■ मल्लिकार्जुन खरगे : सक्षम अध्यक्ष  की ताटाखालचं मांजर ?

कीकडे राहुल गांधी यांची देशव्यापी पदयात्रा सुरु असतांनाच दुसरीकडे काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीची लुटूपुटूची लढाई मल्लिकार्जुन खरगे यांनी अपेक्षेप्रमाणे जिंकली आहे . लुटूपुटूची लढाई म्हणण्याचं  कारण की , खरगे यांच्या उमेदवारीला गांधी कुटुंबियाचा अघोषित आणि पक्षांतंर्गत जी-२१ गटाचा जाहीर पाठिंबा होता .  अशा परिस्थितीत शशी थरुर यांची उमेदवारी नाममात्र आहे आणि त्यांचा पराभव अटळ आहे , हे उघडच होतं . शिवाय , काँग्रेस पक्षात लोकशाही नांदते आहे हे दाखवण्यासाठी शशी थरुर    ( किंवा अन्य कुणाचीही ) यांची उमेदवारी काँग्रेससाठी तशीही आवश्यकच होती . मात्र याचा अर्थ शशी थरुर यांचं निवडून येणं कोणत्याही परिस्थितीत काँग्रेसला परवडणारं नव्हतं . शशी थरुर विद्वान आहेत . स्वतंत्र प्रज्ञेचे आहेत आणि एक राजकारणी म्हणून असा स्वतंत्र प्रज्ञेचा माणूस कोणत्याच पक्षाला पेलणारा नसतो . राजकीय पक्षांसाठी अशी माणसं बुजगावणं म्हणून वापरुन घेण्यासाठीच समाविष्ट करुन घेतलेली असतात . आणखी एक मुद्दा म्हणजे शशी थरुर यांची व्यक्तिगत प्रतिमा स्वच्छ नाही असे आरोप करण्याची संधी भाजपला आपसूकच मिळाली असती . त्यामुळे थरुर यांची उमेदवारी जिंकणारी नाही , हे स्पष्टच होतं .

मल्लिकार्जुन खरगे यांनी एक सुकाणू समिती स्थापन करुन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कामकाजाला सुरुवातही केलेली आहे . खरगे हे काँग्रेसच्या ‘संस्कृती आणि संस्कारा’त मोठे झालेले कर्नाटकी नेते आहेत . ते काँग्रेसच्या अध्यक्षपदी आले याचा अर्थ या आधी पक्ष किंवा सरकारात त्यांना राष्ट्रीय पातळीवर फार मोठ्या जबाबदाऱ्या दिल्या गेल्या होत्या असं  नाही . ते केंद्रात मंत्री होते , परंतु एक देश म्हणून केंद्रात महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या अर्थ , संरक्षण , अर्थ , गृह किंवा परराष्ट्र अशा पैकी कोणतंही महत्त्वाचं खातं त्यांच्या वाट्याला आलेलं नव्हतं . पक्ष पातळीवर , राष्ट्रीय पातळीवर पदाधिकारी म्हणून काम करण्याचा तसा त्यांना अनुभव नाहीच आणि ते तसे मवाळ म्हणूनच परिचित आहेत  . कर्नाटक राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री आणि प्रदेशाध्यक्ष अशी काही पद त्यांनी भूषवलेली आहेत हे खरं आहे मात्र , काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत पसरलेल्या आणि गाव , तांडा , पाडा , वाडीपर्यंत पोहोचलेल्या देशातील सर्वांत मोठ्या काँग्रेस पक्षाची अफाट पसरलेली मुळं त्यांना पूर्णपणे ठाऊक आहेतच असं नाही . मंत्रीच नव्हे तर पदाधिकारी म्हणूनही त्यांचा जनसंपर्क व्यापक असल्याचं कधी त्यांची संसदेतील कामगिरी आणि वावर पाहून जाणवलेलं नाही . थोडक्यात , पक्ष व देशाकडे राष्ट्रीय नजरेतून पाहण्यासाठीची अजून नजरेत न भरलेली  क्षमता त्यांच्यात आहे का नाही हे सिद्ध झालेलं नाही .  त्यामुळेच अध्यक्ष म्हणून कामकाज करत असताना खरगे यांच्या नेतृत्व गुणांचा खऱ्या अर्थानं कस लागणार आहे .

मल्लिकार्जुन खरगे यांच्या समोरची आव्हानं दोन प्रकारची आहेत . १९९८ नंतर काँग्रेस पक्षाला लाभलेले ते गांधी घराण्याबाहेरचे पहिले अध्यक्ष आहेत . १९९८ सारी श्रीमती सोनिया गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रं सीताराम केसरी यांच्याकडून स्वीकारली . त्यांच्या आधी असलेल्या अध्यक्षांना फार काही चांगली वागणूक तेव्हा गांधी कुटुंबाकडून मिळालेली नव्हती . सीताराम केसरींना तर एका खोलीत डांबून त्यांच्याकडून अध्यक्षपद कसं हिसकावून घेण्यात आलं याच्या कथा सत्य आणि फिक्शनच्या सीमारेषेवरच्या आहेत . त्या संदर्भातल्या तेव्हा प्रकाशित झालेल्या बातम्या , तेव्हा राजकारणात सक्रिय असणाऱ्या बुजुर्ग काँग्रेसजन तसंच राजकीय विश्लेषक व काँग्रेस बीट  सांभाळणाऱ्या पत्रकारांच्या चांगल्याच स्मरणात आहेत . श्रीमती सोनिया गांधी यांना अध्यक्ष केलं जाणार आहे हे तेव्हा अध्यक्ष असणाऱ्या सीताराम

राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्यावर मल्लिकार्जुन खरगे खरगे यांचं अभिनंदन करताना काँग्रेसच्या मावळत्या अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी .

केसरी यांना मुळात ठाऊक नव्हतं . अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत सीताराम केसरी यांनी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडावं आणि श्रीमती सोनिया गांधी यांनी ते स्वीकारावं  , असे दोन ठराव मांडले गेले आणि त्यांची कोणतीही कल्पना तत्कालीन अध्यक्ष सीताराम केसरी यांना नव्हती  (कारण ते तोपर्यंत बैठकीसाठी पोहोचलेले नव्हते ) . अशा बातम्या प्रकाशित झाल्या होत्या की , सीताराम केसरी  बैठकीत पोहोचले तेव्हा , त्यांनी अध्यक्ष म्हणून केलेल्या कामाबद्दल आभार व्यक्त करणारा ठराव ( माझ्या स्मरणाप्रमाणे प्रणब मुखर्जी यांच्याकडून ) वाचून दाखवला जात होता . ते लक्षात येताच केसरी यांनी बैठक अध्यक्ष या नात्यानं स्थगित केली . पण , त्यांना एका खोलीत कोंडून  सोनिया गांधी यांची नियुक्ती राष्ट्रीय अध्यक्षपदी करण्यात आली . नंतर अध्यक्ष म्हणून गांधी कुटुंबियानं सीताराम केसरी आणि पी. व्ही. नरसिंहराव या दोन्ही माजी आणि तेव्हा हयात असलेल्या अध्यक्षांची केलेली उपेक्षा दिल्लीच्या दरबारी राजकारणात आजही चर्चेत असते . यापैकी पी. व्ही नरसिंहराव हे तर केवळ काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षच नव्हते तर देशाचे पंतप्रधानही होते . नुसते पंतप्रधान नव्हते तर , या देशात खुली अर्थव्यवस्था आणि जागतिकीकरणाच्या महत्त्वाकांक्षी , जगाच्या व्यापक पटावर भारताला नेणाऱ्या सुधारणांचे नरसिंहराव हे जनक होते .  मृत्यूनंतर त्यांचं पार्थिव पक्षाच्या राष्ट्रीय कार्यालयात नेऊ देण्यात आलं नाही , ना दिल्लीत त्यांची समाधी होऊ देण्यात आली . हे सर्व कटू असलं तरी सांगण्याचा उद्देश हा की , खुद्द गांधी कुटुंबीय आणि त्यांचा प्रभाव असणारे नेते , कार्यकर्ते हेही मल्लिकार्जुन खरगे यांच्यासमोरील एक आव्हान असेल . यातही जी -२१ म्हणून जो असंतुष्टांचा गट काँग्रेसमध्ये आहे त्या नेत्यांना पक्षाध्यक्ष म्हणून सोनिया गांधी यांचं नेतृत्व मान्य आणि राहुल गांधी यांचं नेतृत्व अमान्य आहे . अशा या विचित्र परिस्थितीत सर्वांना सोबत घेऊन चालणं ही फार मोठी तारेवरची कसरत मल्लिकार्जुन खरगे यांच्यासाठी ठरणार आहे .

सध्याचा काँग्रेस पक्ष १४० वर्षांचा नाही . इंदिरा गांधी यांनी स्थापन केलेल्या काँग्रेस आय या पक्षाची नाळ तत्कालीन अध्यक्ष पी. व्ही. नरसिंहराव यांनी पुन्हा एकदा १९८८ मध्ये स्थापन झालेल्या काँग्रेस पक्षाशी जोडून देण्याची चतुराई दाखवलेली आहे . थोडक्यात काँग्रेस हा विचार मात्र १४० वर्ष जुना आहे . काँग्रेस हा शिस्तबद्ध राजकीय पक्ष कधीच नव्हता तर देशाच्या स्वातंत्र आंदोलनाला संघटित रुप देणारी ती एक राष्ट्रव्यापी चळवळ होती . तीच चळवळ पुढे पक्ष म्हणून ओळखली जाऊ लागली . देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचणारा आणि सर्वाधिक काळ केंद्र व राज्यात सत्तेत राहिलेला , देशाला ठोस प्रगतीचा मार्ग दाखवणारा काँग्रेस हा पक्ष देशातील विविध धर्म तसंच जाती , उपजाती , पोटजाती , पंथ , भाषा यांची एक पोतडी बनलेला होता . हळूहळू या पोतडीतल्या ऐवजावर भाजपनं यशस्वीपणे डल्ला मारला आणि अलीकडच्या अडीच-तीन  दशकात राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसला सत्तेपासून वंचित ठेवण्यात यश मिळवलं . अनेक राज्यातही असंच घडलं . २०१४ नंतर निवडणुकांतले सलग पराभव काँग्रेसला केवळ निष्प्रभच करणारे ठरले नाहीत तर पराभूत मानसिकतेच्या खाईत लोटणारे ठरले . अलीकडच्या दोन अडीच दशकात तर दिल्लीपासून अगदी खेड्यापाड्यांपर्यंत तरुण चेहरे अपवादानंच दिसले आहेत . विशिष्ट नेत्यांच्या मक्तेदारीची देशभर पसरलेली छोटी छोटी बेटं असं काँग्रेस पक्षाचं स्वरुप झालेलं आहे . ही एक प्रकारची सरंजामशाहीच आहे . हे सरंजामदार स्वत: विजयी होऊ शकतात पण , राष्ट्रीय किंवा राज्य पातळीवर सत्ता प्राप्तीइतकं बळ निवडणुकांत प्राप्त करु शकत नाही . गोम इथेच आहे , असं राज्य आणि राष्टीय पातळीवरील यश निवडणुकांत मिळवून देण्याचा करिष्मा केवळ गांधी कुटुंबाकडेच आहे . शिवाय पक्षात आता कार्यकर्ते कमी आणि नेते जास्त अशी अवस्था आहे . हे असं दुष्टचक्र भेदण्याचं अत्यंत कठीण आव्हान मल्लिकार्जुन खरगे यांच्यासमोर आहे .

काँग्रेसचा संकोच होत गेला म्हणून भाजपचा विस्तार झाला . ( किंवा काँग्रेस पक्ष जिंकू शकला नाही म्हणून भाजपला निवडणुकीत विजय मिळाला .) ही मांडणी अत्यंत भाबडेपणाचीच नाही तर राजकीय दुधखुळेपणाची आहे . दोन खासदारांवरुन मुख्य प्रतिस्पर्धी भारतीय जनता पक्ष पंचवीस-तीस वर्षांत स्वबळावर सरकार स्थापनेइतकं बहुमत मिळवण्याइतका बलवान कसा झाला , संघटनात्मक मांडणीचं नेमकं कोणतं मॉडेल भाजप ( आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघा )नं राबवलं ,  त्याचं कठोर विश्लेषण ( Swot Analysis ) करुन पक्ष विस्ताराचं स्वतंत्र आणि महत्त्वाचं म्हणजे काँग्रेसी परंपरेला सांजेसं सेक्युलर नवं मॉडेल निर्माण करण्याचं कौशल्य मल्लिकार्जुन खरगे यांना दाखवावं लागणार आहे . असं मॉडेल निर्माण करुन , ते राबवून काँग्रेस पक्षाला स्वबळावर केंद्र आणि राज्यात सत्ता प्राप्त करुन देण्यात यश मिळवून दिलं तर मल्लिकार्जुन खरगे यांचा काँग्रेस पक्ष कायमचा ऋणी राहील आणि गांधी-नेहरु कुटुंबाच्या ‘तथाकथित जोखडा’तून मुक्त होईल . अन्यथा गांधी कुटुंबीयांच्या ताटाखालचं मांजर झालेला आणखी एक अध्यक्ष म्हणून मल्लिकार्जुन खरगे यांची नोंद होईल .

प्रवीण बर्दापूरकर

Cellphone  +919822055799

www.praveenbardapurkar.com
blog.praveenbardapurkar.com

संबंधित पोस्ट