■■खणखणीत कौतिकराव ठाले-पाटील !

मराठी साहित्य संस्थांच्या व्यवहारातील दिग्गज , रोखठोक कौतिकराव ठाले-पाटील गौरव ग्रंथ लवकरच प्रकाशित होत आहे . चोखंदळ समीक्षक , कोल्हापूरचे प्रा. डॉ . रणधीर शिंदे संपादित त्या ग्रंथासाठी  लिहिलेला हा लेख- 
मनालाच घडाभर तेल जाळायचं म्हटलं तर कौतिकराव ठाले-पाटील यांच्याशी माझी ओळख १९९९ पर्यंत नव्हती . पत्रकारिता करण्यासाठी मी औरंगाबाद सोडलं तेव्हापासून ते मे ९८ पर्यंत माझा मुक्काम प्रामुख्यानं नागपूर आणि मुंबईत राहिला . त्यातच राजकीय आणि विधिमंडळाच्या वृत्तसंकलनात अडकलो . दैनिक ‘लोकसत्ता’मुळे महाराष्ट्रभर फिरस्ती होत होती म्हणून मराठवाड्यातल्या राजकारण्यांशी चांगला संपर्क होता पण , मराठवाड्यातल्या सांस्कृतिक क्षेत्राशी काही मित्र वगळता जवळीकीचा  संवाद नव्हता . मात्र , पुण्या-मुंबईतल्या अनेक साहित्यिकांशी घरोब्याचे संबंध होते . विदर्भाच्या सांस्कृतिक जीवनाशी माझी नाळ पक्की होती . मनोहर म्हैसाळकरांमुळे विदर्भ साहित्य संघाच्या कार्यकारिणीतही होतो . साहित्य संमेलनाध्यक्षांच्या निवडणुका लढवण्यात मनोहर म्हैसाळकर यांच्यामुळे सक्रिय सहभागही असायचा  . नारायण सुर्वे , अरुण साधू , ह. मो. मराठे , मारुती चितमपल्ली  प्रभृतींच्या अध्यक्षपदांच्या निवडणुकीतल्या उलाढालीत होतो त्यामुळे  साहित्य संस्थात  चालणाऱ्या राजकारण आणि कारभारांचे बारकावे चांगले अवगत झाले होते . याच काळात म्हणजेच १९८८ च्या निवडणुकीत मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यवाहपदी कौतिकराव ठाले-पाटील निवडून आले हे माहिती  होतं पण , आमची ओळख नव्हती  . १९८८ ते २०२३ अशी सलग ३५ वर्ष कौतिकरावांची मराठवाडा साहित्य परिषदेतली लखलखीत कारकीर्द आहे . अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं वृत्त संकलन करत असतांना मुंबईचे अच्युत तारी , पुण्याचे म. श्री . दीक्षित , नागपूरचे अ. ल. लिमये आणि नंतर मनोहर म्हैसाळकर असे दिग्गज महाराष्ट्राच्या साहित्य संस्थांच्या कारभारात सर्वार्थानं  ‘कर्ते-धर्ते’  म्हणून प्रदीर्घ काळ होते . त्या नावात कौतिकराव ठाले-पाटील यांच्या नावाचा नंतर समावेश झाला .

अचानक एक दिवस , औरंगाबाद ब्युरोला जायला आवडेल का ?  कारण मराठवाड्यात भविष्यातल्या पूर्णवेळ आवृत्तीसाठीही नेटवर्क तयार करायचं आहे , असं विचारलं गेलं . मुंबईत मी एकटाच राहत होतो . पत्नी आणि कन्या सोबत नसल्यानं तसाही मुंबईला कंटाळलेलो होतो .  त्या दोघींना नागपूरहून औरंगाबादला शिफ्ट करणं सोयीचंही होतं . शिवाय ब्यूरोच्या प्रमुखपदाचं आकर्षण होतं . सर्व औपचारिकता पार पाडून १० मे ९८ ला मी पुन्हा एकदा म्हणजे जवळजवळ साडे एकवीस वर्षानंतर औरंगाबादला पडाव टाकला . नागपूर आणि मुंबईच्या तुलनेत औरंगाबादला धावपळ मुळीच नव्हती . गोवेकरांच्या भाषेत सांगायचं तर ‘सुशेगात’ जगणं सुरु होतं . एक दिवस मंगेश पाडगावकरांच्या कार्यक्रमाची बातमी वाचली आणि श्याम देशपांडे सोबत मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यालयात जाणं झालं . त्यावेळी कौतिकराव ठाले पाटील यांची पहिल्यांदा प्रत्यक्ष भेट झाली . लक्षात राहिलं ते त्यांचं खणखणीत आवाजातलं बोलणं . नंतर मसापतल्या कार्यक्रमांना नियमित जाऊ लागलो . त्याचं एक कारण बाहेरुन येणाऱ्या कलावंतांच्या गाठीभेटी होतं . त्यापैकी अनेकांच्या गाठीभेटीत तर अनेक वर्षांचा खंड पडलेला असे ; मग त्यापैकी अनेकांशी मंतरलेल्या सोनरी पाण्यासोबत मैफिल रंगे . विस्मरणात गेलेलं कथालेखन , स्केचेस काढणं वगैरे पक्षी आठवणींच्या झरोक्यातून डोकावत . पण ते असो . महत्वाचं म्हणजे , या काळात कौतिकरावांशी भेटीगाठी वाढल्या . आ . कृ . वाघमारे जन्मशताब्दी  वर्षात एका व्याख्यानासाठीही त्यांनी मला आमंत्रित केलं . एव्हाना साहित्य संस्थांतल्या राजकारणातल्या माझ्या ‘उठाठेवी’ कौतिकराव पाटलांना चांगल्याच ज्ञात झाल्या . त्यातून एकमेकांशी या संदर्भातल्या खाजगीतल्या बाबींची देवाणघेवाण होऊ लागली .

साधारण साडेपाच फुटावर उंची , किंचित टक्कल , डोईवरचे केस ना सर्व  कुरळे ना सरळ असे काही पण , चापून चोपून बसवलेले . साधासा पूर्ण बाह्यांचा  बुशशर्ट आणि पँट असा कौतिकराव ठाले नावाच्या या माणसाचा एकंदरीत थाट होता . अतिशय गरिबीतून ते पुढे आले , मराठीचे प्राध्यापक आहेत , प्रदीर्घ काळ प्राचार्य होते , विद्यापीठाचं कुलगुरुपदही प्रभारी म्हणून कांही काळ भूषवलेलं आहे , मराठवाड्यातल्या सर्वात मोठ्या मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदाचा कारभारही त्यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सांभाळलेला आहे , अशी बरीच माहिती मग मिळत गेली . पण , या माहितीत मला फार काही रस असण्याचा प्रश्नच नव्हता . अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या राजकारणात आणि राज्याच्या साहित्य व्यवहारात एव्हाना मराठवाडा साहित्य परिषद म्हणजेच कौतिकराव ठाले पाटील एक निर्णायक  ‘मोहरे’ झालेले होते , हे एक पत्रकार म्हणून माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं होतं . मी पत्रकारितेत आलो तेव्हा सुरुवातीला अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा अध्यक्ष ठरवण्यात प्रकाशकाची भूमिका कळीची असे . नंतर ही सर्व सूत्रं ‘लोकसत्ता’ आणि  ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या संपादकांकडे आली तरी अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर मुंबई-पुण्याचीच पकड कायम होती . पकड कसली , अध्यक्षपदी कोण हे पुणे-मुंबईकरच ठरवत असत . विदर्भातून मनोहर म्हैसाळकर आणि मराठवाड्यातून कौतिकराव ठाले पाटील यांनी मुंबई-पुणेकरांचं हे वर्चस्व संपुष्टात आणलं .  महत्त्वाचं म्हणजे म्हैसाळकर आणि ठाले पाटील या दोघांशीही माझे चांगले संबंध निर्माण झाले तरी साहित्य संस्थांच्या राजकारणात माझी ओळख मात्र मनोहर म्हैसाळकर यांच्या गोटातला माणूस अशीच राहिली .  यातला विरोधाभास म्हणजे दोघांचा समान मित्र असूनही मनोहर म्हैसाळकर आणि कौतिकराव  ठाले-पाटील या दोघांत का कोण जाणे बऱ्यापैकी तीव्र मतभेद होते .

कौतिकराव पाटील बोलण्यानं स्पष्टवक्ते आणि स्वभावानं खमके . कुणालाही शिंगावर घ्यायला न घाबरण्याचा दुर्मीळ गुण त्यांच्यात होता . याचा अर्थ मनाला येईल ते बोलून ते मोकळे होणार असं मुळीच नाही . जे काही बोलायचं त्याबद्दल ते आधी नक्कीच दुसऱ्या बाजूचा विचार बारकाईनं करत असणार , असं माझं निरीक्षण आहे . असं दोन्ही बाजूंनी विचार करुन येणारा खमकेपणा ठाम असतो . सहसा त्यात माघार नसते . कुणी अंगावर आलं तर शिंगावर घेण्याची तयारीही असते . याचं आणखी एक कारण म्हणजे संस्थात्मक कारभारात कुठले वैयक्तिक हेतू किंवा आर्थिक लाभ अशा व्यक्तीच्या मनालाही शिवलेले नसतात ; आर्थिक चारित्र्याच्या बाबतीत त्यांचं नाणं खणखणीत असतं .  त्यामुळे असा खमका माणूस एकाच वेळी अंगावर चार तर सोडाच चाळीसही धावून आले तरी त्यांना शिंगावर घ्यायला डगमगत नाही . अशी माणसं जिजीविषा ( Survial Instinct ) वृत्तीची असतात .  कौतिकराव पाटील नेमके याच वृत्तीचे म्हणजे इंग्रजीत त्यासाठी एक चपखल शब्द आहे , कौतिकराव  undeterred  आहेत . साहित्यविषयक व्यासपीठावरुन सत्ताधाऱ्यांशीही पंगा घेताना कौतिकराव न डगमगल्याचे दाखले आहेत .  साहित्य क्षेत्रातील राजकारणाच्या दालनात कुठला पत्ता किती वेळ दाबून ठेवायचा आणि केव्हा उघड करायचा याचं त्यांचं टाइमिंग अचूक आहे . या सर्व गुणांमुळेच गेली सलग ३५ वर्षे ते मसापत जबाबदारीच्या पदावर उजळपणानं टिकून राहिले आणि महाराष्ट्राच्या साहित्य संस्थांच्या राजकारणात कौतिकराव ठाले-पाटील एक चलनी नाणं झालं .

कौतिकराव ठाले-पाटील आणि मनोहर म्हैसाळकर यांच्यातली जुगलबंदी खूपच गाजली . ‘लोकसत्ता’नं ती जास्तच गाजवली . त्यात आमचा प्रतिनिधी संदीप देशपांडे  याच्या शैलीदार तिरकस लेखनीचा वाटा मोठा होता . ठाले आणि म्हैसाळकर यांच्यातील ‘धुम्मस’ संदीपनं सांगितली तेव्हा मी ‘लोकसत्ता’च्या नागपूर आवृत्तीचा संपादक होतो . दोघांच्याही बाजू नीट यायला पाहिजे , हे संदीपला बजावलं . त्याचा काही कौतिकराव ठाले यांच्याशी थेट संपर्क नव्हता . मी  तो घडवून आणला . ‘तुम्हा दोघातला कलगीतुरा आम्ही रंगवणार आहोत , संदीपशी मोकळेपणांनं बोलता जा , इकडचा शब्द तिकडं होणार नाही’ , ही ग्वाही मी कौतिकरावांना मी दिली . इथे उल्लेखनीय म्हणजे मनोहर म्हैसाळकरांच्या गटातला असूनही माझ्यावर कौतिकरांवानी अविश्वास दाखवला नाही . कौतिकरावांनी भात्यातला एखादा बाण काढावा आणि मनोहर म्हैसाळकरांनी उत्तर द्यावं , असा तो कलगीतुरा बराच रंगला . ( त्या  प्रकरणात  म्हैसाळकरांनी काही आर्थिक लाभ घेतले असतील यावर माझा विश्वास अजूनही नाही पण ,  ते असो . )

नेमक्या याच काळात विश्व मराठी साहित्य संमेलनाची कल्पना साहित्य महामंडळाचे अध्यक्ष म्हणून कौतिकरावांनी मांडली . विदर्भ साहित्य संघाच्या महामंडळावरील प्रतिनिधींनी त्या कल्पनेला ठाम विरोध दर्शवला . त्या विरोधाचं नेतृत्व माझा प्रिय मित्र श्रीपाद भालचंद्र जोशी याच्याकडे तर सूत्रधार अर्थातच मनोहर म्हैसाळकर होते . मी उघडपणे विश्व

हात्मा गांधी मिशनचा २०२२चा “महात्मा गांधी मराठवाडा भूषण सन्मान” ज्येष्ठतम समीक्षक डॉ . सुधीर रसाळ यांच्या हस्ते स्वीकारताना कौतिकराव ठाले-पाटील . शेजारी महात्मा  गांधी मिशनचे सचिव अंकुशराव कदम , स्वातंत्र्य सैनिक ताराबाई लड्डा आणि ज्येष्ठ कवयित्री अनुराधा पाटील .

मराठी साहित्य संमेलनाच्या बाजूने भूमिका घेतली . त्यामुळे कौतिकराव आणि माझ्यातील मैत्रीचा घरोबा आणखी उबदार झाला . या वादात टोकाची भूमिका घेत विदर्भ साहित्य संघानं अमेरिकेतल्या सॅनहोजे  ( San Jose ) येथे होणाऱ्या पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनावर बहिष्कार टाकला . साहित्य संघाचा कुणीही सदस्य त्या संमेलनात सहभागी होणार नाही असं जाहीर करुन टाकलं . एक दिवस कौतिकरावांनी फोनवर बोलतांना ‘सॅन होजेच्या साहित्य संमेलनात प्रमुख वक्ते म्हणून येणार का’ अशी पृच्छा केली आणि मी तत्काळ होकार दर्शवला . एवढंच नाहीतर विदर्भ साहित्य संघाच्या व्यासपीठावर जाऊन या संमेलनात मी सहभागी होत असल्याचं जाहीर करुन टाकलं आणि  इकडे साहित्य संमेलनाला येईल पण ,काही उणंदुणं वाटलं तर टीका करण्याचा पत्रकार म्हणून असलेला माझा अधिकार कायम राहील , हे कौतिकरावांनाही सांगून टाकलं . या सर्वच संदर्भात कौतिकराव ठाले-पाटील यांनी एका मुलाखतीत विस्तृतपणे प्रतिपादन केलेलं आहे . ते जिज्ञासूंनी नक्की ऐकावं . एक मात्र मान्य करायलाच हवं विदर्भ साहित्य संघ आणि माध्यमांनी टीका करुनही कौतिकराव मुळीच डगमगले नाहीत . अखिल भारतीय साहित्य महामंडळाचा अधिकृत उपक्रम म्हणून त्यांनी विश्व साहित्य संमेलनं पुढेही घेतली .

साधारण ८० च्या दशकापासून मराठी साहित्यातील ‘साडेतीन टक्क्यां’च्या  चिरेबंदी मिरासदरीला तडे जाण्यास सुरुवात झाली . मराठी साहित्याच्या मुख्य प्रवाहाला  साडे तीन टक्के संस्कृतीच्या मगरमिठीतून मुक्त करत दलित आणि ग्रामीण साहित्यानं   एक सशक्त वेगळा प्रवाह  निर्माण केला ; त्यामुळे मराठी  साहित्याला एक वेगळं परिमाण लाभलं , वास्तवाचं तीक्ष्ण भान आलं  . प्रस्थापित मराठी साहित्याला हे आव्हान पचवणं जरा कठीणच गेलं पण ,  साहित्याचा प्रवाह तर त्यामुळे अधिक व्यापक आणि खळाळता झाला यात शंकाच नाही . त्यातून विद्रोहाचे टणत्कार ऐकू येऊ लागले तरीही साहित्य संस्था मात्र साडेतीन टक्क्यांच्याच हाती होत्या . साहित्य संस्थांवरील ही पकड कौतिकराव ठाले पाटील यांनी मराठवाड्यात तर मनोहर म्हैसाळकर यांनी विदर्भात मोकळी केली . ‘साडेतीन टक्क्यां’च्या  बाहेर असणाऱ्या मराठी साहित्यात नवं काही लिहिणाऱ्या , विद्रोह करणाऱ्यांना साहित्य संस्थांचे दरवाजे खुले करणं हे कौतिकराव ठाले पाटील यांचं योगदान कधीही विसरता न येण्यासारखं आहे . ब्राह्मणी वर्चस्वातून साहित्य संस्थांचा व्यवहार त्यांनी सोडवला आणि सर्वसमावेशक केला . गावोगाव साहित्य संस्थांच्या शाखा उघडल्या आणि त्या शाखांतही नवे सर्व  जाती धर्माचे  लेखक सामावून घेतले . मराठवाडा लेखिका संमेलन हा उपक्रम सुरु करुन मराठवाड्यातील कवियत्री आणि लेखिकांना एक महत्त्वाचं व्यासपीठ कौतिकरावांनी मिळवून दिलं . महात्मा गांधी मिशन या संस्थेनं ‘महात्मा गांधी मराठवाडा भूषण’ या सन्मान देतांना कौतिकराव ठाले पाटील यांचं हेच योगदान गृहीत धरलं . कौतिकराव पाटील उक्तीनं रांगडे वाटू शकतील पण , कृतीनं मात्र एक चतुर संघटक आणि अव्यभिचारी , डोहखोल  तळमळीचे  साहित्यप्रेमी आहेत . त्यांचा स्पष्टवक्तेपणा नक्षीदार आहे आणि नेमका त्यांचा हाच गुण आमच्यातला समान दुवा आहे .

कौतिकराव ठाले-पाटील यांना मी दीर्घायुरोग्य चिंततो .

प्रवीण बर्दापूरकर

Cellphone  +919822055799

www.praveenbardapurkar.com
blog.praveenbardapurkar.com

संबंधित पोस्ट