पत्रकारच व्हायचं असं माझं कांही निश्चित नव्हतं…

नांदेडच्या आनंद मिडियाच्यावतीनं ‘लेखणीच्या अग्रावर’ हे माझं नवीन पुस्तक पुढील महिन्यात प्रकाशित होत आहे . त्या पुस्तकासाठी लिहिलेलं ‘खरं तर,’  हे मनोगत-

रं तर , पत्रकारच  व्हायचं असं मी कांही निश्चित केलेलं नव्हतं . बालपण ते वयाची तिशी हा माझा काळ अतिशय खडतर होता  , त्यातला बराचसा विपन्नावस्थेतलाही होता . त्यातली ( आजही सोबत असणारी ) सुखद बाजू म्हणजे माझ्यावर वाचनाचा संस्कार माई-माझ्या आईनं केला आणि पुढे बेगम मंगलानं तो वाचन संस्कार समृद्ध केला . बेगममुळे शब्दांना लळा कसा लावावा हे तसंच इंग्रजी वाचनाकडे मी वळलो . माझ्या जडणघडणीत या दोन स्त्रियांना अनन्यसाधारण स्थान आहे . पौंगढावस्थेतच मी कांहीबाही लिहायला सुरुवात केली . मग कसा कोण जाणे कथा लेखनाकडे वळलो . त्या कथा प्रकाशितही होऊ लागल्या . विदर्भ साहित्य संघाचं मुखपत्र असलेल्या ‘युगवाणी’सह कांही परितोषिकंही कथांना  मिळाली .

तर , तेव्हा बांधकाम आणि इमारती आणि आताच्या सार्वजनिक खात्यात रोजंदारीवर काम करत होतो , सोबतच अनेक चळवळीत सक्रिय होतो . अक्षर चांगलं असल्यानं प्रत्यक्ष कामावर न जाता कारकुनीची कामं माझ्याकडून करवून घेतली जात आणि भविष्यात रोड कारकून म्हणून नोकरी मिळण्याची शाश्वती होती . म्हणजे व्यवस्थेचा एक भाग होऊन जमेल तसा भ्रष्टाचार वगैरे करुन नवीन औरंगाबादमधे घर बांधून आणि त्याला मातृछाया वगैरे नाव देऊन  निवृत्तीनंतरचं आयुष्य ‘सुखात’ कंठण्याची सोय नकीच होणार होती .  याच दरम्यान पत्रकारीतेतही माझी ‘लेखन लुडबूड’ सुरु झालेली होती . त्या लुडबुडीतून तेव्हा नुकत्याच सुरु झालेल्या आकाशवाणीच्या औरंगाबाद ( आता छत्रपती संभाजीनगर ) केंद्राच्या  कांही असाईनमेंट्स तत्कालीन  वृत्तविभाग प्रमुख वसंतराव देशपांडे यांच्यामुळे मिळाल्या . आकाशवाणीसाठी केलेल्या लेखनाला मिळालेला प्रतिसाद बघून पत्रकारितेकडे वळण्याची प्रेरणा मिळाली .  त्यामुळे माझ्या कथा लेखनाला प्रसिद्धीचा  मार्ग प्रशस्त होईल हा स्वार्थी विचारही त्यामागे होता , हे प्रामाणिकपणे कबूल करायला हवं . वसंतराव देशपांडे यांनीच एक पत्र देऊन मला तेव्हा ‘गोमंतक’चे संपादक असलेल्या माधवराव गडकरी यांच्याकडे पणजीला पाठवलं . अशा रितीनं १९७७साली मराठी पत्रकारितेत मी प्रवेश केला ; आता २०२३मध्ये त्याला ४५ वर्षे पूर्ण झाली .

पणजी , कोल्हापूर , सातारा , चिपळूण असं प्रवास करत १९८१ साली माझा पडाव नागपुरात पडला . ‘नागपूर पत्रिका’ या दैनिकांचा दोनच वर्षात मुख्य वार्ताहर होण्यापर्यंत मी मजलही मारली . शिवाय मंगलासोबत रविवार पुरवणीच्या कामाची अतिरिक्त जबाबदारीही माझ्याकडे होती . एकूण ठरवलं त्याप्रमाणं मजेत चाललं होतं . अचानक माझ्या पत्रकारितेला वेगळं आणि  निर्णायक वळण लावलं ते माधव गडकरी यांनी . तेव्हा ते ‘मुंबई सकाळ’चे संपादक होते . त्यांच्यामुळेच मी मुंबई सकाळ’चा  नागपूर वार्ताहर म्हणूनही काम करत होतो . एका नागपूर भेटीत माधवराव गडकरी यांनी अक्षरक्ष: रागावून कथा-कविता लेखन बंद करायला लावून राजकीय वृत्त संकलनाच्या बीटमधे माझी रवानगी केली .

पुढे माधवराव तेव्हाच्या सर्वाधिक खपाच्या ‘लोकसत्ता’ या दैनिकाचे संपादक झाले आणि माझ्या पत्रकारितेचा प्रवास  एका व्यापक अवकाशात सुरु झाला . नागपूर , मुंबई , दिल्ली अशा महत्वाच्या सर्व शहरात काम करण्याची संधी मिळाली . एक अर्धवेळ वार्ताहर ते ‘लोकसत्ता’च्या नागपूर आवृत्तीचा आधी निवासी संपादक आणि मग संपादक असा हा प्रवास आहे . नंतर लोकमत वृत्तपत्र समूहाचा राजकीय संपादक म्हणून नवी दिल्लीतही पत्रकारिता करण्याची संधी मिळाली . साल्सबर्ग सेमिनारची प्रतिष्ठेची आंतरराष्ट्रीय अभ्यासवृत्ती मिळाली .  मराठी सोबतच हिन्दी आणि इंग्रजीतही लेखन करता आलं . केवळ देशच नव्हे तर जगातील ४० पेक्षा जास्त देशांचे दौरे करता आले . विधीमंडळ आणि संसदेच्या कामाचंही वृत्त संकलन करता आलं . एकूण काय तर , एक पत्रकार म्हणून माझी पोतडी गच्च भरलेली आहे . प्रांजळपणे सांगतो , पत्रकारितेचा प्रवास असा संपन्न होईल , असं माझ्या स्वप्नातही कधी आलेलं नव्हतं . हा जसा एक पत्रकार म्हणून अजूनही सुरुच असलेला माझा प्रवास आहे , तसंच ते पत्रकारितेच्या ‘मिशन टू  प्रोफेशन टू बिझिनेस’ असं झालेलं ( माझ्या पिढीला अवमूल्यनात्मक तसंच वैषम्यही वाटणारं ) ते स्थित्यंतरही ‘बटविन  द लाईन्स’ या कथनात आहे .

माईनं ओंजळीत टाकलेल्या महात्मा गांधी यांच्यावर श्रद्धा आणि समाजवादी विचारानं भारलेला मी होतो , अजूनही आहे . पण , पत्रकारिता करतांना News is sacred , comment is free हा संस्कार माझ्या पिढीवर झालेला आहे आणि माझ्यापुरता तरी तो आजही तेवता आहे . बातमीत राजकीय भूमिका न आणल्यानं सर्वच राजकीय पक्षात माझा  वैपुल्यांनं केवळ संचार राहिला नाही तर व्यापक घनिष्ट संपर्क निर्माण झाला ; ‘त्यांच्या’ हिंदुत्ववादाला माझा विरोध असूनही त्यांच्यातील अनेकांशी जीभावाचं मैत्र निर्माण झालं . आक्रमकता आणि स्पष्टवक्तेपणा माझ्यात जन्मजात आहे पण पत्रकारिता करताना आक्रमकता कधीच आततायीपणाकडे  किंचितही झुकू  न देण्यात आणि एकांगीपणा टाळण्यात मला यश आलं . त्यामुळे अनेकांशी पंगे घेऊनही संपर्क कायमच बहुस्तरीय आणि विचारिय राहिला . सुरुवातीला डावीकडे झुकलेलं माझं लेखन नंतर  जात , धर्म , राजकीय विचार बाजूला ठेऊन होत  गेलं ; ही प्रक्रिया आपसूक घडली . ज्याचं जे चांगलं आहे त्याचं कौतुक करतांना कधी संकोच वाटला नाही आणि त्याच व्यक्तीच्या न पटलेल्या निर्णयाला विरोध करताना माझा हात कधी थरथरला नाही . थोडक्यात माझं लेखन एका अर्थानं विवेकवादी  होत गेलं असं म्हणता येईल . म्हणूनच –

मेत्ती मे सर्व भूदेसु

वेंरम् मझं नं केणवी !

( या भुतलावरच्या सर्वांशी माझी मैत्री आहे , माझं कुणाशीही वैर  नाही . )

‘दिवस असे की…’ ( प्रकाशक – ग्रंथाली )  या माझ्या अनुभव कथनाचा हा विस्तार आहे . त्यात ‘लोकसत्ता’च्या आधीचे आणि नंतरचे म्हणजे लोकमत वृत्तपत्र समूहातील अनुभव  आलेले नव्हते . ते दिवस या पुस्तकात समाविष्ट करण्यात आले आहेत . प्रत्येक पत्रकार समाज आणि भावजीवनातही एकाच वेळी जगत असतो . पत्रकारांनं तटस्थ असावं हे म्हणायला सोपं असतं ; दु:ख नको तुटताना , अश्रु नको वळताना , हे कवितेत शोभून दिसतं . कुणालाही प्रत्यक्ष जगताना असं वागताच येत नाही कारण येणारे अनुभव प्रपातासारखे कोसळत असतात त्यामुळे  भोवंडून जायला होतं . पत्रकारही  त्याला अपवाद नाहीतच . बेगमच्या दीर्घ आणि असाध्य  आजाराला मी एक पत्रकार आणि माणूस अशा दुहेरी भूमिका साकारत सामोरं गेलो . त्या दिवसांत खूप कांही शिकता आलं , म्हणून बेगम ‘जाताना’चं ते सगळं इथे समाविष्ट केलं आहे . थोडक्यात १९७७ ते २०२१ म्हणजे  बेगम मंगलाचं निधन होईपर्यंतचा हा लेखन पट आहे .

एक स्पष्ट करतो हे लेखन आत्मचरित्र नाही .  गेल्या साडेचार दशकातील  पत्रकारितेच्या काळाचं इतिहास लेखन नाही , समकालाचा तो वेध किंवा ते एक सरसकट स्टेटमेंट नाही , कुणाची स्तुती किंवा कुणाला कमी लेखण्याचा हा प्रयत्न नाही किंवा पत्रकारितेतील योगदानाचा तो दावा नाही . पत्रकारितेच्या बदललेल्या स्वरुपाच्या विरोधात फोडलेला तो निषेधात्मक कर्कश टाहोही नाही तर पत्रकारिता करतांना आलेल्या अनुभवांचं हे कांहीसं आत्मपर प्रांजळ कथन आहे .

पुस्तकाला ‘लेखणीच्या अग्रावर’ हे नाव आमच्या कुटुंबाचे मेंटर महेश एलकुंचवार यांनी सुचविलेलं आहे . प्रस्तावना राम जगताप याची आहे . माझ्या पिढीनंतर पत्रकारितेबद्दल समतोल दृष्टी आणि डोहखोल आकलन असणारे जे मोजके पत्रकार आहेत त्यापैकी  एक म्हणून राम जगतापकडे मी पाहतो . म्हणूनच त्यानं  प्रस्तावना लिहावी असा  माझा आग्रह होता . हे पुस्तक सिद्ध होण्यात विवेक रानडे , भाग्यश्री  बापट-बनहट्टी , अर्चना अजय जोशी , डॉ . सुरेश सावंत हे नेहेमीप्रमानं सोबत आहेत . हे सर्व माझ्या जीवाभावाचे आहेत , त्यांच्या प्रती आभार कसे व्यक्त करणार ?

नांदेडचे धाकटे लाडके मित्रवर्य राम शेवडीकर आणि दैनिक ‘उद्याचा मराठवाडा’ या पुस्तकाच्या निमित्तानं पुस्तक प्रकाशनाच्या क्षेत्रात पाऊल टाकत आहे . ‘आनंद मीडिया’चा शुभारंभ माझ्याच एखाद्या पुस्तकानं व्हावा असा आनंद आणि राम शेवडीकर यांचा  त्यांचा आग्रह होता . त्यांच्या या धाडसाचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे . ‘आनंद मीडिया’ला पुढील प्रवासासाठी खूप शुभेच्छा .

आणखी काय सांगणार ?

प्रवीण बर्दापूरकर

Cellphone  +919822055799
www.praveenbardapurkar.com

praveen.bardapurkar@gmail .com

संबंधित पोस्ट