रसिकतेच्या झाडावर विहरणारा पक्षी…

हिल्यांदा भेटायला आला तेव्हा तरुण  सुहास जेवळीकरच्या अंगावर अॅप्रन होता . तेव्हा मी अपरिहार्यपणे नेहरु युवक केंद्राचा ‘अर्ध्याहून अर्धा’ वेळेचा ग्रंथपाल होतो . त्या कामाचे दरमहा ५० रुपये वेतन मिळे . त्यातून माझा दरमहा खानावळीचा दोन्ही वेळच्या जेवणाचा ४५ रुपये खर्च भागत असे , पण ते असो.. नेहरु युवक केंद्रासोबतच औरंगाबाद युथ सेंटरचं कामही मी करत असे . युवक विकासाच्या विविध योजनांसाठी या दोन केंद्रांना केंद्र आणि राज्यांच्या सरकारकडून निधी मिळत असे . त्यावेळी आयोजित केलेल्या एका काव्य स्पर्धेच्या निमित्तानं सुहास जेवळीकर पहिल्यांदा भेटला तेव्हा नजरेत भरला तो त्याचा अॅप्रन , मोत्यासारखं सुवाच्च अक्षर आणि त्यांची लफ्फेदार  स्वाक्षरी  . पुढे या दोन्ही केंद्राच्या अनेक उपक्रमात तो सहभागी झाला आणि त्यानं पारितोषिकही मिळवली . त्यावेळी त्याला अनेकदा  रोख रकमेसह प्रमाणपत्रंही मिळाली . त्या काही प्रमाणपत्रावर सरचिटणीस म्हणूनमाझी स्वाक्षरी असल्याचं आणि ती प्रमाणपत्र जपून ठेवल्याचं सुहासनं एकदा मध्यंतरी मला सांगितलं होतं .

बडबड्या सुहासची माझी मैत्री बहरत गेली ती त्याच्याच वैद्यक महाविद्यालयाच्याच परिसरात  . वैद्यक अभ्यासक्रमात त्याला सिनिअर असलेले रवींद्र जोशी , प्रदीप मुळे , मिलिंद देशपांडे , अविनाश येळीकर  हे माझे मित्र होते . माझा तो खूपच संघर्षाचा काळ होता आणि अडल्या वेळी हे दोस्तयार माझी नड भागवत असत . त्यामुळे वैद्यक महाविद्यालयामधील ओपीडी , रुग्णांचे वॉर्डस , ग्रंथालय , बॉईज होस्टेल या जागा मलाही चांगल्याच परिचित होत्या . वैद्यक महाविद्यालयाचा कॅटिनवाल्या शेट्टीला तर मी वैद्यक महाविद्यालयाचा विद्यार्थी नसल्याचं अनेक दिवस ठाऊकही नव्हतं . वैद्यक शाखेचा विद्यार्थी समजूनच तो माझ्याशी व्यवहार करायचा .

वैद्यक महाविद्यालयाच्या सततच्या चकरामुळे सुहास जेवळीकरशी नियमित भेटीगाठी सुरु झाल्या . पावणे सहा फुटाच्या आसपास  उंची , चापून बसवलेले केस , जाडसर ओठ , भल्या मोठ्या फ्रेमचा चष्मा , किंचित स्थूल शरीरयष्टी असं तो तेव्हा होता . त्यानं बोलायला सुरुवात केल्याशिवाय त्याची छाप समोरच्यावर पडत नसे . सुहास माणूसघाणा नव्हता . माणसांच्या गोतावळ्यात रमणं त्याला मनापासून आवडत असे . समोरच्यानं एकदा बोलणं ऐकलं की तो सुहासच्या प्रेमातच पडत असे . शिवाय मित्र जोडण्याची सुहास जेवळीकरची एक खास शैली होती . सिगरेट-बिडीवाल्यासोबत एखादा झुरका मारत ,  खर्रा-तंबाखूवाल्यासोबत छोटीशी फक्की तोंडात टाकत . चहावाल्यासोबत चहा आणि मंतरलेल्या सोनेरी पाणीवाल्यासोबत चिअर्स करत ; असं सर्वांशी मिसळून जाण्याची सुहासशी खासियत होती . शिवाय तेव्हा तरुण असलेल्या सुहासला पुस्तकं आणि वृत्तपत्र  वाचनाचा अतोनात छंद होता , गाता  येत नसलं तरी गाणं समजण्याचा कान होता , चित्रात रुची  होती आणि  चित्रपटाचा तो शौकीन असल्यानं  समोरच्याशी संवाद साधण्याची त्याला अडचण नव्हतीचं . त्यामुळे पहिल्या पाच-दहा मिनिटातच समोरच्याला त्याचा पूर्वजन्मीचा वगैरे मित्र वाटावा , इतकी नाळ जोडण्यात सुहास पटाईत होता . त्या काळात म्हणजे १९७५मध्ये मी त्याला ‘पाणी’ म्हणत असे . कारण कोणालाही मैत्रीच्या पाण्यात विरघळवून टाकण्यात त्याची हातोटी होती .

पुढे १९७७ च्या उत्तरार्धात मी औरंगाबाद सोडलं आणि तब्बल २१ वर्षांनी पुन्हा औरंगाबादला परतलो . एव्हाना सुहास पूर्ण डॉक्टर आणि औरंगाबादच्याच वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक झालेला होता . एखाद्या यशस्वी शिक्षकाच्या मागे असतो तसा चार-दोन तरी  शिष्यांचा थवा  त्याच्या भोवती भिरभिरतांना दिसे . त्यांची लोकशाहीवादी भूमिकाही ठाम झालेली होती आणि डाव्यांच्या वर्तुळात त्याचा वावर वाढलेला होता . स्वप्रतिमेच्या प्रेमात पडल्यासारखी त्याची देहबोली झालेली होती . सुहास अंगानंही धिप्पाड म्हणता येईल असा चांगला भरलेला आणि एक प्रौढ माणूस दिसू लागला होता . मात्र त्याच्या बोलण्या आणि वागण्यात तरुणपणीचा सुहास डोकावत होता . त्याचं लग्नही झालेलं होतं . सिडकोतल्या त्याच्या घरी नेऊन एकदा त्यानं पत्नी आणि त्याच्या कन्येचीही आवर्जून ओळख करुन दिली .

एव्हाना कवी , ललित लेखक , आरोग्य विषयक स्तंभलेखक , कार्यक्रमाचा निवेदक आणि विद्यार्थी प्रिय प्राध्यापक असं सुहासचं व्यक्तिमत्त्व चहू अंगानं बहरुन आलेलं होतं . अनेक कविता , गाणी , शेर , हकिकती-आठवणी त्याला मुखोद्गत झालेल्या होत्या आणि त्या आधारे एखादी मैफिल ताब्यात घेऊन कशी गाजवावी याचं तंत्र त्याला चांगलचं अवगत झालेलं होतं . औरंगाबादेत राहूनही त्याचा संपर्क महाराष्ट्रभर खूपच विस्तारला गेला होता . बाहेरगावहून औरंगाबादला आलेला कवी , लेखक , कलावंत ,  असा कोणताही पै-पाहुणा सुहासचा पाहुणचार स्वीकारल्याशिवाय त्याच्या गावी परतू शकत नव्हता . थोडक्यात , औरंगाबादच्या सांस्कृतिक विश्वाचं समकालीनांसाठी डॉ . सुहास जेवळीकर हे  ‘ग्राम देऊळ’ झालेलं होतं . तरुण भेटलेला सुहास  जेवळीकर एव्हाना स्वत:च एक गाव झालेला होता .

सुहासचं आणखी एक लक्षात आलेलं वैशिष्ट्यं म्हणजे तो सगळं काही रसिकपणे घेत होता . लेखन असो की श्रवण की कार्यक्रम की अगत्य , त्यात तो स्वत:ला पूर्ण झोकून देत होता . त्यामुळे आनंद आणि नावलौकिकाचं एक गहिरं समाधान त्याला मिळत होतं . ९८ ते मार्च २००३ च्या काळात दोन तीन वेळा त्याचं अगत्य त्याच्या घरी जाऊन घेता आलं . त्याचं घर

ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांच्यासोबत सुहास जेवळीकर

एखाद्या लेखक , कलावंताला शोभेसं अतिशय नेमकं देखणं  होतं . स्वतंत्र बंगला , त्यात त्याची लेखनाची खोली , अत्यंत शिस्तीत लावलेली पुस्तकं , लेखनाच्या टेबलावर एखादं अर्धवट वाचलेलं पुस्तक , कागद , पेन वगैरे जामानिमा , अगदी फोटोवरही व्यवस्थित केलेल्या नोंदी ,  मंतरलेल्या सोनरी पाण्याचा आस्वाद घेण्यासाठी स्वतंत्र बैठक , तिथे संगीताचा खजिना आणि सुहासच्या आग्रही अगत्याला त्याची पत्नी डॉक्टर असलेल्या संध्या हिचा सक्रिय दुजोरा ; असं ते सगळं विदग्ध वातावरण . या सर्वांत टोकाचं झोकून देणं ही सुहासची खासियत तेव्हा मला पहिल्या भेटीत खूप भावली पण , नंतर जसजशा पार्ट्यात भेटी होऊ लागल्या तस-तसं तो असोशीकडे झुकतो आहे का काय ? असं का कोण   जाणे , मला तरी वाटायला लागलं .

सुहास जेवळीकरचं आणखी एक वैशिष्ट्यं म्हणजे त्याला काम सांगावं आणि निर्धास्त व्हावं . गरजूंना मदत करण्याची सुहासची सहृदयता कायम तेवतच असायची . कुणा गरजूला वैद्यक महाविद्यालयात त्याच्याकडे पाठवलं की सुहास सर्व ती काळजी ( प्रसंगी खिशाला खार लावून ) घेतो हे एव्हाना मला ठाऊक झालेलं होतं पण , त्याबद्दल सुहास कधीच काही बोलत नसे . तो गरजू माणूस पुन्हा कधी चुकून आपल्याला भेटलाच तर डॉ. जेवळीकरांनी कशी मदत केली हे आवर्जून सांगत असे . मात्र हेच नेमकं तो डॉ . जेवळीकरांना कळवायला विसरुन गेला असे . अर्थात सुहासला त्याचं कधीच वैषम्य वाटलं नाही . शासकीय वैद्यक सेवेतील त्याचं चारित्र्य अभिमान वाटावा असं स्वच्छ होतं  पण , त्या सेवेतील भ्रष्ट आणि कोडेगपणाबद्दल त्याच्या मनात निर्माण झालेला विषाद बोलतांना जाणवायचा .

सुहास हा रसिकता आणि उत्सुकतेच्या झाडावर विहरणारा पक्षी होता . २००० साली एकदा काहीतरी गप्पा सुरु असताना नागपूर आणि उत्तर भारतात धुळवडीचा दिवस पहाटेपासून संध्याकाळपर्यंत कसा ‘नशा’मय आणि खादाडीनं धूमधडाक्यात भरलेला असतो , याबद्दल मी सांगितलं . त्यावर्षीची औरंगाबादची धुळवड आमच्या घरी सुहासनं  तशीच साजरी करायला लावली . एवढंच नाही तर त्यात डॉ. मिलिंद देशपांडे  , डॉ. अमृत महाजन , डॉ . नंदू सबनीस या मित्रांना आणि त्यांच्या कुटुंबीयांनाही सामील करुन घेतलं . ( त्यानंतर कोणत्याच रंगोत्सवात मी सहभागी झालो नाही . ) दोन चार भेटीनंतर एकदा तरी सुहास त्या धुळवळीची आठवण काढत असे .

बेडरपणा म्हणा का धाडसीपणा हेही सुहासचं आणखी एक वैशिष्ट्यं . विशेषत: डॉक्टर झाल्यावर तर ते ठळकपणे समोर आलं . समोरचा माणूस वय , अनुभव आणि विद्वता या पातळ्यांवर कितीही ज्येष्ठ असला तरी सुहास त्याला बिनधास्तपणे थेट ‘अरे–तुरे’नं  भिडत जातो , असं लक्षात आलं . सुरुवातीला त्याच्या या धाडसाचं  मला कौतुक वाटलं पण , औरंगाबादला स्थायिक झाल्यावर हे धाडस आव आणल्यागत वाटायला लागलं . मात्र , सुहासच्या या आव आणण्याला कोणतेही ‘गैर’ रंग कधीच चिकटलेले नव्हते , हेही तेवढंच खरं ; तो त्याचा आत्मानंद होता . दोन तीन ज्येष्ठांनीही खाजगीत त्या संदर्भात माझ्याकडे सौम्य शब्दात नाराजी व्यक्त केली हे आठवून  एका रात्री डॉ. मिलिंद देशपांडेकडे झालेल्या पार्टीत मी त्याला त्याबद्दल  रागावलोही होतो . माझं हे रागावणं त्यानं कोणत्याही वेगळ्या अर्थानं घेतलं नाही , हेही आवर्जून सांगायला हवं . त्याचा हा मनाचा मोठेपणा माझ्या मनावर चांगलाच ठसा उमटवून गेला .

दिल्ली सोडून औरंगाबादला स्थायिक झाल्यावर शाहू पाटोळेच्या ‘अन्न हे अपूर्ण ब्रह्म’ या पुस्तकाच्या प्रकाशनात सुहास प्रमुख पाहुणा आणि मी अध्यक्ष होतो . भाषण करताना सुहासचं जे दर्शन किमान मला तरी घडलं ते फारसं सुखावह नव्हतं . बोलताना तो अडखळत होता . बोलतांना त्याच्या ओठातून फेस बाहेर येत होता , अंगातही किंचित पण , जाणवण्याइतकी थरथर होती . सुहास त्याच्या रसिकतेच्या सीमा ओलांडून असोशीच्या चक्रव्यूहात शिरल्याचं हे लक्षणं वाटलं . वयाचे इशारे लक्षात न घेता प्रसिद्धीच्या वलयात तो चांगलाच रमलेला असल्याचंही बोलतांना जाणवलं . त्याबद्दल त्याच्या आणि मिलिंद देशपांडेकडे स्पष्टपणे भीती आणि नाराजीही व्यक्त केली पण , बहुधा तोपर्यंत बराच उशीर झाला होता . नंतर बेगम मंगलाच्या प्रदीर्घ आजारपणात मी गुंतून गेलो . सुहासच्या भेटीगाठी खूपच कमी झाल्या नंतर कोरोना आला . डॉ. मिलिंद देशपांडे , डॉ. अविनाश येळीकर आणि अशात जयदेव डोळे कडून सुहासच्या तब्येतीचं वर्तमान समजत होतं . खिळखिळा झालेला त्याचा देह बघण्याची माझी हिंमतच झाली नाही ; मित्रांनी अनेकदा सुचवूनही ती  भेट मी ठरवून टाळत गेलो . रसरशीत , डौलदार आणि बहरात असतांना बघितलेल्या सुहास जेवळीकर नावाच्या झाडाला , पानगळ होताना बघणं शक्यच नव्हतं .

-आणि मग भल्या पहाटे आली ती त्याच्या अपेक्षित मृत्यूची वार्ता . ती आल्यावर कितीतरी वेळ मी सुन्नपणे बसून राहिलो . सुहास तसा वयानं माझ्यापेक्षा धाकटा होता . धाकट्याच्या मृत्यूचे वळ दिसत नाहीत पण , ठसठसत राहतात…

प्रवीण बर्दापूरकर  

Cellphone  +919822055799

www.praveenbardapurkar.com

संबंधित पोस्ट