मतदार संघातील काकडे , बाणखेले , थोपटे या घराण्यांशी असलेलं हाडवैर विसरुन शरद पवार यांनी दोस्तीचा समझोता करण्यासाठी पुढाकार घेतला आहे .
शरद पवार आजवरच्या राजकीय आयुष्यात कधीच एक लोकसभा मतदार संघ  किंवा एका जिल्ह्यापुरते मर्यादित नव्हते त्यामुळे ते अन्य लोकसभा मतदार संघातही प्रचारासाठी फिरत आहेत आणि नवी समीकरणे जुळवत आहेत . लोकसभेवर जर बारामतीसह पुन्हा पाच उमेदवार विजयी करण्यात यश आलं तर ‘शरद पवार यांच्याशिवाय महाराष्ट्राच्या राजकारणात पान हलत नाही’ , हा गेली अनेक वर्षे प्रचलित असलेला समज पक्काच होईल . अर्थात शरद पवार यांचा मुकाबला अजित पवार यांच्यासोबत आहे आणि दोघंही एकमेकांना ‘समूळ’ ओळखून आहेत . त्यामुळे ‘पवार विरुद्ध पवार’ ही लढत अत्यंत अटीतटीची होणार आहे यात शंकाच नाही . अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील (महा)राष्ट्रवादी काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत जर उल्लेखनीय यश मिळालं नाही तर याच वर्षी लगेच होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांची ‘बार्गेनिंग पॉवर’ नक्कीच कमी होणार आहे आणि पुढील प्रदीर्घ काळ त्यांना उपमुख्यमंत्रीपदावरच समाधान मानत राहावं लागणार आहे .
उद्धव ठाकरे यांच्यासाठीही ही लोकसभा निवडणूक फारच प्रतिष्ठेची आहे . राज ठाकरे आणि नारायण राणे यांनी पक्ष सोडल्यावर आणि बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झाल्यावर उद्धव यांनी शिवसेनेचा सांभाळ निगुतीनं केला यात शंकाच नाही . राडा करणारा पक्ष ते गंभीर राजकीय पक्ष असा  शिवसेनेचा प्रवास उद्धव यांच्याच काळात झाला , हेही मान्य करायलाच हवं पण , हे सर्व घडत असतांना उद्धव ठाकरे शिवसैनिकांपासून आणि सेनेच्या ज्येष्ठ नेत्यांपासून तुटत गेले . ( अजूनही त्या परिस्थितीत फारशी सुधारणा नाही . ) सुरुवातीचे मोजके कांही महिने वगळता मुख्यमंत्री म्हणूनही त्यांना फारशी चमक दाखवता आलेली नाही . त्यामागे प्रकृती हे एक कारण असेल पण , त्याच काळात शिवसैनिक हीच खरी ताकद आहे यांची पुरेशी काळजी घेण्यात ते यशस्वी झाले नाहीत  . (महा)राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत जाण्याचा त्यांचा निर्णयही सेनेच्या गोटात फारसा पचनी  पडलेला नाही हे मुंबई बाहेरच्या महाराष्ट्रात फिरताना जाणवत होतं .
शिवसेनेचा सुसंस्कृत चेहेरा अशी सुरुवातीच्या काळात उद्धव ठाकरे यांची प्रतिमा होती . त्या प्रतिमेला सुसंगत अशी त्यांची उक्ती आणि कृतीही होती त्यामुळे पक्षात आणि पक्षाबाहेरही त्यांच्या विषयी वाटणारी आश्वासकता मोठी होती पण , ती आता आहे असं जाणवत नाही . बाळासाहेब ठाकरे यांची पक्षावर हुकमत होती , त्यांच्या एका शब्दावर सैनिक प्राणत्याग करायला तयार होत , तशी परिस्थिती उद्धव यांच्या बाबतीत सर्वदूर आणि व्यापक आहेच , असं म्हणणं धाडसाचं ठरेल  . विशेषत: एकनाथ शिंदे आणि त्यांचा गट फुटल्यावर उद्धव ठाकरे भाषेच्या बाबतीत आक्रमक झाले हे खरं असलं तरी ( त्यांनी वाचाळवीरांच्या  पातळीवर उतरायला नको होतं ! ) नेता म्हणून त्यांचा पक्ष आणि महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रावर असणारा प्रभाव या लोकसभा निवडणुकीत कसाला लागलेला आहे . गेल्या म्हणजे २०१९च्या निवडणुकीसारख्या १८ नसल्या तरी १२ ते १४ जागा जरी त्यांच्या सेनेनं जिंकल्या तरी गेल्या लोकसभा निवडणुकीतील यश उद्धव ठाकरे यांचं होतं असं म्हणता येईल .  तसंच खरी शिवसेना उद्धव यांचीच आहे , एकनाथ शिंदे यांची नाही  हे सिद्ध होईल .  शिवाय येत्या विधानसभा निवडणुकीत राज्यात उद्धव ठाकरे यांची शिवसेना विरुद्ध भाजप अशी मुख्य लढत असेल , हे आजच लिहून द्यायला मी तयार आहे पण , असं घडायचं असेल तर ‘ठाकरी आळस’ झटकून शरद पवार यांच्याप्रमाणे तडफेनं उद्धव ठाकरे यांना प्रचाराला जुंपून घ्यावं लागणार आहे .
अनेकांना आवडणार नाही पण , हे सांगितलंच पाहिजे की महाराष्ट्रावरच्या शरद पवार यांच्या एकचालकानुवर्ती वर्चस्वाला अलीकडच्या काळात देवेंद्र फडणवीस यांनी धक्का दिलेला आहे . शिवसेना त्यांनी कशी फोडली यांचा सुगावाही सत्तेत असून उद्धव ठाकरे यांना लागला नाही . दोनपेक्षा जास्त दशकं चावी देऊन शरद पवार यांनी सांभाळलेलं घड्याळ अजित पवारांच्या मदतीनं फडणवीस यांनी पळवलं . पक्षातील निष्ठावंत आणि जुन्या जाणत्याच्या विरोधाची पर्वा न करता इतर पक्षातून अनेक नेते आयात केले . पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी  असलेले पंकजा मुंडे , विनोद तावडे , सुधीर मुनगंटीवार यांना दिल्लीत ढकललं . छायाचित्रही राज्यातील पक्षाच्या पोस्टर किंवा जाहिरातीत नसेल अशी कोंडी नितीन गडकरी यांची केली . राज्यात गाजलेल्या ‘मुंडे-गडकरी’ वादातही गडकरी यांच्या इतक्या मुसक्या कधीच आवळल्या गेल्या नव्हत्या . ( उलट नंतर गडकरी राष्ट्रीय अध्यक्ष झाले होते .) हे कमी की काय म्हणून राज्यात लोकसभेच्या निवडणुकीसाठी दिलेल्या उमेदवारांच्या यादीवरही फडणवीस यांचाच  प्रभाव आहे . थोडक्यात काय तर , राज्यातील  एकमेव प्रभावी नेता अशी प्रतिमा फडणवीस यांची आज तरी झालेली आहे . अशा परिस्थितीत हे स्थान कायम रखायचं असेल तर भाजपसोबतच महायुतीतील उमेदवारांना निवडून आणण्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आलेली आहे . यात जर यश आलं नाही तर , पुढच्या काळात देवेंद्र फडणवीस यांना शरद पवार ‘सळो की पळो’ करुन सोडतील हे स्पष्टच आहे
देवेंद्र फडणवीस यांच्या इतकाच कस या लोकसभा निवडणुकीत अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचा लागणार आहे . आगामी विधानसभा निवडणुकीत या दोघांचं आणि त्यांच्या पक्षाचं भवितव्य ठरवणारी ही निवडणूक आहे . त्यातही अजित पवार यांच्यापेक्षा एकनाथ शिंदे यांची जास्त कसोटी असेल . या टप्प्यात तरी सेनेच्या एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार तुल्यबळ वाटत नाहीयेत पण , हे चित्र बदलण्याचा विश्वास त्यांना वाटतो आणि अशा  विश्वासाला ‘सर्व प्रयत्नां’ची जोड मिळाली की हा निवडणुकीचा निकाल बदलतो . किमान आठ ते दहा जागी धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवणारे उमेदवार विजयी झाले नाहीत तर एकनाथ शिंदे बॅकफूटवर ढकलले जातील आणि कळीचा मुद्दा म्हणजे त्यांना बॅकफूटवर नेण्यासाठी भाजपकडून प्रयत्न होतील , कारण हे शेवटी राजकारण आहे .
खूप चर्चा होऊनही महाविकास आघाडीत वंचितचा समावेश होऊ शकला नाही आणि तसा तो न होण्यासाठी प्रकाश आंबेडकर हेच जबाबदार आहेत अशी भावना कार्यकर्त्यांत सर्वदूर आहे . प्रकाश आंबेडकर यांच्याशी  अशात कांही वेळा बोलणं झालं पण , त्यांची रणनीती समजू शकली नाही . राज्यात स्वबळावर प्रकाश आंबेडकर वगळता आणखी एक उमेदवार निवडून आणण्यात यश आलं तर वंचित आणि खुद्द प्रकाश आंबेडकर यांचं वजन वाढेल , अन्यथा वंचित केवळ कागदोपत्री उरेल .
या निवडणुकीत आणखी एक प्रभावी व्यक्ती मनोज जरांगे आहे . मराठा आरक्षणाला पाठिंबा न देणाऱ्या उमेदवाराला मतदान करु नका अशी उघड भूमिका त्यांनी घेतली असली तरी खाजगीत  मात्र देवेंद्र फडणवीस यांनी       ( म्हणजे भाजपनं ) दिलेले आणि ओबीसी उमेदवारांच्या विरोधात उभं ठाकण्याचे त्यांजरांगे यांचे डावपेच आहेत .  हे जर खरं असेल तर बीड , जालना , हिंगोली , परभणी आणि नांदेड लोकसभा मतदार संघातल्या निकालावर परिणाम होऊ शकतो . जरांगे यांच्या या विरोधी भूमिकेमुळे या पाच मतदार संघात वातावरण बदललं असं सांगितलं जात आहे ; काय  होतं ते निकालात कळेलच . एक मात्र खरं , या पाचही मतदार संघात बिगर मराठा उमेदवार पराभूत करण्यात यश आलं तर या पुढच्या काळात राज्याच्या राजकारणात मनोज जरांगे केवळ आरक्षणवादी  नव्हे तर राजकीय शक्ती म्हणूनही वावरतील आणि त्यामुळे सर्वांची डोकेदुखी  वाढेल यात शंकाच नाही  .

या रणधुमाळीत काँग्रेस पक्ष कुठेच नाही कारण  राज्यात या पक्षाचा  कुणी प्रभावी  नेताच नाही आणि पक्षही  विस्कळीत आहे . गेल्या निवडणुकीत काँग्रेसचा एकमेव  उमेदवार विजयी झाला होता ( आणि तो मूळचा शिवसेनेचा होता !) .  या निवडणुकीत दोन जागा आल्या तर यश दोनशे टक्के असेल , तीन उमेदवार विजयी झाले तर यश तीनशे टक्के असेल आणि त्याचं श्रेय राहुल गांधी यांनाच द्यावं लागेल .
एकूण काय तर , लोकसभा निवडणुकीचे महाराष्ट्राचे निकाल ही एक झाकली मूठ आहे . महायुतीला ३० ते ३२ जागा मिळाल्या तर वर उल्लेख केलेल्या सर्व नेत्यांची मूठ झाकलेलीच राहील अन्यथा या सर्वांच्या झाकल्या मुठीची किंमत उघड होईल .

 प्रवीण बर्दापूरकर       

Cellphone  ​+919822055799

praveen.bardapurkar@gmail.com
www.praveenbardapurkar.com

संबंधित पोस्ट