…ओन्ली शरद पवार !

भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेने येत्या विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याची जय्यत तयारी केलेली असतांना  शरद पवार यांचा अपवाद वगळता इकडे विरोधी पक्ष मात्र लोकसभा निवडणुकीच्या पराभवातून सावरल्याचे चित्र नाही. प्रकृती ठीक नसतांना आणि याही वयात शरद यांच्यात राजकारण करण्याची असणारी उर्मी व सतत भटकंती करण्याची त्यांच्यात असणारी उर्जा विस्मयचकीत करणारी आहे . एखादी घटना म्हणा की कोणाचाही प्रतिवाद करायचा असेल तर एखादा  व्हिडीओ करुन समाज माध्यमांत प्रतिक्रीया  अपलोड करावी किंवा एखादा ई-मेल माध्यमांना पाठवून दिला, की विरोधी  म्हणा की सत्ताधारी पक्षाच्या नेत्याची सामाजिक बांधिलकी संपली असल्याच्या सध्याच्या जमान्यातही शरद पवार पायाला भिंगरी लावल्यासारखे फिरत असतात, लोकांना भेटत असतात , त्यांच्याशी बोलत असतात आणि सत्ताधाऱ्याना  धारेवर धरत असतात.

लोकसभा निवडणुकीतील पराभवाने निराश न होता ( किंवा पराभवाचे ते नैराश्य चेहेऱ्यावर न दखवता ) शरद पवार लगेच दुष्काळग्रस्तांच्या सांत्वनासाठी धावले ; चिपळूण तालुक्यात तिवरे धरण फुटून बेघर झालेल्या आपद्ग्रस्तांना भेटायला जाणारे शरद पवार हेच राज्यातले एकमेव ज्येष्ठ नेते होते . भेटायला गेलेल्या लोकांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेण्याची त्यांची चिकाटी अजूनही कायम आहे . तरुणांच्या बैठकीत तर तर साडे-तीन चार तास एकाच जागी बसून त्यांचे म्हणणे ऐकून घेणारे शरद पवार हे कदाचित राज्यातील एकमेव नेते असावेत .

देशाप्रमाणेच कॉंग्रेसची राज्यातील अवस्था अत्यंत वाईट्ट आहे . ( अशा वेळी विलासराव देशमुख यांची उणीव कटाक्षाने जाणवते. ) लोकसभा निवडणुकीत राज्यातून विजयी झालेले कॉंग्रेसचे बाळू धानोरकर हे एकमेव खासदार मुळचे शिवसेनेचे आहेत आणि त्यांनी केवळ लोकसभा निवडणूक लढवायला मिळावी म्हणूनच सेनेचा त्याग करत असून माझ्या निष्ठा उद्धव ठाकरे यांच्याप्रती कायम राहतील असे सांगितले होते. विधानसभेतील विरोधी पक्ष नेतेपदही कॉंग्रेसने शिवसेनेतून आलेल्या आणि नारायण राणे यांच्याप्रती निष्ठा असणाऱ्या  विजय वडेट्टीवार यांना दिले आहे . शिवाय या दोन्ही नेत्यांचा आवाकाही राज्यस्तरीय नाही. म्हणजेच , या दोघांकडून कॉंग्रेसला फार कांही संजीवनी मिळण्याची अपेक्षा बाळगणे व्यर्थच आहे .

माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे हे एक आश्वासक नाव कॉंग्रेसकडे नक्कीच होतं आणि आणि आहेही पण , लोकसभा निवडणुकीतील दोन सलग पराभव पदरी असल्याने शिंदे यांचे नाव कांही प्रदेशाध्यक्ष म्हणून पुढे आणण्याचे धाडस कॉंग्रेसला झाले नसावे .  खरे तर , पक्ष महाराष्ट्रात पुन्हा उभा करण्याचे कठीण आव्हान सुशीलकुमार शिंदे यांनी स्वत: पुढे येऊन स्वीकारायला हवे होते पण , प्रदीर्घ काळ दिल्लीच्या राजकारणात वावरल्याने शिंदे यांनाही राज्यात परतण्यात फारसे स्वारस्य नसावे आणि राज्याचा अध्यक्ष किती पांगळा असतो हे दिल्लीत राहून चांगले ठाऊक असल्यानेही ( फार दगदग न करण्याचा त्यांचा एकूण स्वभाव लक्षात घेता ) सुशीलकुमार शिंदे यांनी त्यात फारशी रुची दाखवली नसावी , असेही  म्हणायला जागा आहे  .

पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण हे आणखी कॉंग्रेसचे दोन माजी मुख्यमंत्री महाराष्ट्रात आहेत . प्रशासक म्हणून पृथ्वीराज चव्हाण चांगले आहेत , वाचतात आणि लोकांशी चांगले वागतात वगैरे म्हणजे सुसंस्कृत आहेत पण, मुख्यमंत्रीपद मिळाले तरी राज्याचे नेतृत्व चालून येत नाहीत . त्यासाठी २४ तास राजकारण करावे लागते , लोकसंपर्क अफाट असावाच लागतो आणि ऐकून घेण्याची क्षमता मोठी लागते . या गुणांचा अभाव असल्याने मुख्यमंत्री म्हणून शरद पवार आणि राष्ट्रवादीला वेसण घालण्यावर जास्तच लक्ष  दिल्याने आणि पुणे मुंबईच्या बाहेर नियमित वावर न ठेवल्याने पृथ्वीराज चव्हाण यांच्या राज्यस्तरीय नेतृत्वावर मर्यादा आल्या आहेत . शंकरराव चव्हाण यांची मोठी पुण्याई पाठिशी असूनही अशोक चव्हाण यांचे नेतृत्व राज्यभर पसरु शकले नाही . अशोक चव्हाण यांनी सुरुवात तर चांगली केलेली होती पण , नेतृत्वाची मुळे राज्यभर पसरण्याच्या नेमक्या काळातच ‘आदर्श’ पाठोपाठ ‘पेड न्यूज’ कांड घडले आणि अशोक चव्हाण कोर्टाच्या चक्रात अडकले ; ‘सुशेगात’ राहण्याचा ; म्हणजे अंगाला फार कांही लावून न घेण्याचा स्वभावही आड आला असावा असेही म्हणता येईल . आता तर अशोक चव्हाण नांदेड जिल्ह्यापुरते उरले आहेत .

या पार्श्वभूमीवर बाळासाहेब थोरात यांच्याकडे महाराष्ट्र कॉंग्रेसची सूत्रे आलेली आहेत . बाळासाहेब थोरात मितभाषी , शांत आणि संयमी आहेत. त्यांच्या नावे कोणताही वाद जमा नाही. विखे कुटुंबाशी असणारे राजकीय वैर वगळता त्यांचे पक्षात किंवा पक्षाबाहेरही  दुष्मनही फारसे नाहीत , शिवाय ते सुसंस्कृत आहेत . ( तीन वर्षापूर्वी आमची पहिली भेट संगमनेरला झाली. तेव्हा त्यांनी ‘तुमचं ग्रेस नावाचं गारुड’ हे पुस्तक कांही मला मिळालं नाही अशी खंत व्यक्त करतांनाच ग्रेस यांची ‘तुला पहिले मी नदीच्या किनारी…’ ही कविताही  म्हणून दाखवली होती ! ) पण , प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करतांनाच पक्षश्रेष्ठीनी पाच कार्यकारी अध्यक्ष देऊन बाळासाहेब थोरात यांचे पंख बांधून ठेवलेले आहेत . आधीच कॉंग्रेसमधे अनेक बेरके आणि बिलंदर नेते आणि कार्यकर्ते बहुसंख्येने आहेत.  त्यांचे    गट-उपगट-उपउपगट आहेत. त्यांच्यात इर्षा आणि महत्त्वाकांक्षा आहेत आणि सर्वात महत्वाचे  म्हणजे सततच्या पराभवाने कॉंग्रेसला प्रचंड मरगळ आलेली आहे ; त्यातच एका कार्यकारी अध्यक्षासह कांही आमदार भाजपच्या वाटेवर असल्याची वदंता आहे . या सर्वावर बाळासाहेब थोरात कशी मात करणार , कॉंग्रेसला नवसंजीवनी कधी देणार  आणि  निवडणुकीच्या रिंगणात लढवण्यासाठी तयार आणि सक्षम कधी करणार हे एक न उलगडणारे कोडेच आहे .

तिकडे राष्ट्रवादीच्या  गोटातही फारसा कांही उत्साह नाही .  नेतृत्व म्हणून या पक्षातही एकुणातच आनंदीआनंद आहे . स्वत:शिवाय नेतृत्वाची दुसरी फळी उभारण्यात शरद पवार यशस्वी ठरलेले नाहीत असे म्हणण्यापेक्षा शरद पवार यांनी ती तयार होऊ देण्यात मनापासून स्वारस्य दाखवले नाही , असे जे म्हटले जाते त्यात तथ्य असल्याचे दिसते . वारसदार म्हणून राज्यात त्यांनी ना ठामपणे कधी कन्येला समोर केले किंवा पुतण्याला नेतृत्वासाठी स्पष्ट उत्तेजन दिले ना कधी आर.आर. पाटील , जयंत पाटील किंवा अन्य कुणाला पुरेशी ताकद आणि निर्णय स्वातंत्र्य  दिले .

छगन भुजबळ , सुनील तटकरे आणि अजित पवार यांच्या कारभाराच्या चौकशीच्या आदेशांवर तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी शरद पवार यांना अंधारात ठेवून स्वाक्षऱ्या स्वबळावर केल्या असतील यावर कोण विश्वास ठेवेल ? शरद पवार पवार यांनी पक्षातल्या कांही नेत्यांना कधी महत्व दिले आणि नंतर त्यांचे महत्व अनाकलनीयपणे कमीही केले ; या विधानाच्या पुष्ठ्यर्थ पदमसिंह पाटील , कमलकिशोर कदम , दत्ता मेघे ,  डॉ. माधव किन्हाळकर , बबनराव पाचपुते , दिग्विजय खानविलकर , लक्ष्मणराव ढोबळे आणि सूर्यकांता पाटील , अशी अलिकडच्या काळातील अनेकांची नावे देता येतील.  राष्ट्रवादी  कॉंग्रेस हा पक्ष कायमच शरद पवार नावाचा  एकखांबी तंबू राहिला .  त्यातच एक विधानसभा आणि दोन लोकसभा निवडणुकीत झालेल्या सलग पराभवामुळे पक्षात आलेली मरगळ कार्यकर्त्यांच्या बोलण्यात जाणवते  .

हे त्रांगडं इथेच संपत नाही , ही शृंखला लांब आहे . कॉंग्रेस काय किंवा राष्ट्रवादी  काय स्वबळावर सर्व २८८ जागा लढवू शकत नाही . प्रकाश आंबेडकर आणि ओवेसी यांच्या  बहुजन वंचित आघाडीने या दोन्ही कॉंग्रेसच्या मतांवर हक्क सांगितलेला असल्याचे लोकसभा निवडणुकीच्या निकालातून स्पष्ट झालेले आहे . कॉंग्रेसची इच्छा वंचित आघाडी सोबत जाण्याची आहे पण , प्रकाश आंबेडकर यांना शरद पवार चालत नाहीत . प्रकाश आंबेडकर अधून-मधून नियमितपणे शरद पवार यांच्यावर तोफा डागत असतात ;  शरद पवार मात्र सौजन्य म्हणा की धोरण म्हणून प्रकाश आंबेडकर यांचा प्रतिवाद करत नाहीत  . कॉंग्रेसला प्रकाश आंबेडकर चालतात पण ओवेसी नको आहेत . राष्ट्रवादीच्या मनात राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी आघाडी करण्याची मनीषा असल्याची चर्चा आहे ( त्यात तथ्य नसावेच असेही नाही ) पण , कॉंग्रेसला राज ठाकरे यांचे स्वाभाविक वावडे आहे . प्रकाश आंबेडकर यांनी समान पातळीवर आघाडी करण्याऐवजी कॉंग्रेसला केवळ चाळीस जागांचा तुकडा टाकला आहे. विरोधी पक्षातील त्रांगड्याचे असे अनेक पैलू आहेत  .

मोठी राजकीय क्षमता आणि झेप घेण्याची उर्मी असूनही राज ठाकरे हे एक राजकीय कोडे  बनलेले आहे , ही या त्रांगड्याची आणखी एक बाजू आहे . राज ठाकरे  स्पष्टवक्ते आहेत असे म्हटले जाते पण , त्यांच्यात सातत्य का नाही याबद्दल ते कांहीच बोलत नाहीत . निवडणुकीत एकही उमेदवार न उतरवता त्यांनी भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्या विरोधात तुफानी प्रचार केला पण , कुणालाच पाठिंबा न देण्याच जागतिक कीर्तीचा अचाटपणा का केला आणि पक्षाचे नुकसान  का करुन घेतले  हेही एक कोडेच आहे . ‘दाखव रे तो व्हिडीओ’ या त्यांच्या गाजलेल्या  मोहिमेची भाजपने कथित पोलखोल केली पण, भाजपचे ते म्हणणे खरे की खोटे याबद्दल  राज यांनी मौनच बाळगले . लोकसभा निवडणुकीतील या मोहिमेचा त्यांना विधानसभा निवडणुकीत फायदा होणार की तोटा हे पाहणे उत्सुकतेचे आहे . लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरे एवढे मौनात का गेले हेही एक कोडेच  आहे . या सर्व कोड्यांची उत्तरं राज यांच्याकडेच आहेत पण , ते त्यावर कांहीही बोलत नाही हेही नेहेमीप्रमाणे कोडे आहे !

एका निर्णायक टप्प्यावर असलेली राज्याची राजकीय परिस्थिती लक्षात घेतली तर विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्षांचे राजकारण शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर या दोघाभोवती फिरु शकते . पण, सर्वांना बरोबर घेऊन चालण्याची क्षमता प्रकाश आंबेडकर यांच्यात नाही , हे स्पष्टच आहे . प्रकाश आंबेडकर आणि  राज ठाकरे यांना वगळून किंवा त्यांना सोबत घेतल्यावर राज्यात भाजप-सेनेला समर्थ पर्याय उभा करण्याचा राजकीय आवाका व  क्षमता , उर्मी आणि प्रतिमा केवळ  शरद पवार यांच्यातच आहे ; अशी अस्थिर परिस्थिती हाताळण्यात ते वाकबगार आहेत , याबद्दल दुमत असण्याचे कारणच नाही . थोडक्यात काय तर ,  १९८०च्या दशकात गाजलेल्या एका जाहिरातीतील  ‘ओन्ली विमल’ या ‘कॅच लाईन’ प्रमाणे सध्या तरी महाराष्ट्रात  सेना-भाजपच्या  विरोधात ‘ओन्ली शरद पवार’ अशी स्थिती आहे !

सर्व मतभेद बाजूला ठेवून सर्व विरोधी पक्ष शरद पवार यांचे नेतृत्व एकमुखाने मान्य करुन आगामी विधानसभा निवडणूक एकजुटीने लढवतात का , या प्रश्नाचे उत्तर आज तरी मिळण्याची  शक्यता धुसरच दिसते आहे कारण प्रत्यक्ष रणधुमाळी अजून सुरु व्हायची       आहे . म्हणूनच लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या आधारे विधानसभेच्या २३० ते २४० जागा जिंकण्याच्या वल्गना भाजपकडून सुरु आहेत . विरोधी पक्षात एकी झाली नाही तर २८८ पैकी ३८८ जागा मिळण्याचीही  स्वप्ने भाजप-सेना युतीला पडू शकतात कारण , मुंगेरीलालच्या स्वप्नांना आपण कसे काय रोखू शकतो ?

-प्रवीण बर्दापूरकर

Cellphone  ​+919822055799 
www.praveenbardapurkar.com

संबंधित पोस्ट