राहुल गांधींच्या पदयात्रेच्या तरंगांच्या लाटा होतील का ?

शेकडोंची गळाभेट , हजारोंना सोबतीला घेत आणि लाखो लोकांचे लक्ष वेधून घेणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांची पदयात्रा उद्या , ७ नोव्हेंबरला महाराष्ट्रात प्रवेश करत आहे . १५० दिवस चालणारी ही पदयात्रा बारा राज्यातून जाणार आहे आणि ३५७० किलोमीटरचा प्रवास राहुल गांधी पायी करणार आहेत . ७ सप्टेंबरला सुरु झालेली ही ‘भारत जोडो’ पदयात्रा बरोब्बर दोन महिन्यांनी महाराष्ट्रात प्रवेश करेल तेव्हा गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकांचे बिगूल वाजवले गेलेलं आहे . गेल्या सुमारे ६० दिवसांत राहुल गांधी सुमारे १३०० कि  मी. पायी चालले आहेत आणि हा परावास अजून संपलेला नाही . हे सोपं काम नाही . त्यासाठी विलक्षण जिद्द , संयम , राजकीय तळमळ व अव्यभिचारी निष्ठा , शारीरिक क्षमता  लागते आणि ते सर्व या निमित्ताने राहुल गांधी यांनी सिद्ध केलेलं आहे . त्यामुळेच या पदयात्रेनं देशाच्या राजकीय वातावरणात बदलाचे तरंग उठत आहेत त्या  तरंगांच्या लवकरच लाटा होतील .

राहुल गांधी चालत आहेत…टाकलेल्या  प्रत्येक पाऊलानंतर राहुल गांधी यांची लोकप्रियता नि:संशय वाढत आहे . समाज माध्यमावर या पदयात्रेच्या अनेक कथा प्रकाशित होत आहेत . मुख्य माध्यमं मात्र त्याबद्दल चोरटेपणानी बातम्या प्रकाशित करत आहेत . नि:ष्पक्ष म्हणवणारी , कायम काँग्रेसच्या वळचणीला पडणारी , प्रस्थापितांच्या विरुद्ध संघर्षाचा आवाज उठवण्याचा दावा करणारी , स्वत:ला विवेकी म्हणवणारी अशा विविध पठडीतली ही मुख्य प्रवाहातील माध्यमं आहेत . यापैकी कुणालाही राहुल गांधी यांच्या पदयात्रेला ठळक बातमीचं स्थान द्यावं  वाटत नाही . ही कुणाची तरी दहशत आहे म्हणायचं का ,  ही माध्यमं कुणाच्या तरी दावणीला बांधली गेली आहे म्हणायचं , हे ज्याचं त्यानं त्याच्या आकलनाप्रमाणं ठरवावं . मात्र , गेल्या सुमारे दोन महिन्यात ही यात्रा एक मोठा कारवा बनलेली आहे हे वास्तव कुणालाच नाकारता येणार नाही . बाय द वे , मी काँग्रेसचा सदस्य नाही , समर्थकही नाही ;  अनेकदा काँग्रेसनं कठोर टीका करणारा एक पत्रकार आहे . Sciatica च्या त्रासाने त्रस्त नसतो तर एक पत्रकार म्हणून वयाच्या सत्तरीच्या उंबरठ्यावर असूनही या यात्रेत मी ( व्यवस्थापनाचा विरोध झुगारुन ) सहभागी झालो असतो  आणि माझ्या वाचकांपर्यंत तो वृतान्त नक्कीच पोहोचवला असता कारण या पदयात्रेला एक वृत्तमूल्यही आहे पण , ते असो .

राहुल गांधी यांच्या पदयात्रेमुळे काँग्रेस पक्षाला संजीवनी प्राप्त झाली असं म्हणणं आजच योग्य ठरणार नाही मात्र , निश्चेष्ट पडलेल्या या पक्षात चेतना जागवली गेल्याचं अनुभवायला मिळत आहे . महत्त्वाचं म्हणजे ही यात्रा ज्या मार्गावरुन आतापर्यंत चालली तिथे तरुणांचा भरभक्कम आणि व्यापक प्रतिसाद मिळाला आहे . अनेकदा शेकडो तर अनेकदा हजारो स्थानिक तरुण या पदयात्रेत सहभागी होतं असल्याचं दृष्टीस पडत आहे . शिवाय काँग्रेसपासून विविध कारणाने दुरावलेले राजकीय पक्ष आणि अराजकीय संस्था-संघटना या पदयात्रेशी जोडल्या गेल्याचं दिसून आलं . याचा एक अर्थ दुरावलेल्यांना जवळ करण्याचं कामही राहुल गांधी यांची पदयात्रा करत आहे . या पदयात्रेला पाठिंबा देणाऱ्या संस्था, संघटना किती जनाधार असलेल्या आहेत , याच्या तपशिलात जाण्याचा वावदूकपणा करण्याचं काहीच कारण नाही . कारण एक एक काडी जोडूनच शेवटी मोळी तयार होत जाते हे विसरता येणार नाही .

या पदयात्रेच्या निमित्तानं राहुल गांधी सरळ मार्गी आहेत . मितभाषीच आहेत , बेरके नाहीत अशा समाज माध्यमात प्रकाशित होणाऱ्या मजकुराकडे फार गंभीरपणे बघण्याची मुळीच गरज नाही . एक राजकारणी म्हणून राहुल गांधी यांना २०१४ पर्यंत पुरेसं गांभीर्य नव्हतं . स्पष्टच सांगायचं तर काहीसा बालीशपणाही असल्याचं तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा जाहीररित्या पाणउतारा करुन राहुल गांधी यांनी सिद्धच केलं होतं . तेव्हापासून आतापर्यंत शहजादा , पप्पू , मम्माज् बॉय अशा शेलक्या शब्दांत राहुल गांधी यांच्यावर टीका झालेली आहे . ही पदयात्रा सुरु झाल्यावर राहुल गांधी यांची प्रतिमा एकेकाळी कशी ड्रगिंस्ट व खुशालचेंडू होती याबद्दल व्हॉटसअप विद्यापीठात पोस्टसचा रतीबच घातला गेला . त्या ट्रोलिंग व सर्व समज-गैरसमज आणि प्रतिमांना मूठमाती देत एक नवा आणि धोरणी राजकारणी उदयाला आला आहे , असंच राहुल गांधी यांचं अलीकडची काही वर्ष आणि विशेषत: या पदयात्रेतलं वर्तन आहे . धोरणी आणि बेरकेपणा , आक्रमकता आणि आतातायीपणा यातील सीमारेषा ठाऊक झालेला सुसंस्कृत नेता असंही  त्यांचं हे वर्तन आहे . धार्मिक स्थळांना भेटी दिल्यानं राहुल गांधी यांच्यावर ते धार्मिक होत असल्याचीही टीका मधल्या काळात झाली . राजकारण म्हटलं की , मतांसाठीच जात-धर्म येणारच पण , देशात दुही माजवणारी धर्मांधता मात्र त्यांनी मुळीच दाखवलेली नाही , याचीही नोंदड आवर्जून करुन ठेवायलाच हवी   .

राहुल गांधी यांनी राजकारण लहानपणापासूनच पाहिलं . पूर्वजांचा स्वातंत्र्य संग्रामातील त्याग , सहभाग आणि नंतर सत्तेचं फार मोठं संचित त्यांच्याकडे आहे . पंतप्रधान असलेल्या आजी आणि वडिलांना देशासाठी हुतात्मा होण्याची किंमत राहुल गांधी यांनी चुकवलेली आहे . अशी पार्श्वभूमी असली तरी राजकारण काय असतं हे त्यांना ठाऊक नाही अशी टीका विरोधी पक्षीयांकडून कायमच झाली . सलग दोन लोकसभा आणि काही विधानसभा निवडणुकांत काँग्रेसला त्यांच्या नेतृत्वाखाली पराभव स्वीकारावा लागला . त्यामुळे तर राजकारण कसं करायचं , हे राहुल गांधींना खरंच कळलेलं नाही आणि त्यांच्यात नेतृत्व गुण नाहीत , असा ठपका ठेवत स्वपक्षातूनही त्यांना विरोध होऊ लागला . मात्र , याच काळात एका वेगळ्या मुशीतला राजकीय नेता घडण्याची प्रक्रिया सुरु झालेली होती आणि आहे हे ‘भारत जोडो’ पदयात्रेच्या निमित्तानं समोर आलेलं आहे . आज केंद्रात आणि अनेक राज्यात भाजप सत्तेत आहे . सत्तेत येण्यासाठी त्या पक्षातील नेतेही राजकीय प्रक्रियेच्या अशाच मुशीत घडले . लोकशाहीत सत्ताधाऱ्यासोबतच विरोधी पक्षातही नेत्यांची ‘अशी’ जडणघडण ही एक अत्यंत आवश्यक आणि अपरिहार्य प्रक्रिया असते . ती प्रक्रिया राहुल गांधी यशस्वीपणे पार पाडत आहेत , असाही या या यात्रेचा आणखी  एक अर्थ आहे .

पुन्हा एकदा सांगतो , देशात आज बेरोजगारी , रुपयांचं अवमूल्यन , मातीमोल होणारी कृषी व्यवस्था , वाढती बेरोजगारी अशा अनेक मूलभूत प्रश्नांची चर्चाच होत नाही . हे प्रश्न विचारणारे पत्रकार नाहीत आणि समजा कुणी पत्रकार त्यासाठी सज्ज झाला तर त्याच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी सत्ताधारी उपलब्ध होत नाहीत अशी स्थिती आहे . मंदिर , काश्मिरचा स्वायत्त दर्जा काढणं , देशातून विरोधी पक्ष संपवणं भाषा ( की धमकी ? ) उघडपणे होणं आणि त्या दृष्टिकोनातून जाणीवपूर्वक प्रयत्नही होणं , यामुळे आपल्या देशातील लोकशाहीचा प्रवास एक पक्षीयत्व आणि बहुमताकडून धार्मिकतेच्या आधारावर बहुसंख्याकवादाकडे होणं , असे धोके उभे राहिलेले आहेत . हे कुणाही संवेदनशील लोकशाहीवादी माणसाला समजतं . या धोक्याच्या विरोधात फार कमी लोक निर्भयपणे बोलतात , त्यात आघाडीवर राहुल गांधी आहेत . अलीकडच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी , भाजप आणि रा. स्व. संघाच्या विरोधात उघडपणे आणि बेडरपणे भूमिका घेणारे राहुल गांधी हे एकमेव राजकीय नेते आहेत .

भारताची सेक्युलर ही प्रतिमा या पुढेही जपली जाण्यासाठी आणि लोकशाहीचं निधर्मीकरण अबाधित राहण्यासाठी खरं तर अनेकांनी संघटित होत पुढे येण्याची नितांत गरज निर्माण झाल्याचा हा काळ आहे . ते काम राहुल गांधी करत आहेत . ‘भारत जोडो’ पदयात्रेमुळे देशाचं राजकारण करायचं म्हणजे काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत पक्षाची आणि त्या पक्षाच्या नेत्याची पाळंमुळं घट्ट असावी लागतात . काँग्रेस पक्षाची मुळं देशात घट्ट रुजलेली आहेत पण , काँग्रेस पक्षांच्या नेत्यांची आणि त्यातही राहुल गांधी यांची पाळंमुळं तशी घट्ट नाहीत , असं नेहेमीच बोललं जातं . शिवाय गांधी घराण्यातील व्यक्ती तर केवळ ‘गांधी’ नावाच्या करिष्म्यावर स्वत:ला आणि पक्षालाही तारुन नेते , अशी टीका होतच असते . या पदयात्रेमुळे राहुल गांधी यांची पाळंमुळं या देशाच्या मातीत पक्की रुजली जातील आणि भाजपला  समर्थ पर्याय म्हणून काँग्रेस पक्षाला उभं करण्याची कर्तबगारी ते नक्कीच दाखवतील असे संकेत या पदयात्रेतून मिळत आहेत : एक लोकशाहीवादी म्हणून सर्वांनीच या संकेतांचं स्वागत करायला हवं .

जाता जाता – राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे भारतीय जनता पक्ष हादरला आहे , येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव अटळ आहे अशाही चर्चा ऐकायला मिळत आहेत पण , हा एक शुद्ध भाबडेपणा आहे . एका पक्षाच्या एका पदयात्रेनं प्रतिस्पर्धी पक्ष पूर्ण उखडला जात नसतो , याचं भान बाळगलं जायला हवं . भाजपचीही मुळं आता देशभर पसरली आहेत शिवाय या पक्षाची संघटनात्मक वीण घट्ट आहे . ती मुळं आणि ती वीण सैल करण्यासाठीची ‘भारत जोडो’ यात्रा ही एक सुरुवात आहे , हे लक्षात घ्यायला हवं . कॉंग्रेसला पूर्ववैभव प्राप्त करुन देण्यासाठी एकटे राहुल गांधी आणि नवे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे या दोघांनी सक्रिय होऊन भागणार नाही तर , उगाच भ्रमात न राहता काँग्रेसच्या सर्वच नेते आणि कार्यकर्त्यांना कामाला जुंपून घ्यावं लागणार आहे .

प्रवीण बर्दापूरकर

Cellphone +919822055799

www.praveenbardapurkar.com

blog.praveenbardapurkar.com

संबंधित पोस्ट